Saturday, 27 July 2024

पुण्याची तुंबई केली कोणी ?

 पुण्याची तुंबई केली कोणी ? 

मुंबई ची तुंबई कशी होते कश्यामुळे झाली याच जिवंत उदाहरण पुणेकरांकडे असताना पुणेकर शांत कसे ? 



" जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली. पुणे शहरआणि घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शिरूर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तसेच खडकवासला परिसरात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुळा मुठा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुणेकर सावध झाले. पण काहीभागात घरातील सामान पाण्यावर तरंगत असल्याने दयनीय स्थिती झाली होती. काही वर्षांपूर्वीच पावसाचं रौद्र रूप पुणेकरांनी अनुभवले असताना देखील हवे तसे नियोजन पुण्यात दिसून आले नाही. पुण्याची पुन्हा तुंबई झाली याला जवाबदार कोण ? महानगरपालिका कि आपण ? २०२१ मध्ये अतिक्रमण विभागाला कोणी विरोध केला ? पुण्यात पावसामुळं शहरात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र गेल्या काही वर्षांत वारंवार पाहायला मिळत आहे."


२५ सप्टेंबर २०१९ , पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस. पेशव्यांच्या आधीपासून अस्तित्व असेलेला आंबील ओढा पुण्येकरांच्या डोळ्यात पाणी आणेल असे वाटले नव्हते. एका रात्रीच्या तुफान पावसाने कहर आणला आणि पुण्याच्या दक्षिण भागात अक्षरशः पुर परिस्तिथी निर्माण झाली. कोट्यवधींच नुकसान झाले. या पावसाचे रूप पाहून पुणेकरांच्या मनात भीती भरली. दांडेकर पूल , मित्र मंडळ, जेधे चौक, अरण्येश्वर , पर्वती , मार्केटयार्ड , पद्मावती, स्वामी विवेकानंद चौक या भागात इतकं पाणी साचले कि नागरिकांच्या गाड्या तसेच अनेक मालमत्तेचं नुकसान झालं. हे चित्र असताना शहरातील दांडेकर पुलापाशी आंबील ओढ्या जवळ असणाऱ्या वस्ती वर अतिक्रमण कारवाई करण्यास गेली. आंबील ओढ्याची रुंदी वाढवून तिथे संरक्षण भिंत उभी करण्याचे काम देखील चालू झाले पण या कामाला २०२१ मध्ये स्थानिक लोकांच्या विरोधाने स्थगिती आली. दरम्यान या लोकांसाठी राहणायची सोया देखील करण्यात आली होती तरीही मोठ्या प्रमाणात लोकांनी विरोध केला. आज याच भागात पुन्हा पाणी शिरले त्याला जवाबदार प्रशासन कसा हे नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. 


काही दिवसांपूर्वी पुन्हा असाच अनुभव ने पुणेकर भयंकर चिंतेत आले. महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई आणि चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले. धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळं पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पण यापेक्षा हि गंभीर कारणे आहेत. अनधिकृत झोपडपट्टी, इमारती बांधकाम ची चढाओढ, नालेसफाईकडे दुर्लक्ष, सिमेंटचे रस्ते अशी अनेक कारणं यामागं असल्याचं चर्चांमधून पुढं येत आहे. आधी आपल्याकडे टार रोड होते, बाजुला माती असल्यानं तिथून पाणी जात होतं. पाऊस आला तरी तो तिथून जात होता. पावसाचं जमिनीत जाण्याचं प्रमाण जास्त होतं. पण आता ९० टक्के पाणी वाहतं. ते जमिनीत जात नाही. फक्त सिमेंटचे रोड नाही, तर आपल्याकडं एका ठिकाणी अनेकदा जी कामं होतात, त्यात अनेकदा रस्ते खोदले जातात. त्यात चेंबर डिस्टर्ब होतात. 


अगदी काही वर्षांपूर्वीच पुणे शहर मोस्ट लिव्हेबल सिटीच्या यादीत आलं होतं. मात्र आता हे शहर तुंबत चाललं आहे. अगदी पंधरा मिनिटं ते अर्धा तास कोसळणाऱ्या पावसानंही ते तुंबल्याचं दिसत आहे. आंबील ओढ्याला पूर आला तेव्हा पुणे शहरातले नदी नाले प्रवाह याच्या पाहण्या करण्याच्या घोषणा झाल्या. हानी झाली आणि उपाययोजनाही आखण्यात आल्या. त्यानंतर आंबील ओढ्याचं खोलीकरण, भिंती बांधंणं असे प्रकार झाले. सरकार प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे पण त्याला साथ नागरिकांनी हि दिले पाहिजे. नदीपात्रात तुम्ही घरे बांधणार , ओढ्यात बांधकाम करून ओढा लहान करणार , पाण्याच्या वाहत्या प्रवाहात कचरा टाकून अडथळे निर्माण करणार आणि प्रशासन ने त्याला विरोध केला तर स्थानिक लोकप्रतिनिधीला मतांची भीती दाखवून हक्क गाजवणार मग जेव्हा निसर्ग त्याच्या मूळ रूपात येतो तेव्हा तुम्हीच डोळ्यात पाणी घेऊन त्याच प्रशासन ला मदत मागणार हे किती दिवस चालणार पुणेकर. मुळा मुठा ला पूर आल असं नाही तर मुळा मुठा तिच्या मूळ रूपात आली आहे. पावसाळा सोडला तर हीच मुळा मुठा काय अवस्थेत वाहते हे सांगण्याची गरज नाही. शहरातील सगळं सांडपाणी आणि त्यासोबत वाहत येणारा कचऱ्याने मुळा मुठा वर्षभर नदी वाटतच नाही हो ! ती जर काहीदिवस तिच्या मूळ रूपात येत असेल तर त्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण भितो आणि पळू लागतो याला जवाबदार ती नदी अन पावसाचं पाणी नसून आपण आपल्या हातून केलेली निसर्गाची चेष्टा आहे. वेळ गेली नाही मुंबई ची परिस्तिथी तुमच्या डोळ्यसमोर आहे. पुण्याची तुंबई करून पुण्याच नाव खराब करू नका. त्याच नैसर्गिक वारसा आपण जपला तरच आपण खरे पुणेकर होऊ.


सचिन कृष्णा तळे 

Friday, 19 July 2024

एकीकडे वाघनखाचा सोहळा, दुसरीकडे विशाळगड सारख्या अनेक किल्ल्यांचा आक्रोश राजे पाहवत नाही हे ... !! .

 

एकीकडे वाघनखाचा सोहळा, दुसरीकडे विशाळगड सारख्या अनेक किल्ल्यांचा आक्रोश

राजे पाहवत नाही हे ... !! .

 


" अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ज्या ठिकाणी पराक्रम गाजवला ज्या ज्या वस्तुंनी अन वास्तू वर लढा दिला ते सगळे महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी प्रिय आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याची राजधानी असलेला विशाळगड हा तिथे चालू असलेल्या धार्मिक अतिक्रमण ने आक्रोश करतोय तर दुसरीकडे जी वाघनख घालून महाराजांनी ज्या अफजल चा कोथळा बाहेर काढला त्या वाघनखांचा सोहळा. छत्रपती या शब्दावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींनी ती वाघनख पाहून आनंद साजरा करावा कि महाराजांची जी गडकिल्ले राखली त्याची अवस्था पाहून दुःख करावं. इथले बांधकाम पाहिल्यास, गड नेमका कसा असतो हे विसरून जाऊ अशी भीती वाटते आज. किल्ल्यांची मालकी सध्या महाराष्ट्र सरकार च्या अंतर्गत राज्य पुरातत्व विभागाकडे असताना गडावर अतिक्रमण ला कारवाई करणाऱ्या अधिकारी यांचं निलंबित कधी करणार ? "

 

गडावरील अतिक्रमण विरोधात जे आंदोलक जमले त्यांना गडावर जाणाऱ्या दिशेने पोलिसांनी रोखलं. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवप्रेमींच्या हातून पायथ्याशी असलेल्या गजापूर आणि मुस्लिमवाडी या दोन ठिकाणी अनपेक्षित घटना घडल्या त्याचा प्रतिसाद देशभरात उमटले, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून या घटनेला दंगलीच रूप देण्याच पाप काही मंडळी जाणूनबुजून करताना दिसतायत. जे घडलं ते निषेधार्थ आहे. पण विशाळगडावर जे घडवलं जात आहे ते हि निषेधार्थ आहे हे आपले मुस्लिम बांधव कधी समजून घेणार ! विशाळगड जिंकण्यासाठी आलेला सरदार मलिक रेहान हा तुमचा देव कसा होऊ शकतो?

 

महाराजांना यवनांच्या तावडीतून सुखरूप पोहचण्यासाठी बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू या दोन सख्या भावंडानी या विशाल गडाच्या पायथ्याशी घोडखिंड उभी करत रक्ताने माखलेल्या अवस्थेत मावळ्यांच्या रक्ताच्या वाहत्या प्रवाहात शेवटचा श्वास घेतला ! पन्हाळा च्या वेढ्यातून छत्रपतींचा प्राण ज्यांनी वाचवला त्या दोन महापुरुषाच्या ह्या समाध्या आजही ऊन वारा पाऊस सोसत उघडयावर आहे. ना त्यावर दिवाबत्ती ना फुलांची माळ ना प्रकाश. उलट याच गडावर घरे आणि काही दर्गा मशिदी उभारले जातात. त्यांना वीज , पाणी , अन्नधान्य इतकंच नाहीतर दुकानांना परवानगी देखील दिली जाते. या वस्ती मुळे मोठ्या प्रमाणात होणारा कचरा अन अवैध्य रित्या चालवले जात असलेले हॉटेल्स. जे शिवप्रेमी गडाला भेट देण्यासाठी येतात त्यांना काही ठिकाणी दारू चे बाटल्या देखील आढळून आल्यात. अश्यावेळी त्या शिवप्रेमींकडून राग व्यक्त होणे हे साहजिकच आहे. आणि हाच राग गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर मांडला जात आहे. जे आजवर गडावर गेले नाहीत ते देखील तिथली अवस्था पाहून अस्वस्थ आणि राग व्यक्त करत आलेत. ह्याच रागाचा एक भाग म्हणजे झालेली घटना आहे हे मुस्लिम बांधव कधी समजून घेणार

 

विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले काही दिवस आंदोलनाचा इशारा दिला जात होता. पण, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संभाजीराजे यांनीचलो विशाळगडचा नारा दिला. त्यानुसार राज्यभरातील शिवभक्त सकाळपासूनच गडावर पोहोचू लागले.  अतिक्रमण केलेल्या दुकानांची मोडतोड, तोडफोड केली. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. दुपारनंतर गडावरील परिस्थिती आटोक्यात आली. दोषीवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली. ज्या काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या, पण तो शिवभक्तांचा आक्रोश होता. जर सरकारने दोन दिवस आधीच हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. प्रसंगी माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवर गुन्हे दाखल करू नका, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. उलट याच शिवभक्तांना कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज अतिरेकी ठरवतात. तर याच दिवसांत साताऱ्यात शिवप्रेमी साठी सरकार तर्फे वाघनखांच दर्शन.

 

विशाळगड मार्गावर असलेल्या गजापूरला ऐतिहासिक महत्व आहे. या गावाने स्वराज्यात अनेक मोहिमा पाहिल्यात. अनेकांना आश्रय दिलंय. या गावातील लोकांचा देखील हेच म्हणे आहे कि "गडावरील अतिक्रमणाची शिक्षा आम्हाला का". आंदोलक येणार आणि तिथे काहीही होऊ शकत याची पूर्वकल्पना प्रशासन असताना प्रशासन ने पोलीस बंदोबस्त गडासोबत या मुस्लिम वस्तीत का वाढवली नाही हा सुद्धा एक प्रश्न इथे उपस्थति राहतोच. राग कोणत्या प्रकारे आणि कुठे निघेल हे सांगता येणार नव्हतं. खरंतर गडांचं अस्तित्व फार पूर्वीपासूनचं; पण निसर्गाच्या, संरक्षणाच्या, विकासाच्या व राजकीयदृष्ट्या गडकिल्ल्यांचे महत्व शिवरायांनी जाणले आणि त्यांच्याच आधारे इथली संस्कृतीही राखली. हीच संस्कृती पुन्हा राखण्यासाठी गजापूर चे रहिवाशी शिवप्रेमींना मदत करतील का? पायथ्याशी असलेल्या लोकवस्ती याना गडावर चालेल्या अतिक्रमण ची माहिती होती तर त्यांनी विरोध का केला नाही? याच गजापूर आणि मुस्लिम वाडीतील काही लोकांचे दुकाने गडावर नसतील का ?

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फायदा घेत कितीही राजकारण केले आणि 'जय भवानी जय शिवाजी' म्हणत कितीही मोठमोठ्या घोषणा दिल्या तरीही शिवाजी महाराजांच्याप्रती असणारी आस्था ही केवळ राजकीय स्वार्थासाठीच असल्यामुळे किल्ल्यांची दुर्दशा झालेली आहे. नुसता अभिमान बाळगून काय उपयोग? आपल्या पुढच्या पिढीसाठी किल्ल्यावरील बांधकाम मध्ये काही दुरुस्ती करून पुढील पिढी साठी संरक्षित करणे गरजेचे आहे. हे करताना मूळ वास्तूला धक्का न लावता काहीतरी चांगले करणेच गरजेचे आहे.महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे तसेच या किल्ल्यांची दुरुस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी गड-किल्ले संवर्धन समिती नेमण्यात आली आहे तसेच पुरातत्व खात देखील आहे. विशाळगड एकेकाळी पूर्ण स्वराज्यतला अतिशय कणखर आणि सुरक्षित किल्ला.  किल्ला वर  शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन सिद्दी च्या वेढ्यातून सुटले आणि संभाजी महाराज च्या मृत्यूनंतर राजाराम महाराज पण रायगड वरून याच किल्ल्यावर आश्रय घेतला. असा हा बेलाग किल्ला हल्ली हा आता फक्त नवसा साठी पावणारा प्रसिद्ध दर्गा साठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी स्वराज्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या तसेच स्वराज्याचे वैभव असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंना अवकळा पसरली आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गडकिल्ल्यांच्या ढासळलेल्या भिंती आणि बुरुज, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, जीर्ण झालेले माहिती फलक अशी सद्यस्थिती महाराष्ट्रातील जवळपास सर्वच किल्ल्यांची आहे. किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे किल्ले दुर्लक्षितच राहिले. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी रान माजले आहेत, तट फोडून बाहेर झाडांची मुळे बाहेर आली आहेत, ठिकठिकाणी दलदल वाढले आहे यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुरवस्था फारच बिकट आहे. किल्ल्यांच्या डागडुजी साठी महाराष्ट्रात निधी लवकर मिळत नाही आणि मिळाला तरी तो सगळाच निधी संवर्धन समितीपर्यंत पोहचत नाही. आपल्याला शिवाजी महाराज हे फक्त घोषणा द्यायला आणि त्यांच्या नावाने सत्तेचे आणि जातीपातीचे राजकारण करण्यासाठी हवे आहेत … त्यांचा वैचारिक वारसा, त्यांचे शौर्य, त्यांचा प्रताप, त्यांचा स्वाभिमान वगैरे गोष्टींशी आपला काहीही संबंध राहिलेला नाही  हेच सत्य आहे.

 

 - सचिन कृष्णा तळे 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, 12 July 2024

वारकऱ्यांचा एकचं नेता एकचं पक्ष - दिंडीरवन चा पांडुरंग

 

वारकऱ्यांचा एकचं नेता एकचं पक्ष - दिंडीरवन चा पांडुरंग




 

"ज्ञानेश्वर माउली अन तुकोबांच्या अन समकालीन संतांच्या उपस्तिथीत चालू झालेली पांडुरंगाची वारी आजही भक्तिभावाने अखंड चालू आहे. वारीत सामील झालेल्या सर्व दिंड्या नेतृत्व आजही आपले ज्ञानबा तुकोबा चं करत आहेत. आषाडी एकादशी दिनी त्या भीमा चंद्रभागा किनारी महामेळावा भरतो आणि या महामेळाव्याचा एकच नेता एकच पक्ष पांडुरंग पांडुरंग. अश्यावेळी वारकऱ्यांना आपलंस करून स्वार्थ साधणारी विविध राजकीय मंडळी केविलवाणा प्रयत्न करताना दिसतातं. पण त्या राजकीय नेत्यांना काय ठाऊक उन्ह वारा पाऊस झेलत शेकडो मैल चालणारा वारकरी तुमच्या शब्दांचा भुकेला नसून तो तर पांडुरंगाच्या दर्शनाचा भुकेला आहे. जिथे मोह माया सत्ता काहीच उपयोगी नाही, जिथे स्वार्थाला श्रीमंतीला मोठेपणाला स्थान नाही अश्या वारीत जिथे फक्त माणुसकी पाहिली जाते माणुसकी पुजली जाते. जिथे जातीला नाही तर मातीला कपाळी लावली जाते. अश्या वारीत राजकीयांची घुसकोरी निषेधार्थ आहे""

 

प्रत्येक वर्षी वारी आळंदी देहू वरून निघाली कि रस्त्याच्या बाजूला अन वारीत हमखास स्वतःच्या पक्षाचं बॅनर बाजी करत काही नेते मंडळी घुसकोरी करतात. मिडिया घेऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अश्यावेळी भक्तिभाव कमी करून राजकीय शक्ती प्रदर्शन जास्त दिसून येत. काही वारकरी भुलतात अश्या गोष्टींना तर काहींना फक्त ओढ असते पांडुरंगाच्या दर्शनाची. नेता येतो डोक्यावर पगडी फेटा बांधून चार पाऊले चालतो.. नाचतो.. बोलतो..  मतांची भीक मागतो अन जातो आलिशान चार चाकी गाडीत बसून. त्याच्या बाजूला त्याचेच सेवेकरी अन त्याचेच कार्यकर्ते अन त्याचीच मीडिया. असो.. आपला विषय राजकीय नेत्यांचा नसून वारकऱ्यांच्या पांडुरंगाचा आहे.

 

द्वारकेचा श्रीकृष्ण दिंडीरवणात आला -

दिंडीरवन चा पांडुरंग म्हणजे पंढरपूरचा श्री हरीच. आताचे प्रसिद्ध असलेले पंढरपूर हे स्थान आधी दिंडीरवन म्हणून नावारूपाला होते. डिंडिरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. हा पांडुरंग दिंडीरवनात कसा आला त्याची एक सुंदर कथा आहे. कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून उपर्युक्त दिंडीरवनात ( पंढरपुरात ) येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि वेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. रुक्मिणीस भेटून तिची समजूत काढून तिला द्वारकेस घेऊन जाताना दिंडीरवनात मातृपितृभक्त पुंडलिकाचे घर दिसले. मग पुंडलिकाने श्रीकृष्णास पाहिले एक वीट श्रीकृष्णांकडे टाकली कृष्णास सांगितले की थांब ह्या विटेवर माझ्या आईवडिलांना झोप लागली की येतो. मग थोड्या वेळात तो श्रीकृष्णास भेटला मग पुंडलिकाचे आईवडील ही भेटले. मग पुडलिकाने श्रीकृष्णाकडे वरदान मागितले की देवा आपण इथेच दिंडीरवनात भक्ताच्यासाठी कायम निवास करावा. निरोप घेऊन श्रीकृष्ण रुक्मिणी द्वारकेस परत निघाली तेव्हा परत निघताना ब्रम्हदेवास बोलावून विटेवर उभ्या असलेल्या श्रीकृष्णरूक्मीणीच्या मूर्ती (विग्रह) तयार करवून पुंडलिकास भेट दिल्या मग नंतर, स्वतः रुक्मिणीसह द्वारकेस परत गेला. त्याच ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पंढरपुरात राहिल्या. त्या दिवसापासून हा वैष्णवांचा पक्ष स्थापन झाला .. तेव्हापासून चुकता देश विदेशातून लाखो विठ्ठल भक्त या पांडुरंगाच्या महामेळाव्यात येतात अन मंत्रमुग्ध होतात.

 

या वारकऱ्यांचा नेता आहे तरी कसा ?

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. अन पायाखाली पुंडलिकाची विट.

 

पुंडलिकाच्या शब्दपाई आजही विठ्ठल उभा राही -

 १६५९ साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीमध्ये पांडुरंग सुरक्षित ठेण्यासाठी विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरच्या गावांत हलविण्यात येई. अफजलखानाच्या या धार्मिक स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेविली होती आणि अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय  हयास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांचा विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. संकट काळी पांडुरंगाला या दिंडीरवनातून जावं लागलं पण त्यांनी भक्त पुंडलिकाचा शब्द मोडला नाही गेली अनेक वर्ष तो असाच उभा आहे.

 सचिन कृष्णा तळे

 


Tuesday, 9 July 2024

विशाळगड किल्ले खेळणा चा खरा इतिहास





" स्वराज्यात असलेल्या प्रत्येक गड किल्ल्याला प्रभू शिव छत्रपतींचा सहवास अन इतिहास लाभला आहे. प्रत्येक गडाची एक वेगळी कहाणी आहे. इथले गड किल्ले म्हणजे दगड मातीने उभारलेल्या भिंती नसून या सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांचे श्रद्धास्थान आहेत. मुघलांनी बायका नाचवण्यासाठी महाल उभे केले पण आपल्या राजाने बायका वाचवण्यासाठी गड किल्ले उभारले. एकेकाळी आपल्या संरक्षणाची पूर्ण जवाबदारी या गड किल्ल्यांवर होती , आज याच गड किल्ल्यांची संरक्षण ची जवाबदारी आपली आहे हे विसरू नका. ज्याने आपल्या पूर्वजांचे रक्त काढले तो कसा काय तुमच्या ईच्छा पुर्ण करेल हा साधा विचार न करता आपलीच लोक कोंबड्या बकरीचे मटण खाण्यास विशाळगडावर जातात. पुर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना कधी होणार.  "

विशाळगड अर्थात किल्ले खेळणा गेल्या काही दिवसापांसून सतत चर्चेत आहेत कारण तिथे विस्तारित चाललेली मुघल सेनापती मलिक रेहान ची कबर जी आज हजरत पीर मलिक रेहान साहेब दर्गा ट्रस्ट नावाने आहे. हिंदूंना प्रिय असणाऱ्या देवस्थानावर उदारहणार्थ काळूबाई च्या डोंगरावर पशुहत्या बंदी असताना या विशाळगडावरील दर्ग्याला पशुहत्या ची परवानगी मिळाली. त्या दिवसापासून या दर्ग्याची चर्चा जास्त होऊ लागली. १४६९ साली बहामनी सुलतानाने त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. याच  मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे असे सांगितले जाते. विशाळगडाचा इतिहास पाहण्याआधी मलिक रेहान कोण होते ? आणि ते विशाळगडावर का आले ? हे तिथल्या मुस्लिम बांधवानी समजून घेणे गरजेचे आहे. आक्रमण करण्यासाठी आलेला सरदार हीच आमच्यासाठी त्या दर्ग्याची ओळख. या दर्ग्याच्या आसपास याच समाजातील लोकांची वाढत चाललेली अनधिकृत वस्ती अन दुकाने गडाची सुंदरता संपवण्याच्या मार्गावर आहे. गडावर छोट्या मोठ्या भरपूर अतिक्रमण केलेली खानावळी व हॉटेले असून तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे मासांहार जेवण उपलब्ध आहे इतकंच नाही तर मद्यपान देखील दिसून आले आहे.  

सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला. इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी 'किशागिला' हा एक किल्ला होता. किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ आजचा विशाळगड. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरिता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.  

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जात होता. 

२८ नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले.   

३ मार्च १६६०ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली. 

इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. 

१७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. 

इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. पण १८४४ साली इंग्रजांनी आपला विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.

विशाळगडावर पाहण्यासारखे ठिकाण - 

एस.टी. किंवा खाजगी वाहनाने विशाळगडासमोरील वाहनतळावर उतरल्यावर, वाहनतळात व विशाळगडामध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतु आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायऱ्यांची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायऱ्यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जुनी फरसबंदी दगडांची वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. अमृतेश्वर मंदिरापाशी कड्यावरून पडणारे पाणी साठी कुंड आहे. मंदिरात पंचाननाची मूर्ती आहे. मंदिरावरून तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलीकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नवीन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहाण्यासारखे आहे. या कासवापुढील देव्हाऱ्याकडील पायरीवर मोडीलिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यावरील ‘आबाजी जाधव शके१७०१, विशाळगड’ ही अक्षरे वाचता येतात. मंदिरात ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. वाटेत एका चौथऱ्यावर दगडात राजाराम महाराजांची कोरलेली दोन पावले दिसतात. तेथे त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे. या शिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

@सचिन कृष्णा तळे 
Sachin Jayshree Krishna Tale

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale