मराठी वाङ्मय
परिषद
साहित्य प्रकाराची
स्वतःची अशी एक परिवर्तनशील संकेतव्यवस्था आहे. साहित्य हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब
असून साहित्यात प्रगट होणारा जीवनाशय तसेच त्याची आविष्कार पद्धती ह्या सर्वांना एक
संदर्भ असतो. कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, निबंध,
ललित लेखन, व्यक्तिचित्र हे वाङ्मय चे प्रकार असून लेखक त्याच्या मनाला भावेल त्या
शब्दात लेखन करत असतो. आज विज्ञानाच्या संगणकाच्या युगात इंग्रजी भाषेच्या वाढत्या
उपयुक्ततेमुळे प्रभावामुळे महाराष्ट्रात जिथे मराठीची अत्यंत वेगाने पीछेहाट होत आहे
ती पाहता मराठी वाङ्मय साहित्य मोठ्या प्रमाणत निर्माण होऊन ती तरुण मराठी वाचकांपर्यंत
पोहचणे गरजेचे आहे. जर हि अवस्था महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रा बाहेर सर्वाधिक
मराठी बोली बोलणाऱ्या बडोद्या ह्या शहरात काय असेल ह्याचा विचार वेळोवेळी गायकवाड घराण्यांनी
केला.
देशी भाषांना
उत्तेजन देण्यासाठी बडोद्याचे पु. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेक गोष्टी
केल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कै. चिं.वि. जोशी व कै. डॉ. वि.पां. दांडेकर यांनी
८ फेब्रुवारी १९३१ रोजी मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या संस्थेची स्थापना केली. कोणत्याही
देशाचा विकास व समृद्धी या बाबी त्या देशातील माणसांची मानसिक जडणघडण व सुसंस्कृतता
यावर अवलंबून असतात अन संस्कृतीचे यथायोग्य प्रभावी दर्शन जर कशातून घडत असेल तर ते
तिला अभिव्यक्त करणाऱ्या भाषेतून आहे. इ.स. १९३१ मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून
आजतागायत संस्थेची एकूण चौसष्ट अधिवेशने झाली आहेत. वि. दा. सावरकर, आचार्य अत्रे,
पु. ग. सहस्रबुद्धे , कवी अनिल, विजया राजाध्यक्ष, कवि कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ.
भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील, विजय कुवळेकर, डॉ. अरुणा ढेरे, कुमार केतकर, सुरेश
खरे, प्रतिभा रानडे, अशा नामवंत साहित्यिकांनी या अधिवेशनांचे अध्यक्षपद विभूषित केले
आहे.
‘मराठी वाङ्मय परिषद, बडोदे.’ या संस्थेच्या
सुवर्ण महोत्सवप्रसंगी संस्थेला दिलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी एक किंवा दोन
दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेअंतर्गत अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षास अथवा अन्य व्यासंगी साहित्यिकास-विचारवंतास निमंत्रित
करून त्याच्या ज्ञानाचा व व्यासंगाचा, महाराष्ट्रापासून दूरवर राहून आपली भाषा व संस्कृती
यांचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या आणि वाङ्मयाचा आस्वाद घेण्यास व साहित्यातील
नवनव्या प्रवाहांचे ज्ञान करून घेण्यास उत्सुक असलेल्या रसिकांना लाभ घेता यावा, हा
यामागील उद्देश आहे. ह्या तीन दिवसांच्या अधिवेशनांखेरीज अनेक छोटे मोठे उपक्रम वर्षभर
परिषदेतर्फे राबविण्यात येतात.
मराठी भाषिक
आणि मराठीबद्दल आस्था बाळगणाऱ्या इतर भाषिक साहित्यप्रेमी रसिकांना एकत्र करून वाङ्मयची
विविध दालन त्यांना खुली करून देऊन त्याद्वारे बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता
जोपासणे , तिचे सवंर्धन करणे व लेखक वाचक याना संपन्न करणे हे मुख्य उद्दिष्टे ह्या
संस्थेची आहे.
सचिन कृष्णा
तळे
७७०९०९९६४६