Friday, 30 August 2024

पुतळे बोलू लागले तर काय म्हणतील ते या राजकारण्यांना?

 "राजे माफ करा, पण आजकाल जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचे महत्व जास्त वाढले आहे. चालतीबोलती हाडामांसाची माणसे नकोत पण निर्जीव पुतळे हवेत. कारण हे पुतळे बिचारे निषेधार्थ आवाज उठवू शकत नाहीत. त्यांची विटंबना करा, त्यांच्यावरून राजकारण करा, त्यांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या आदर्शाची चिंधड्या करा, त्यांची स्थापना करून त्यांना मोकळ्यावर सोडा पण हे पुतळे काहीही म्हणणार नाही. उदारणार्थ तुम्ही कष्टाने उभारलेली तुमची गड किल्लेच पहा, विशाळगड सारखे अनेक किल्ले अतिक्रमणाच्या जाळ्यात अडकले पण आम्ही राजकारण करत बसलो. पुतळे उभारणारेच मंडळी या लोकनायकांच्या तत्वांचे प्रामाणिकपणे आचरण करतात किती, हा प्रश्न उपस्तिथ होतो. राजे, देशात अनेक प्रश्नांपेक्षा पुतळे अथवा स्मारके कुठे उभारायची हा प्रश्न जास्त ज्वलंत आहे असे यां राजकीय नेत्यांना वाटते. म्हणून तर देशातील कोट्यावधी गरीब जनता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सोयींपासून वंचित राहो, यांना पुतळे हवेत. देशाचे आणि राज्याचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नेतृत्व ज्यांनी ज्यांनी केले, इतिहासात ज्यांची वैशिष्ट्यपूर्ण नोंद आहे, त्यांचे पुतळे उभारण्याची परंपरा खूप जुनी आहे. त्यातून नवीन पिढीला मार्गदर्शन मिळावे हा उदात्त हेतू असतो. पण आता पुतळे नको असं वाटू लागलं आहे. राजे, पण जे घडलं ते चुकीचं घडलं. तुम्ही हिमालया पेक्षा मोठे आहेत तुम्हाला विचारात न मोजता उंचीत मोजू लागलो. याबद्दल क्षमस्व "

 


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे पहिले जनक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भारतीय नौदलाच्या ध्वजावरही शिवरायांचा शाही शिक्का छापण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला याचा साक्षीदार म्हणून नौदलाने ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मालवणच्या तारकर्ली समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ला संकुलात २ कोटी ४० लाख ७१ हजार रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आला. जमिनीपासून ४५ फूट उंचीवर बसवण्यात आलेला हा पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला. हि घटना फार दुर्दैवी आहे. यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यात हा भव्य पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करत कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आज राज्यभर आंदोलन उभे करणार असल्याची माहिती मिळत आहे. असो पण तो वाऱ्याने पडला, पावसाळी वातावरणामुळे काही गंभीर दोष निर्माण झाल्याने पडला, पुतळा अनेक भागांचे जोडकाम केल्याने नटबोल्ट गंजून पडला, अशा अनेक बाबी पुढे केल्या जात आहेत. एखाद्या खासगी अथवा स्वयंसेवी संस्थेने उभारलेला पुतळा पडला असता, तर त्यांचे सरकारी यंत्रणांकडून काय हाल झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.

 

ज्या वाऱ्याचे आणि पावसाळ्याचे कारण दिले जात आहे, त्याच्याशी नौदल नेहमीच झुंजत असते. त्यांच्याकडे सागरी व्यवस्थापन, हवामान याच्याशी संबंधित प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ आहेत. मग हा पुतळा असा कसा बांधला गेला? विशेष म्हणजे, पंतप्रधान जे कार्यक्रम स्वीकारतात, त्या कार्यक्रमाची आणि तेथील प्रत्येक गोष्टीची सखोल आणि तपशीलवार माहिती घेतली जाते. असे असताना हा प्रकार घडला आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी देखील मागितली आहे. आधी माफी मागा म्हणून विरोधकांनी आवाज उचलला आणि माफी मागितल्यावर त्यावर हि टीका करण्यात विरोधक कुठे कमी पडले नाहीत. अर्थात सत्तेत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हेच काम विरोधकांकडे राहिलेत का?

 

कधी कधी असे वाटते की या निष्प्राण निर्जीव पुतळ्यांत चमत्कार व्हावा आणि कुणीतरी प्राण फुंकावेत आणि त्यांनी त्यांचे मनोगत सांगावे आणि आपण ते ऐकावे. जिवंत माणसांना भेडसावणारे प्रश्न किती महत्वाचे आणि पुतळ्यांच्यावरून होणारे राजकारण किती महत्वाचे यावरील त्यांचं भाष्य तरी ऐकता येईल. पण एक मात्र निश्चित आहे ते हे नक्की म्हणार कि "आमच्या तत्वप्रणालींशी ज्यांचे काडीचेही सोयर-सुतक नाही अशी माणसे जेव्हा काही राजकीय हितसंबंध, स्वार्थ जोपासण्यासाठी आमची स्थापना करायला निघतात तेव्हाच आमची खरी विटंबना होते. ज्या वीरांनी, देशभक्तांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वतंत्र भारतातील किती जनता आज खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे याचा हिशेब द्या आणि बाबानो हे आमच्यावर राजकारण थांबवा"

 

एकदा का पुतळा उभारला की, त्यापासून काही प्रेरणा घेतली जाईल, असेही नाही. काही व्यक्तिमत्त्वांचे पुतळे दुर्लक्षित दिसतात. मंत्रालयाजवळ जमशेदजी टाटा यांचा पुतळा आहे. टाटांचे देशाच्या औद्योगिकीकरणातील योगदान सुविख्यात आहे. मग किती मान्यवर लोक त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीदिनी तिथे जातात?  पण प्रश्न खरा पुतळ्यांचा आहे, तो उभारण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. गरीबाच्या पोटाला पुरेसे अन्न द्या, बेकारांना नोकरी द्या, बेघरांना माफक दरात घरे द्या, महागाईचा आवळलेला फास सैल करा, ज्याच्या श्रमावर अवघा देश, राष्ट्र पोसले जाते त्या शेतकऱ्याची झोळी सुखाने भरा, जनावरांच्या हत्या करू नका, नैसर्गिक संपत्तीचे जतन करा, वाढत्या लोकसंख्येला आळा घाला, बाहेरून येणारे लोंढे थांबवा, जातीयतेला खतपाणी घालू नका  मग भले पुतळे उभारले नाहीत तरी चालेल.

 

आजही  काही पुतळ्यांचे अवयवांचीही पडझड झालेली दिसून येते. धुळीचे लोट या पुतळ्यावर वर्चस्व गाजवीत असतात. या पुतळ्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची कोणाचीच इच्छा नसते कारण हे पुतळे मुळी निर्विकार, निर्विचार, स्तब्ध, अचल असतात. पुतळे अजिबात उभारू नका पण आमचे विचार अंगीकारून कृपया समाजाचे हित साधा एवढीच या पुतळ्यांची कळकळीची विनंती असेल. जगात सगळ्यात जास्त पुतळे हे भारतात आहे. तरी हि दंगली अन समाजात अशांतता दिसून येते हि शोकांतिका या भारताची. त्याच जागी पुन्हा नव्याने पुतळा उभारण्यापेक्षासिंधुदुर्गसारख्या किल्ल्यांची चालु असलेली पडझड थांबवणे गरजेचे आहे प्रथम शिल्लक बुरुजांची डागडुजी ला हा पैसा वापरला गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तर आमच्या हृदयात आहेत, आमच्या घरात आहेत त्यांना चौकात एकांतात का ठेवायचे. महाराजांचे गड-दुर्ग त्यांची जिवंत स्मारकं आहेत तीच आमच्यासाठी श्रद्धा आहे.

 

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale