Tuesday, 26 March 2024

महाराष्ट्राचे नाथ - पैठणचे संत एकनाथ

 महाराष्ट्राचे नाथ - पैठणचे संत एकनाथ


स्वतयाचे कुळी दिपको दिव्य झाला॥

हरिभक्ती लागोनि तारी समस्ता।

नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा॥

 


संत हे चालते फिरते देवच. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. या संतांच्या भूमीत अनेक दिव्यज्योती जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कार्यातून देव, देश अन धर्म तसेच समाजसेवेचा संदेश दिला. अश्याच संतांच्या यादीत पैठणच्या एकनाथांचे नाव श्रेद्धेने घेतले जाते. 

 छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील पैठणमधील नाथ षष्ठी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्राचं. शके १५२१ ला फाल्गुन षष्ठीस नाथांनी समाधी घेतली. नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी एका तिथीला झाल्या. नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन करणारे संतकवी, पंतकवी व तंतकवी म्हणून एकनाथांची ओळख. श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणुन देखील साजरा करण्यात येतो. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. काला भरलेली हंडी सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती हंडी फोडण्यात येते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो.

 संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म .. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी त्यांच्याकडूनच वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. गुरुंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गुरुंच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला. नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली, हा इतिहास आहे. ज्ञानेश्वरांची विस्मृतीत गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा आणि गाभारा बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली. एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितले, ’माझ्या गळ्यास अजानवृक्षाच्या मुळीने वेढले आहे तु आळंदीस ये आणि मुळ्या काढ. पेतुन जागे झाल्यावर नाथांनी आपल्या भक्तगणंसमवेत आळंदीस प्रस्थान केले. तेथे पोचल्यानंतर सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली त्यांना दिसली. नाथ एके ठिकाणी बसले, श्री ज्ञानेश्वरांचे ध्यान केल्यानंतर नंदीच्या खालुन आत येण्याचे द्वार आहे असा दृष्टांत त्यांना झाला. सर्व मंडळींनी मिळुन झुडपे तोडली. नाथ नंदीखालील द्वारातून आत प्रवेश करते झाले. समोर प्रत्यक्ष तेज:पुंज मदनाचा पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज बसले होते. त्यांनी नाथांना आलिंगन दिले. नाथांनी माऊलीस नमस्कार केला. त्या दोघांचा दिव्य संवाद तीन दिवस चालला. नाथ बाहेर आले. त्यांनी समाधीचे दार बंद केले. ज्ञानेशांच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वरीची शेकडो हस्तलिखिते जमा करुन संशोधन केले. त्यात अनेक अपपाठ घुसविले गेले होते, लोकांनी आपल्या मनाच्या ओव्या अनेक ठिकाणी घातल्या होत्या. त्या सर्व वगळून नाथांनी श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याच्या अनेक हस्तलिखित प्रती तयार करवून सर्वत्र पसरविल्या. याच कारणाने नाथ हेच सर्व मराठी सारस्वतांचे आद्य संपादक ठरतात. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती नाथांनी शुद्ध केली आहे.

काशीहून रामेश्वरास वाहण्यात येणाऱ्या कावडीतील पाणी नाथांनी पाण्याविना तडफडत असलेल्या गाढवाच्या मुखात घातले व देव देवळात नसून तो चराचरात आहे हे सांगितले त्याचप्रमाणे प्राणीमात्रांवर दया करावी हेही त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले.

सर्वसामान्यांपासून ते मुक्‍तांपर्यन्त सर्वांसाठी नाथांनी विपुल प्रमाणामध्ये ग्रंथरचना करुन मराठी ग्रंथ भांडारात खुप मोठी भर घातली. तसेच अंधश्रद्धेवर कोरडे ओढुन श्रद्धेला प्रोत्साहन दिलं.

नाथ वाळवंटातून जात असता हरिजनाचे एक मूल तापलेल्या वाळूत रडत असल्याचे त्यानां दिसले. कोणताही स्पृश्य अस्पृश्यतेचा विचार न करता नाथांनी त्या बालकास कडेवर घेतले व त्याच्या घरी जावून त्याच्या आईकडे सुपुर्द केले. या घटनेतून नाथांनी आपल्याला समतेचा व बंधुत्वाचा संदेश दिला आहे.

पैठण येथील काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरुन एक यवन (मुसलमान) नाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकला तरीही नाथांना क्रोध आला नाही. उलट पान खाल्यानं तुझं तोंड भाजलं असेल घरी चल तुला मध चाखतो म्हणजे तुझ्या तोंडाचा दाह शांत होई असे सांगुन नाथांनी आपल्या आचरणाने शांतीचा संदेश आपणास दिला तसेच सत्याग्रह कसा असावा याचा वस्तुपाठही घालून दिला.

एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली. त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय, अत्याचार या विषयी ‘रोडगा या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली. महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिकस्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.

एकनाथांनी बोली भाषेत सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत साहित्यनिर्मिती केली. ‘विंचू चावला हे भारुड खूप गाजलं. त्याच प्रमाणे ‘दादला हे भारुड विनोदी अंगाने लिहून हसत हसवत आशय लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले.

एकनाथी भागवत, ४० हजार ओव्या असलेल्या भावार्थ रामायण, चिरंजीवपद , रुक्मिणीस्वयंवर, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध , आनंदलहरी, हस्तमालक टीका, चतुःश्लोकी भागवत, ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण  अश्या अनेक साहित्याची निर्मीती हि संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांनी केली. 

 - सचिन कृष्णा तळे

Monday, 25 March 2024

दुष्ट वृत्तीचा अंत करण्या पेटवू होळीच्या ज्वाळा

 

दुष्ट वृत्तीचा अंत करण्या पेटवू होळीच्या ज्वाळा

करू साजरा धुळवड अन रंगपंचमीचा सोहळा !

 


 

"आजादी है जिसको चाहो आज उसे वर लो, होली है तो आज अपरिचित से परिचय कर लो !

हरिवंशराय बच्चन यांच्या वरील ओळी प्रमाणे होळी अन त्यामागून येणारी धुळवड अन रंगपंचमी हा एकमेव असा सण आहे ज्या सणाची भारतीय लोक आतुरतेने वाट पाहत असतात. या सणाला बंधने नाही ना वयाची ना जातीची ना धर्माची ना श्रीमंत अन गरिबीची ना थोरांची ना मोठ्यांची. हा असा सण आहे ज्या सणात सगळ्यांना स्वतंत्र आहे ओळखी अन अनोळखी कोणालाही तुम्ही तुमच्या रंगात रंगवू शकता. प्रेमाची अन मैत्रीची थोडी मस्ती थोडी पाण्यात भिजण्याची. हा सण एकमेकांमध्ये एकता निर्माण करतो, प्रेम, आनंद व उत्साह वाढवतो. हा सण लहान मोठे, भाऊ बहीण, शेजारी-पाजारी सर्वांना सोबत राहून एक दुसऱ्याचे सहकार्य करण्याची शिकवण देतो.  या दिवशी सर्व लोक आपले दुःख विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करतात.

 

पाच दिवस होळी साजरी केली जाते आणि पाचव्या दिवसाला “रंग पंचमी” म्हटले जाते. परंतु अलीकडे धुळवड ज्या दिवशी खेळली जाते त्याच दिवशी रंगपंचमी देखील साजरी केली जाते. उत्तर भारतातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची आहे. आजकाल मराठी सण विसरून अनेक जण सर्रासपणे उत्तर भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. त्यामुळे आजकाल महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जात आहे. महाराष्ट्रातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिकावंदन करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची आहे. परंतु आजकाल अनेकांना धुलिकावंदन अर्थात धुळवड म्हणजे काय हे माहीत नसते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. याला धुलिकावंदन, धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात. धुलीवंदन म्हणजे वाईट विचाराचा संहार करण्यासाठी गाईच्या पवित्र शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या एकत्र करून त्यात गाईचे तूप, कापूर, उसाचे वाढे, एरंडची फांदी या सर्व वस्तू जाळतात. अग्नी प्रजव्लित करून त्याचा धूर केल्याने वातावरण शुद्ध होते अशी भावना आहे.

 

होळी अर्थात होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेला दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे. होळीचा सण साजरा करण्यामागे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक कथा सांगितली आहे. या कथेनुसार प्राचीन काळात एकदा हिरण्यकश्यप नावाच्या एका दैत्य राजाने अमरत्वाचे वरदान प्राप्त करून पृथ्वीवरील प्रजेला त्रास देणे सुरू केले. त्याची एक दृष्ट बहिण 'होलिका' होती. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते, ज्याद्वारे की सहज आगीत प्रवेश करू शकत होती. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. प्रल्हादच्या विष्णु भक्तीला कंटाळून हिरण्यकश्यपूने त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यासाठी त्याने आपली बहिण होलिका ची मदत मागितली. होलिका प्रल्हाद ला धरून आगीत जाऊन बसली, परंतु भगवान विष्णुच्या कृपेमुळे होलिका त्या अग्निमध्ये जळाली व भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर पडला. अशा पद्धतीने होलिका दहन झाले. यावरून लक्षात येते की होळी ही वाईटावर चांगल्याचा विजय दिवस आहे. तर काही धार्मिक ग्रंथ म्हणतात की होळी खेळण्याच्या दिवसाची सुरुवात राधा आणि कृष्णा यांनी केली होती.

 

धुळवडीत अन रंगपंचमीच्या दिवशी उधळले जाणारे रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी आपल्याला आनंदी आणि सकारात्मकतेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. खरं तर हाच धुलिवंदन हा सण साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. मनुष्याच्या आयुष्यात रंग आपल्या विचार, कृती आणि भावनांवर प्रभाव टाकण्यास मदत करतात. रंग वातावरण प्रसन्न करतात आणि उत्सवाची मोहकता वाढवतात. माहितीसाठी आजकाल मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी देखील कलर थेरपीची मदत घेतली जाते. या होळीच्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी ओळखले जाते. कोकणात शिमगो म्हणतात.

 

या दिवशी महाराष्ट्रात घराघरामध्ये पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला जातो. तर यादिवशी होळीला नारळ अर्पण करून आपल्यावर कोणतेही संकट न येवो यासाठी प्रार्थनाही केली जाते. कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो.  शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. अर्थात यावेळात शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजणी करून ठेवलेली असते. चाकरमानीही खास सुट्टी काढून शिमगोत्सवासाठी गावाला रवाना होतात. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात. नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात.

 

गुलाल उधळून, टिमक्या आणि ढोल वाजवून, तसंच आनंद नृत्य करून उत्साहात होळीच्या दिवशी आपले आदिवासी बांधव होळीचा सण साजरा करतात. होळी साजरी करताना आदिवासी लोकांच्या जेवणामध्ये गोड पुरी, मासे आणि गोड भात असा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. विविध नक्षीकामाचे दागिने घालून यामध्ये स्त्री आणि पुरूष सहभागी होतात आणि आपला आनंद दर्शवतात. विविध वाद्यांच्या तालावर इथे नृत्य साजरे करण्यात येते. तर मथुरेच्या बरसानाध्ये होणाऱ्या या होळीचा संबंध प्रेमाशी आहे. राधा कृष्णाचे प्रेम इथेच बहरले आणि कृष्ण आपल्या मित्रांसह राधेसह होळी खेळायला इथे यायचा असे समजण्यात येते. राधाकृष्णाच्या प्रेमाच्या रंगाची होळी आजही इथे लठमार होळीच्या प्रतिकासह साजरी करण्यात येते. कृष्ण राधेला खूपच त्रास द्यायचा आणि मग राधा काठीने त्याला मारायला यायची असा समज आहे. त्यामुळे आजही तशाच स्वरूपाची ही लठमार होळी खेळण्यात येते.

 

उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत होळी उत्सव हा सर्वांसाठी आनंद घेऊन येतो असे म्हटले तर नक्कीच वावगे ठरणार नाही.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

कोण होणार पुण्याची पसंत?

 

कोण होणार पुण्याची पसंत?

मुरलीधर, धंगेकर या वसंत


 

राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि पुण्याच्या मतदारांना एकचं प्रश्न पडला तो म्हणजे अण्णा ,भाऊ कि तात्या ? महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर तर महायुतीकडून पुण्याचे माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाली. तर दुसरीकडे खासदारकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन बंड करत कात्रज मधील वसंत मोरे यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न चालू ठेवले. मोहोळ आणि धंगेकर हि दोन नावे  समोर आली आणि मोरे यांच्यासाठी असणारी आघाडीची संधी हुकली असच म्हणावे लागेल. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीचा धडाका लावत मोरे यांनी पुण्यात शरद पवारांनी भेट घेतल्यानंतर थेट मुंबई गाठून त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही. लवकरचं मनसेकडून साईनाथ बाबर यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते. त्यामुळे पुणेकरांना खरी लढत हि मुरलीधर विरुद्ध धंगेकर विरुद्ध मोरे अशी पाहायला मिळणार यात शंका नाही.

 

कोथरूडच्या माजी आमदार आणि विद्यमान राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील छुपा संघर्ष पुणेकरांना माहितच आहे. मुरलीधर मोहोळ यांनी कसबा गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली तेव्हा भाजपकडून इच्छुक असलेले जगदीश मुळीक आणि मेधा कुलकर्णी यांची अनुपस्थित विचार करायला लावणारी होती. या अंतर्गत वादाचा फटका भाजप ला बसू शकतो यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेत लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांनी, सदिच्छा भेट घेतली. कोरोना काळात त्यांच काम पुणेकरानी पाहिलं आहे. आणि भाजप ला मानणारा मोठा वर्ग मोहोळ यांच्या पाठीशी असला तरी धंगेकर यांना सामान्य लोकांचा नेता म्हणून जी प्रशिध्दी मिळाली त्याला नजरेआड करता येणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस हा पक्ष न पाहता धंगेकर यांचं कार्य पाहत मतदान झाले. मुस्लिम बहुसंख्य असलेला मोमीनपुरा किंवा गंज पेठेतील बहुजन समाज अन पुण्यातील झोपडपट्टीतील नागरिकांचा तसेच दलित बांधवांचा लय या धंगेकरच्या बाजूने दिसून येतो.

 

भाजपने प्रचंड यंत्रणा लावूनही धंगेकरना  मिळणारा विजय हा त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा जरी असला तरी हि लोकसभेची निवडणूक आहे कसब्याची नाही हे आघाडीने लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्वाची अन लक्षवेधी ठरणार ती धंगेकर आणि मोहोळ यांची जात. धंगेकर हे स्वतः ओबीसी समजातून आहेत तर मोहोळ हे मराठा समाजातून. सध्या मराठा आरक्षणाच्या विषयावरून मराठा विरुद्ध ओबीसी हे दोन गट सक्रिय आहेत. त्यामुळे जसे जसे मतदानाचा दिवस जवळ येईल तसे तसे जातीवर आधारित आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण देखील खेळले जाण्याची शक्यता आहे. मोहोळ हे सत्तेत आहेत आणि मराठा समजाला अद्याप हव तस आरक्षण विद्यमान सरकारकडून मिळाले नाही. त्यामुळे मराठा समाजाची नाराजी मोहोळांना महागात तर धंगेकरांना फायदेशीर ठरेल.

 

वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत वादावर प्रश्नचिन्ह उपस्तिथ केल्यामुळे पुणे शहरात असणारे महाराष्ट्र सैनिकांचा राग मोरेना झेलावा लागणार. लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. राज ठाकरेंनी मला ती संधी दिली तर शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका बजावेन, असा दावा वसंत मोरेंनी केला होता. परंतु त्यांना मसनेकडून संधी मिळणार नाही हे उघड दिसत होते. आघाडीचे अन युतीचे मतदान त्यांना मिळणार नाही. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली पण तिकीट मिळेल याची खात्री नव्हती. तात्यांच्या हातोड्या ने अनेकांचे प्रश्न सोडवले. जनतेसाठी खुला दरबार त्यांनी भरवला. सोशल मीडियावरून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. कोरोना काळात देखील वसंत मोरे यांनी त्यांची दमदार कामगिरी दाखवून दिली. 'काहीही झाले तरी आपण पुण्यात मैदानात उतरणारच,’ असा निर्धार मोरे यांनी बोलून दाखवला.

पत्रकार मीडिया तसेच पुण्यातील अनेक छोटे मोठे सामाजिक संस्था अन कार्यकर्ते यांच्याशी मोरे यांचा दांडगा संपर्क असला तरी आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना आसमान दाखवण्यासाठी मोरे यांना फार मेहनत घ्यावी लागणार.

 

पुण्यात आता भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि अपक्ष म्हणून वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार, याचा नेमका कोणाला फायदा आणि तोटा होणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

 

 

मुरलीधर मोहोळ

मुरलीधर मोहोळांचा पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. ते पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी २००२, २००७, २०१२ आणि २०१७ झाले आहेत. २०१७-१८ पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष राहिले होते. २०१९- २०२२ मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते. कोरोना काळात मोहोळांनी आपलं पुणेकराप्रती असलेली काळजी आणि प्रेम दाखवून दिलं. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यातील प्रमुख नेत्यांपासून केंद्रातील नेत्यापर्यंत प्रत्येक वरिष्ठ नेत्याशी त्यांचा चांगला संपर्क देखील आहे. २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद होते. २०२३ मध्ये प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती.

 रवींद्र धंगेकर

विधानसभेत भाजपच्या बालेकिल्ल्याला ४० वर्षांनी सुरुंग लावत काँग्रेस ला विजय प्राप्त करून देत चर्चेत रहाणारे रवींद्र धंगेकरांनी आज पुण्यात चांगलीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक ते आमदार अशी त्यांची ओळख.  शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९७मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. १९९७ , २००२ , २०१२ या कालावधीत ते नगरसेवक झाले. शिवसेना ते मनसे ह्या प्रवासानंतर २०१७ ला त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये मनसेकडून कसबा पेठ विधानसभा लढवून त्यांनी ४६ हजार ८०० मते मिळवून सर्वांचे लक्ष वेधले होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव करीत धंगेकर प्रकाशझोतात आले. सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहणारे, अडीअडचणीत धावून येणारे लोकप्रतिनिधी अशी धंगेकर यांची ओळख.

 वसंत मोरे- 

वसंत मोरे यांची पहिली ओळख म्हणजे कट्टर राज समर्थक. २००७ मध्ये झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले. या विजयात वसंत मोरेंचा मोलाचा मोठा वाटा होता. साल २०१७ मध्ये वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले. पुणे महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद देखील भूषवले आहे. जनतेची केलेली सेवा ते व्हिडीओमार्फत सोशल मीडियावर टाकतात. त्यामुळेच त्यांना राज्यभरात ओळख.

  

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

Thursday, 21 March 2024

बल्लाळगड - महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील एक डोंगरी किल्ला

 बल्लाळगड - महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील एक डोंगरी किल्ला



छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ या काळात मोरोपंताना ६००० ची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात बल्लाळगड स्वराज्यात दाखल झाला. इ.स. १६८३पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगीज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकून घेतला, तेंव्हा बल्लाळगड जिंकला. पुन्हा इ.स. १७५४मधे हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मधे झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७मधे गोगार्डच्या अधिपत्याखालील इंग्रज सैन्याने बल्लाळगड जिंकला. 


महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहे. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाला खेटून बलाळगड किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा किल्ला होता. या भागात असणाऱ्या इतर किल्ल्यांच्या मानाने (सेगवा, असावा, अशेरीगड इत्यादी) बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने अर्ध्या तासात किल्ला सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात.



किल्ल्याची उंची : पायथ्यापासून ५०० मीटर. किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग डोंगररांग : पालघर जिल्हा : श्रेणी : सोपी



चला पाहुया या ठिकाणी पोहचण्याचा वाटा :

काजळी हे बल्लाळगडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १३० किमी वरील तलासरी गाठावे लागते. त्यापुढे अंदाजे १९ किमीवर (मुंबई पासून १४९ किमीवर) काजळी गाव आहे. पण या गावाचा बोर्ड महामार्गावर न लावल्यामुळे, गाव आल्याचे कळत नाही. या गावाबाहेरच्या महामार्गालगत (मुंबईकडून अहमादाबादला जाताना डाव्या बाजूला) काजळी गावाकडे जाणारा फाटा आहे. या फ़ाट्यावराुन पुढे गेल्यावर गावातील शाळेपाशी पोहोचता येते. या शाळेसमोरील टेकडीवर बल्लाळगड आहे.

रेल्वेने तलासरी / अच्छाड/ भिलाड/ संजाण यांपैकी कुठल्याही रेल्वे स्थानकावर उतरून, स्टेशनाबाहेर मिळणाऱ्या खाजगी जीप/ओमनी या वाहनांनी काजळी फाट्यावर उतरावे लागते. तेथून चालत ५ मिनिटात माणूस गावातील शाळेजवळ पोहोचतो.

शाळेसमोर हातपंप आहे. त्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यातून पाणी भरून गड चढतात. कारण गडावर पाणी मिळत नाही..

काजळी गावाच्या मागे बल्लाळगड आहे. गावाच्या शाळेसमोर एक गोरखचिंचेच झाड आहे. त्याच्या उजव्या बाजूने एक कच्चा रस्ता टेकडीवर जातो. परंतु या रस्त्याने न जाता डाव्या बाजूच्या मळलेल्या पायवाटेन १० मिनिटाचा खडा चढ चढून माणूस गडावर पोहोचतो.

गडावर पहाण्याची ठिकाणे : 

बल्लाळगडाच्या माथ्याच्या अलीकडे एका झाडाखाली एक वीरगळ ठेवलेला आहे. महाराष्ट्रात अनेक वीरगळ आहेत त्याहून हा वीरगळ वेगळा आहे. या वीरगळावर एक योद्धा घोड्यावर बसलेला दाखवलेला आहे. हा घोडा काठेवाडी पद्धतीचा आहे. सुंदर सजवलेला आहे. त्या वीरगळावर सूर्य चंद्र दाखवलेले आहेत. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या या किल्ल्यावर वीरमरण आलेल्या वीराचा वीरगळ पाहाण्यासारखा आहे.

वीरगळ पाहून बलाळगडाच्या माथ्याकडे चालत गेल्यास चार बुरुजांनी व तटबंदीने संरक्षित केलेला बल्लाळगडाचा माथा लागतो. त्यावरच्या ४ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष आज २१व्या शतकातही पाहायला मिळतात. तटबंदी १५ फ़ूट उंच असून ५ फ़ूट रुंद आहे. प्रचंड मोठे दगड वापरून ती तटबंदी बनवलेली आहे. तटबंदीमधे शौचकूप बनवलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या आत दोन मोठे हौद आहेत. त्यात दगड आणि पालापाचोळा पडल्याने ते भरून गेले आहेत. त्यांचे नक्की प्रयोजन कळत नाही. कदाजित धान्य किंवा दारुगोळा यांच्या साठवणुकीसाठी त्यांचा वापर झाला असावा. हौदांची साफ़सफ़ाई झाल्यास त्यांचे नक्की प्रयोजन कळू शकेल.



महत्वाचे - 

गडावर राहाण्याची सोय नाही. गावातील शाळेत होऊ शकते. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलात तुम्ही जेवण करून किल्ल्याला भेट द्यावे. गडावर पिण्याचे पाणी नाही आहे. काजळी या गावातून १० मिनिटांत बल्लाळगडावर पोहोचता येते. आणि महत्वाचे म्हणजे सेगवा आणि बल्लाळगड हे किल्ले एका दिवसात पाहून होतात.. 


तर आवर्जून भेट द्या .. आपल्या ऐतिहासिक किल्ल्याने आणि त्याची माहिती व फोटो सोशल मीडियावर शेर करायला विसरू नका. 

Friday, 8 March 2024

"संगीतावर" बोलू काही ...

 

"संगीतावर" बोलू काही ...




कवींच्या हृदयातून त्याच्या नजरेतून त्यांच्या विचारांतून कागदावर वृत्तबद्द शब्दांची एक सुंदर लय तयार होते. त्याला आपण कविता म्हणतो गझल म्हणतो गीत म्हणतो. त्या शब्दांना सुंदर चाल लागते त्या चालीवर मनाला स्पर्शून जाणारं संगीत तयार होत. त्यांनतर मानवी मनाला व्यक्त होण्याचं एक सुंदर असं साधन मिळत ते म्हणते गाणी. नादयुक्त गायन, वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगम म्हणजे संगीत होय.

आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात. संगीत आयुष्याला प्रेरणा देते. एकांत दूर करते. प्रेम करण्यास भाग पाडते. मार्ग दाखवते. राग, वैराग्य, आक्रोश, आनंद, भक्ती, शक्ती तर कधी कधी अंगात चेतना अन एक नवा संदेश देण्याचं महत्वपूर्ण कार्य संगीत करत असते. संगीत हा एक आनंददायी आवाज आहे जो सुरांचा आणि सुसंवादाचा मिलाफ आहे आणि जो तुम्हाला शांत करतो. तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारा दुवा म्हणजे संगीत आहे. संगीतामध्ये सरगम, राग, ताल इत्यादींचा समावेश असतो. संगीत हे केवळ मानवांनी बनवलेले नसून ते निसर्गातही असते. तुम्ही कधी धबधब्याचा किंवा वाहणाऱ्या नदीचा आवाज ऐकला आहे का? तुम्हाला तिथे हि संगीत ऐकू येईल. पक्ष्यांच्या किलबिलाट मध्ये संगीत आहे, मोराच्या अन कोकिळेच्या आवाजात सुंदर संगीत आहे. आपल्या आसपास सैरभैर उनाड वारा देखील कधी कधी संगीत निर्माण करत असतो. पावसाच्या कोसळणाऱ्या धारेत संगीत आहे. शाळेच्या आवारात वाजणाऱ्या घंटेत देखील संगीत आहे.

संगीतामध्ये व्यक्तीला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या बरे करण्याचे मोठे गुण असते. संगीत हे ध्यान साधनेचा एक सुंदर प्रकार देखील आहे. संगीत तयार करताना किंवा ऐकत असताना माणूस त्याच्या सर्व चिंता, दुःख आणि वेदना विसरतो.  द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाच्या बासरीतून निघालेल्या संगीताने गोपीच काय तर गाय वासरे देखील मंत्रमुग्ध झाल्या. कृष्णाच्या बासरीतून निघालेल्या संगीतात इतकी ताकद होती कि ऐकणारे स्वतःला त्याच्या स्वाधीन करायचे. संगीत हे भगवंताशी जोडण्याचे एक अतिशय शक्तिशाली माध्यम आहे. संगीत हे ईश्वराच्या उपासनेचे आणि आपल्या आत्म्याशी जोडण्याचे सर्वात शुद्ध प्रकार देखील आहे. चांगल्या संगीतातला प्रत्येक स्वर हा स्वयं प्रकाशित असतो त्याच्या सुंदर आवाजाने आपण देखील अंतर्मनातून प्रकाशित होत असतो.  पहाटे पहाटे गायिले जाणारे राग हे आरोही चलनांनी गायिले जातात. सकाळच्या बऱ्याच रागांचा वादी स्वर धैवत असतो. धैवत म्हणजे धारिष्ट्य. धैवत म्हणजे कामसूपणा. धैवत म्हणजे उत्साह.

विविध वाद्यांच्या तालमीतून एकत्र आणला जाणारा आवाज म्हणजे संगीत ही जीवनाची वैश्विक भाषा आहे. माणसाच्या जीवनात संगीत नसेल तर ते किती भक्कास वाटेल याची कल्पना करून तरी पहा. संगीतात  चिंता, नैराश्य, निद्रानाश इत्यादी रोग बरे करण्याची शक्ती असते. संगीताच्या सामर्थ्याची साक्ष म्हणजे तानसेनने राग मेघ मल्हार गाऊन पाऊस पाडला होता. एकाग्रता सुधारण्यास संगीत फार मदत करते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात चांगल्या संगीताची रुची वाढली पाहिजे. कमी शब्दात सखोल अर्थ सांगणार संगीत जीवनातील वेदनां कमी करण्यास मदत करते. अगदी सोप्या आणि आताच्या भाषेत सांगायचं तर संगीत हे मूड फ्रेशनर आहे. संगीताचा थेट परिणाम आपल्या हार्मोनल पातळीवर होत असतो. संगीत ऐकल्याने आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होते आणि दीर्घकालीन तणावाच्या प्रभावाचा प्रतिकार होतो. संगीत कानांद्वारे हृदयाला भिडत असते म्हणून झोपण्यापूर्वी शास्त्रीय किंवा आरामदायी संगीत ऐकल्याने झोप सुधारते.

ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचा सहवास नित्य मिळाल्यावर त्याच्या स्वभावातले बारकावे आपल्याला कळू लागतात, त्याचप्रमाणे स्वरांचा नित्य सहवास लाभल्यावर आपल्याला त्या संगीतातले बारकावे सहज कळून येतात. संगीताची खरी निर्मिती हि आपल्या आसपासच्या निसर्गातूनच झालेली आहे. आपल्या प्रत्येक भावना ह्या संगीतातील स्वरांशी बांधल्या गेलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक आठवणी ह्या संगीताशी जोडलेल्या असतात. संगीताचा शोध कोणी लावला हे कोणालाही माहिती नाही. पहिले गाणे कोणी गायले, किंवा पहिली ट्यून कोणी वाजवली किंवा आज संगीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या लयबद्ध ध्वनी कोणी तयार केल्या हे सांगण्यासाठी कोणताही ऐतिहासिक पुरावा अस्तित्वात नाही. यावरून विचार करा कि मानवाच्या निर्मीतीच्या अगोदरच्या काळापासून संगीत आहे. कोसा कोसावर जशी भाषा बदलते तसेच संगीत देखील बदलताना दिसते. त्यामुळे संगीतातले बारकावे समजून घेत संगीत प्रेमी व्हा आणि जीवनात एक वेगळा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्य फार सुंदर वाटेल.

-          सचिन कृष्णा तळे

Thursday, 7 March 2024

गडकरींचा पत्ता कट..? भारतीय जनता पार्टी यावेळी नितीन गडकरींना उमेदवारी देणार का..?

गडकरींचा पत्ता कट..? भारतीय जनता पार्टी यावेळी नितीन गडकरींना उमेदवारी देणार का..?
#NitinGadkari  |  #आहेतेआहे  |  #निवडणूक


 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale