Friday, 27 April 2018

अंघोळीची गोळी



जगण्यासाठी काय हवे, काय हवे वसुंधरेला
हिरवळ क्रांती चोहीकडे, पाना फुलांची काया

हवा, पाणी, प्रकाश कोण देई मूलभूत गरजा
निर्मात्याने काय दिले, ते डोळे उघडून पहा

त्या निर्मात्याने आपल्याला काय दिले आहे ते आज डोळे उघडून पाहण्याची नितांत गरज आहे. त्याने जे काही निर्माण केलय ते आपल्यासाठी , त्या मुक्याप्राणांसाठी तर जीवसृष्टी जगवण्यासाठी आहे. त्या दैवी शक्तीने जागृत असलेल्या ह्या अद्भुत अश्या निसर्गावर जितका हक्क आपण गाजवतो त्याहून जास्त हक्क हा त्या वन्य प्राणींचा देखील आहे. त्याने माणसाला घडण्यासाठी धर्म दिला, राहण्यासाठी देश व समाज दिला, तर जगण्यासाठी निसर्ग दिला आहे. त्याच निसर्गाच्या गाभाऱ्यातून वर्षानुवर्षांपासून आपण फक्त घेतच चालले आहोत. त्याच्या साह्यानेच तर आपण प्रगत झालो. त्या निसर्गाने आजपर्यंत मानव जातीस भरपूर दिलं आणि देत ही आहे. त्याने कधीच माघार घेतली नाही. माणसाच्या मूलभूत गरजा हवा , पाणी , प्रकाश कोणामुळे आणि कोणत्या दैवी कार्याने आपल्याला मिळते हे सांगण्यात वेळ न दडवता ते आपल्या पुढील भविष्यात जन्मणाऱ्या पिढीसाठी  निरंतर कसे राहील त्यासाठी विचार व कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाज प्रबोधन करून लोकांपर्यंत पोहचून कार्यास गती व त्या गतीतीतून एकतेतून निसर्ग संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत , रंक पासून ते श्रेष्ठांपर्यंत सगळ्यांनी आपले योगदान दिलेच पाहिजे. निसर्गाला पुजून निसर्गाची सेवा करणे म्हणजेच आपल्या देवाशी, देशाशी त्या निर्मात्याशी एकनिष्ठ राहणे. माणसाने चंद्रावर जरी पाय ठेवले तरी तो हवा , पाणी आणि प्रकाश शिवाय जगू शकत नाही आणि हेच कडू सत्य माणसाने स्वीकारले पाहिजे . निसर्गाशिवाय दुसरा कोणता ही पर्याय मानवासाठी नाही. निसर्गाचे नियम आपण जागोजागी तोडतोय , मिळेल तिथे आपण निसर्ग प्रेमींचे खच्चीकरण करतोय. तरीही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज ही कित्येक तरुण आणि सामाजिक संस्था आपापल्या परीने निसर्ग जपण्यास कार्यरत अन कटिबद्ध आहेत. पाणी फाउंडेशन , तनिष्का , नाम फाउंडेशन तसेच आंघोळीची गोळी. असे अनेक निसर्ग सेवक त्या वसुंधरेच्या मदतीस वेळ काढून निसर्ग सेवा करत आहेत आपले योगदान देत आहेत. श्रमदान करत आहेत.

मातीमधुनी जन्म त्याचा, तोच आपुली छाया          
गाव वस्ती शहर सगळे त्याचाच आहे पसारा

दुष्काळात का आठवतो ,कुठे विसावतो प्रेमात
त्याच्या नसण्याने, काय शोधतो आपण उन्हात

देशातल्या तसेच राज्यातल्या काही भागात दुष्काळ हा बारमाही आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्यांना मिळणारा कमी भाव . पाणी नाही म्हणून उद्योग कारखाने नाही शेती नाही गावात गावकरी नाही. ओसाड पडत चाललेली गाव अन नद्या. महागाई , रोजगार बेरोजगार, विरोधी पक्षांचे  आरोप प्रत्यारोप , गोंधळ , मोर्चे अश्या अनेक प्रश्नांना सरकार ला तोंड द्यावं लागतंय .  तरीही सरकार आपल्या परीने पर्यावरण वाचवण्यास प्रयत्न करत आहेत. राज्यात ५० कोटी वृक्ष लावण्यासाठी सरकारने हरितसेना स्थापन केली असून त्यात अनेक तरुणांनी सहभाग देखील नोंदवला आहे.  पाणी फाऊंडेशन च्या मदतीने राज्यातल्या प्रत्येक गावात स्पर्धा राबवून कलाकारांच्या साह्याने जे कार्य जे निसर्ग सेवा चालू आहे ती खऱ्या अर्थाने दखलपात्र आहे.  " तुफान आलय " च्या व्यासपीठावर अनेक शहरी नागरिकांनी गावाकडे श्रमदान केले.  शहरात काय नि गावात काय ? उन्हाचे चटके जेव्हा लागतात तेव्हा आपली पायवाट ही त्या झाडांच्या शोधातच निघते. आपल गाव म्हंटल तर शेती डोंगर नद्या पाखरांची अन माणसांची. आपली वस्ती आणि आपले शहर म्हंटल तर त्या निसर्गाची देणगी माणसांसाठी मनुष्याच्या सुखासाठी.  धावपळीच्या युगात मनशांती साठी आपण निसर्गाच्याच सानिध्यात राहायला पसंद करतो . आता फार्म हाऊस ची गरज ही भासू लागली आहे. प्रेमात असो की उन्हात झाडाच्या सावली खाली जो आनंद मिळतो तो इतर कुठे आहे का ?  ज्या प्रमाणे मनुष्यास भावना आहे , जीव आहे , वाढ आहे , संवेदना आहे त्या प्रमाणे झाडाना देखील आहे. फक्त त्यांना व्यक्त होता येत नाही . आपण व्यक्त होऊ शकतो आणि सहकार्य करू शकतो. झाडांना वाचवू शकतो. 

झाडावरचे एक एक घाव अन जखमा जाऊन पहा
            मुक्याने सोसले किती, खरा देव कोणता शोधा



मोठया प्रमाणात निसर्ग आणि झाडे जपणारा आपला देश हा वनस्पतींनी समृध्द आहे. शहरीकरणाच्या नादात जरी आपण खूप मोठ्या चुका केल्या तरी ही भारत आयुर्वेदासाठी आणि पर्यावरण रक्षणास त्याचे जतन देखील करत आहे. लाजाळू च्या झाडाला स्पर्श करता त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. म्हणजे झाडांना व्यक्त होता येत. मग जेव्हा आपण आपल्या सोयी साठी त्या झाडांची कत्तल करतो त्यांच्या अंगावर खिळे ठोकून आपल्या जाहिराती करतो. तेव्हा त्यांना ही त्रास होत असेल ना ? जर झाडांना संवेदना आहे तर १०१ टक्के त्यांना त्रास होतो फक्तआवाज नसतो . हीच जाणीव मनात ठेवून " अंघोळीची गोळी " ह्या संस्थेने राज्यातल्या प्रत्येक गावात अन शहरात झाडांना खिळे मुक्त करण्याचा मानस आखला. सुरुवात केली आणि आज कित्येक झाडांची त्या गंजलेल्या खिळ्यापासून सुटका केली. #PainFreeTree #खिळेमुक्तझाड ह्या ह्यास ट्याग ने सोशल मीडियाच्या मदतीने लोकांना एकत्र केलं.  झाडाना होणाऱ्या वेदनांची नागरिकांना जाणीव करून देता अनेक खाजगी , सामाजिक संस्था , कार्यकर्ते झाडांना ह्या वेदनेपासून मुक्त करण्यास रस्यावर उतरली. प्राचीन काळापासून आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे . आपल्या संस्कृतीत झाडांना विशेष महत्व आहे.  अभंगात जगतगुरु तुकाराम महाराज ह्यांनी ही  "‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ झाडांचे हे महत्व पटवून सांगितले होते. वृक्ष लावणे सोपे परंतु वृक्ष जगवणे आणि त्याची जतन करणे हे अवघड आहे . केवळ दिखाव्यापुरतं वृक्षारोपण करून बातमी लावून घराच्या चार भिंतीत आरामात झोप घेणारे आपल्या कडे खूप आहेत. परंतु त्याच झाडांसाठी तळमळणाऱ्या लोकांची संख्या मात्र त्या मानाने खूप कमी आहे. पुढील येणारी भीषण परिस्तिथी जाणून आता तरी वृक्षांबाबत आपण जागृत झालो पाहिजे. निसर्गाचा फटका जेव्हा बसतो तेव्हा त्याचा होणारा आवाज हा मात्र आपल्या पुढील सात पिढीपर्यंत गुंजतो . त्यासाठी चला झाडे लावा झाडे वाचावा , निसर्गावर प्रेम करा , झाडांना वेदनामुक्त करा . एक पाऊल..हिरवळ क्रांती चोहीकडे ..

शेतात रानात वनात आणि डोंगर दऱ्या खोऱ्यात
निरोगी आयुष्याची ही संजीवनी आपल्या हातात

झाडे जगवा झाडे लावा, खरी श्रीमंती ही जपा
झाडांसोबत प्रगतीचा , इतिहास आपला नवा




-सचिन कृष्णा तळे
770909646













No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale