भारत राष्ट्र
समितीचे सीमोल्लंघन आणि राजकीय रिंगण
तेलंगणाचे
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आणि त्याची सुरवात हि नागपूर पासून
झाली. महाराष्ट्र हे तेलंगणालगतचे राज्य
असल्याने चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काही महिन्यापूर्वी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या सभा झाल्या. राज्यभर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती चे मोठमोठाले बॅनर
लागले आणि त्याची चर्चा सुद्धा झाली. हिंदी आणि मराठीतून तेलंगणाच्या विकासाच्या जाहिराती झळकू लागल्या. इतकंच नाही तर ६०० गाड्यांचा
ताफा आणि सोबत मंत्री मंडळ घेऊन चंद्रशेखर राव हे थेट महाराष्ट्राच्या
दिशेने सोलापुरातून विठ्ठलाचे दर्शन घेतले. या प्रवासादरम्यान विठ्ठल
भेटी अगोदर मटणाचा ताव हा विषय अनेक
मीडियातून दाखवला गेला. गेल्या काही महिन्यात जाहिरातीतून भारत राष्ट्र समितीने अफाट पैसा खर्च करून महाराष्ट्रातील जनतेचे आणि नेत्यांचे भुवया उभे केले हे मात्र खरं
आहे. महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष आणि नेते मंडळी हे आपआपसात लढण्यात
मग्न आहेत आणि हीच ती वेळ महाराष्ट्रातील
जनतेला नवा पर्याय देऊन महाराष्ट्रात सत्तेचं भागेदारी मिळवायची. कदाचित हीच खरी संधी ओळखून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रातील युवा नेत्यांना नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता हा पर्याय मराठी
नेत्यांना किती डोकेदुखी ठरतीय कि अमराठी लोकांना
फायदेशीर हे येणारी वेळ
आणि जनतेचं मतच ठरवेल.
कल्वकुंतल चंद्रशेखर राव हे भारताच्या तेलंगणा
राज्याचे पहिले व विद्यमान मुख्यमंत्री
आहेत. ते भारत राष्ट्र
समिती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असून
तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते. चंद्रशेखरराव यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५४
ला सिद्दिपेट जवळील चींतमडका या गावी झाला
आहे. आणि हे गाव सद्या
तेलंगणा राज्यात आहे. त्यांनी उस्मानिया विद्यापीठांतर्गत हैद्राबाद येथुन तेलगु भाषे मधे पदवी प्राप्त केली. शिक्षण नंतर १९८० मध्ये ते संजय गांधी
यांच्या नेतृत्वखाली काँग्रेस च्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८३ मध्ये तेलगू देशम पार्टी मधून काम करत ते १९८७ ला
राज्यमंत्री झाले. नंतर त्यांचा राजकीय प्रवास हा उत्तरोत्तर वाढत
गेला.
आषाढी
वारीचे निमित्त साधून अख्ख्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात येऊन विठ्ठलाची पूजा करून चंद्रशेखर राव यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी मातेची पूजा केली. हैदराबादहून मुद्दामहून रस्ते मार्गाने सोलापुरात येताना जागोजागी, गावा-गावांत ‘ अब की बार
किसान सरकार ‘ हा संदेश जाणीवपूर्वक
देण्याचा आणि शेतक-यांना आकर्षित करण्याचा त्यांचा हेतू हा सरळ दिसून
येतो. तेलंगणात केसीआर यांनी शेतक-यांसाठी आणलेल्या विविध कल्याणकारी योजनाचा प्रचंड बोलबाला आहे. त्याच योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणू अशी घोषणाच जणू प्रत्येक पोस्टरबाजीतून दिसून येते. पंढरपूरची वारी हि एकमेव आहे
जिथे राज्यातील अनेक गावांमधून अनेक शेतकरी तसेच कामगार वर्ग चालत येतो. जिथे सर्व महाराष्ट्राची मीडिया हाजीर असते. आणि अश्या ठिकाणी आपण जाऊन पोहचलो तर चर्चा हि
होणारचं हे राव याना
चांगलंच माहित होत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शक्तिप्रदर्शन करण्यापेक्षा एकाचं ठिकाणी राजकीय ताकद दाखवण्याचा आणि तेलंगणात मुस्लिम मतांवर विजयी होऊन महाराष्ट्रात शेतकरी मुद्दा पेटवण्याचा एक छुपा राजकीय
हेतू पण राव यांचा
असू शकतो.
महाराष्ट्रात
राव यांना सत्ता का हवी ? का
ते बॅनर बाजी मधून पैसा खर्च करत आहेत ? ६०० गाड्यांचा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन कश्यासाठी कोणासाठी ? देवासाठी तर मुळीच नाही.
राव हे मूळ काँग्रेस
विचारांचे ते हिंदुत्ववादी विचारांच्या
पूर्ण विरोधात त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी त्यांचे काही साटेलोटे असेल असे हि नाही. एआयएमआयमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी आणि राव यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. जर राव यांच्या पक्षाला येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातून चांगले प्रतिसाद मिळाला तर एआयएमआयम ला त्याचा फायदा होऊ शकतो. ‘‘माझा पक्ष छोटा आहे. त्याची भीती महाराष्ट्रातील पक्ष का बाळगत आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आम्हाला भाजपाची बी टीम म्हणतात. दुसरीकडे भाजपने आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटले आहे. असे शिक्के मारणे बंद करा,’’ असा खोचक सल्ला राव यांनी पंढरपूर भेटीत दिला. भारत
राष्ट्र समिती हा नवीन पक्ष
आहे, त्यांची जाहिरातबाजी जोरदार असली तरी तो रुजेल का,
वाढेल का, काय स्थिती राहील, याबाबत काहीच अंदाज लावता येऊ शकत नाही. महाराष्ट्रात जाळे विणत असताना राव यांनी प्रथम तेलंगणा-मराठवाडा सीमेवरील नांदेडचा भाग निवडला. पूर्व विदर्भा नंतर महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगणा सीमेवर, पश्चिम महाराष्ट्रातील मजबूत साखर पट्टा असलेल्या सोलापूरकडे त्यांनी मोर्चा वळविला. ऊस, ज्वारी, कांद्यासह डाळिंब, द्राक्षे, केळीसाठी ओळख निर्माण झालेल्या सोलापूर जिल्ह्यात शेतीवरील अर्थकारण मोठे आहे. यंत्रमाग उद्योगासाठी तेलंगणा सरकारने दिलेल्या सवलती सोलापूरच्या विणकरांना आकर्षित करू शकतात. पंढरपूर-मंगळवेढा भागातील राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे सुध्दा राष्ट्रवादीवर नाराज होऊन केसीआर यांच्या पक्षात सामील झाले आहेत. इतकेच काय तर सोलापुरातील अनेक
नेत्यांनी राव ह्यांची भेट घेतली अशी चर्चा सुद्धा आहे. सोलापूरचा पूर्वभाग विणकर तेलुगु समाजाने व्यापलेला आहे. यात झोपडपट्ट्यांमध्ये याहणारे गरीब यंत्रमाग व विडी कामगार
बहुतांशी याच समाजाचे. तीन लाखांपर्यंत मतदार याच समाजाचे आहेत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोलापुरात राव यांच्या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो व खात उघडण्यास
अडचण सुद्धा येणार नाही.
सोलापूर
जिल्ह्याचा विकास हा गेल्या अनेक
वर्षांपासून झालेला नाही. ह्या जिल्ह्याला हवं तसं खंबीर नेतृत्व अद्याप मिळालेलं नाही. वाढती बेरोजगारी, पाण्या अभावी बंद पडत चालेले कारखाने, दूषित पाणी आणि त्यातून मिळणार आजारपण, कोरड्या शेती अश्या महत्वपूर्ण प्रश्नांवर राव निवडणूक लढवतील. मेळाव्यात बोलताना राव म्हणाले, महाराष्ट्र हे धनवान राज्य
असून येथे पैशाची कमी नाही तर राजकीय लोकांची
इच्छाशक्ती कमी आहे. येथील जनतेने संधी दिल्यास तेलंगणमध्ये राबवत असलेल्या योजना आपण महाराष्ट्रामध्येसुद्धा राबवू शकतो. महाराष्ट्रात वीज आणि पाणी यांचा मुबलक साठा आहे. तरीही येथील शेतकऱ्यांना वीज आणि पाणी या सुविधा का
मिळत नाही? असा सवाल त्यांनी केला. ह्या त्यांचा प्रश्नाला आपले महाराष्ट्रतील नेते आणि खास करून शरद पवार काय उत्तर देतील हे पाहण्यासारखे आहे.
ह्या सर्व घडामोडी आणि राव यांचे
दौरे जर मराठी नेत्यानी हलक्यात घेतले तर ते सहज ९ ते १२ आमदार राज्यात निवडून आणू
शकतात. भारत राष्ट्र समितीचे हे सीमोल्लंघन ओळखून त्यांनी निर्माण केलेलं हे राजकीय
रिंगण आताच तोडले पाहिजे.
सचिन
कृष्णा तळे

