Friday, 30 March 2018

मोर्चा , सोशल मीडिया आणि देश ... !!


मोर्चा , सोशल मीडिया आणि देश ... !!

मोर्चा इथे रंगाचा, जातीचा, दहशतवाद्यांचा निघतो
कायद्याच्या चौकटीत शेतीचा, लोकशाहीचा निघतो
ज्याचा त्याचा स्वार्थ, ज्याची त्याची प्रगतीची वाट
त्या गर्दीत मात्र घाम, सामान्य जनतेचा निघतो

हो ! त्या गर्दीत मात्र घाम सामान्य जनतेचा निघतो. गेल्या काही वर्षात आपल्याला हे जाणवलं असेल की , आपल्या राज्यात देशात रोज कुठे ना कुठे तरी मोर्चे निघत आहेत. त्याविषयी सोशल मीडियावर नुसती वैचारिक दंगल चालू असते. लोकांमध्ये एकमेकांविरोधी प्रेम कमी, एकमेकांबद्दलचे आदर कमी , जिव्हाळा कमी तर द्वेश जास्त आढळून येतोय. आणि हा द्वेश सगळ्यात जास्त सोशल मीडियाच्या गाभाऱ्यात दिसतोय. त्या सोशल मीडिया वरच जग आणि बाहेरच जग ह्यात खूप मोठ अंतर आहे. शक्यतो ते अंतर मानवी डोळ्यांना न पेलणार व न झेपणार आहे. जे दिसत ते नसत आणि जे नसत ते दिसत अशी ही सोशल मीडियाची भुरळ. प्रत्येक गोष्टी मध्ये काही चांगल्या बाबी असतात तर काही वाईट ही. फक्त समोरच्या माणसा वर ते अवलंबून आहे.  लोकांना संघटित करण्यासाठी ह्याच सोशल मीडियाचा जास्त वापर होतोय. सोशल मिडीयावरून लोकांना भडकावून असे काही चित्र तयार केले जातात की आपल्यावर, आपल्या माणसांवर, आपल्या समाजावर खूप मोठे अत्याचार होतायत. आणि हा फंडा सर्व धर्माचे लोक अगदी जाणीवपूर्वक वापर करतायत. बातम्या देणाऱ्याना ही तेच हवं जे तुम्ही आपण करतोय. जितक्या वेगाने बातम्या पोहचत नाही तितक्या वेगाने सोशल मीडियावर अफवा पसरतात. बातम्या पसरतात. आपल्याला मिळालेली खबर ही खरी की खोटी ह्याची शहानिशा न करता आपण ती आपल्या मित्र परिवारात सहज पाठवतो त्याचे दुष्परिणाम न जाणता , न विचार करता. आपल्या देशात राज्यात प्रगतीचे वारे कसे वाहतील ह्याचा विचार न करता स्वतःचे अस्तित्व कसे टिकवता येईल ह्याचा विचार करणारे काही राजकीय समाजकंठक फक्त स्वार्थ साधण्यासाठी तुम्हा आम्हाला भडकवत आहेत. आणि आपण अंध होऊन त्यांच्या हाकेला धावून जातोय. विविध रंगाचे झेंडे , घोषणा , आणि गर्दी . सगळ्यात महत्वाची बाब ही की ह्यात शिक्षित तरुणांची संख्या ही जास्त आहे. आणि हे सगळ्यात घातक आहे. आपल्या पूर्वजांच्या काळात भूतकाळात जे काही घडलं ते पुन्हा वर्तमानकाळात व भविष्यात घडू नये ह्यासाठी एकजूट न होता भूतकाळातील गोष्टींवर जास्त भर देण्यात येतोय. त्यावेळीच दाखले दिले जातायात.

आवाज उठवण्यासाठी संघर्ष हवा एक लढा हवा
मात्र नेत्यांसाठीच का ? हा खोटा पसारा निघतो !

एखाद्याने आपल्या कानाखाली वाजवली तर त्याला दुसरा गाल समोर करावे ह्या महात्मा गांधींच्या विचारावर आपला देश मुळीच नको. अन्याय विरोधी आवाज हा उठलाच पाहिजे . पण झालेल्या घटनेला जातीचे , धर्माचे शिक्के न मारता . माणुसकीच्या व देशाच्या हिताच्या नजरेतून ते हवे. जर त्याने केलं तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी दिलेलं संविधान अन कायदा हा भक्कम आहेच की. परंतु अमुक नेता म्हणतो म्हणून तेच खरे असे मानून भर रस्त्यात उतरणे , तोडफोड करणे , दंगे करणे हे योग्य आहे का? जर असे वाटत असेल की हे मोर्चे दंगे म्हणजे आमची ताकद आहे , आमची शक्ती प्रदर्शन आहे तर ती तुमची सर्वात मोठी भूलचूक असेल देशबांधवांनो . तुमची ताकद ही स्वतःच्या जातीबद्दल , समाजाबद्दल न दाखवता ती देशाबद्दल दाखवा. देशाच्या सर्वोच्च पदावर ज्या लोकांना आपण आपल्या मतदानातून स्थानबद्ध केलं त्यांच्या हाताला व त्यांच्या कार्याला , विचारला बळकटी कशी मिळेल ह्या कृतीतून दाखावा. जर ते राजकर्ते नपुसंक (नाकर्ते) असतील दंगल खोर असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तुमची ताकद दाखवा. देशाची सीमा आज आपल्या रक्षणास खंबीर उभी आहे त्या अमर सैनिकांच्या शौर्य गाथेवर दाखवा. त्यांच्या पाठीशी उभे राहा. देशांतर्गत जे तेढ निर्माण करत आहेत त्या समाजकंटकांविरोधी दाखवा. देशात राजकीय स्वार्थ साधत सरकारी व जनतेची तिजोरी लुटणाऱ्या त्या लालू प्रासाद , भुजबळ सारख्या नेत्यांबद्दल दाखवा. करोडो रूपयेचे घोटाळे करून देश सोडून जाणाऱ्या त्या विजय मल्ल्या , निरव मोदी ह्यांच्या सारख्या लोकांविरोधी दाखवा. 

सीमेवर धारातीर्थ जेव्हा पडतो अमर सैनिक
तेव्हा त्याच्या डोळ्यातुन अश्रू देशभक्तीचा निघतो !

 देशाची अर्थव्यवस्था ही आपल्या रोजच्या कामावर अवलंबून आहे. बंद पुकारणे त्याला यशस्वी करणे ह्यातुन फक्त तुमचं आमचं या आपल्या देशाचं नुकसान आहे. आजही आपल्या देशात असे काही देशबांधव आहेत ज्यांना रोजची भाकर ही त्यांच्या कष्टावर मिळते. रोज विहीर खोदून पाणी पिणाऱ्या लोकांची संख्या त्या मजदुरांची , कामगारांची संख्या आपल्या भारतात जास्त आहे.  त्यांनी घाम गाळल्यावरच त्यांना भाकरी मिळते . मग त्या बंद च्या वेळी ह्या लोकांनचा विचार आपण खरंच करतो का? मोर्चा हा अन्यायाचे प्रतीक आहेत , न्यायाची हाक आहे , एकतेची मशाल आहे. पण हा मोर्चा जर आपल्या देशा साठी असेल,आपल्या देशा विरोधी  कारनामे करणाऱ्या शेजारील देशविरोधी असेल तर ते सोन . आज सगळ्यांना आपापल्या घराची पर्वा आहे. आपल्या घरातल्या मुलांची प्रगती व त्यांची भविष्याची काळजी आहे. त्यांना उत्तम शिक्षण देणं त्यांना समाजात  व देशात एक चांगला नागरिक तयार करण हे जितकं शिक्षकांचं काम आहे तितकच आपलं ही. मूल ही लहान वयात मोठ्यामाणसांचे अनुकरण करत असतात आणि आजच्या पिढीला सोशल मीडिया ही अंगणवाडीतच शिकायला मिळते. आपण जे करतो ते नकळत त्यांच्या मनात रुजत. आपले मोर्चे , बंद , दंगल , घोषणा , तोडफोड , राजकारण हे सगळं काही ती निष्पाप मूल पाहत आहेत. त्या बाळ मनावर नक्की कोणते परिणाम होतील ह्याचा विचार नक्की केला पाहिजे. उद्याचा भारत हा त्याच मुलांच्या हातात असेल आणि आपण तेव्हा वृद्ध होऊन केलेल्या चुका पाहत राहो. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आपली मूल एकमेकांचे वैरी झालेले असतील .   किंवा आपल्या आपापसातल्या भांडणाचा गैरफायदा घेत देशाचे तुकडे होऊ पाहणाऱ्याचे स्वप्न पूर्ण झालेले असेल. देशाची एकता अखंडता टिकवणे हे तुमचे आमचे सगळ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. जगातले सगळे धर्म आज आपल्या देशात सुखा समाधानाने नांदत आहे फक्त काही समाजकंठक सोडले तर. जो देश सगळ्या धर्माचा आदर सन्मान करतो , आज तोच देश सतत जातीपातीच्या राजकारणात , धर्माच्या आगीत जळत आहे. त्याची प्रगतीची वाट आपणच खुंटून काढत आहोत . भविष्यकाळात एक दिवस असा ही उजाडेल जेव्हा येणारी पिढी हे सगळे धर्म , जात पात सोडून देतील आणि देश हाच धर्म पुजतील . भूतकाळात ज्या चुका झाल्यात त्या विसरून जाऊन तिरंगा हा घरोदारी फडको. जय हिंद . वंदे मातरम

नोकरी शिक्षण उदयॊग अन प्रगतीची दिशा
बेरोजगार महागाई , सवाल प्रश्नाचा निघतो !
सगळ्या धर्माचा आदर, ज्या देशात आज आहे
त्या देशासाठी कुठे, साधा एक मोर्चा निघतो

सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६






Thursday, 29 March 2018

श्रद्धा माझी


श्रद्धा माझी त्या राष्ट्रावर आहे
ज्या राष्ट्राचा राजा श्री राम आहे

श्रद्धा माझी त्या राज्यावर आहे
ज्या राज्याचा कर्ता शिवराज आहे

श्रद्धा माझी त्या भाषेवर आहे
ज्या भाषेची गोडी अमृताशी आहे

श्रद्धा माझी त्या माणसांवर आहे
जी माणसे माझ्या राष्ट्राशी आहे

श्रद्धा माझी त्या देवाशी आहे
ज्या देवाचा धर्म हिंदू आहे

श्रद्धा माझी त्या धर्माशी आहे
ज्या धर्मात देश माते समान आहे

श्रद्धा माझी त्या वीरांशी आहे
जा शूरांची महिती देशाशी आहे

सचिन तळे
७७०९०९९६४६


Wednesday, 28 March 2018

एक मोर्चा निघतो


मोर्चा इथे रंगाचा, जातीचा, दहशतवाद्यांचा निघतो
कायद्याच्या चौकटीत शेतीचा, लोकशाहीचा निघतो

ज्याचा त्याचा स्वार्थ, ज्याची त्याची प्रगतीची वाट
त्या गर्दीत मात्र घाम, सामान्य जनतेचा निघतो

आवाज उठवण्यासाठी संघर्ष हवा एक लढा हवा !
मात्र नेत्यांसाठीच का ? हा खोटा पसारा निघतो

सीमेवर धारातीर्थ जेव्हा पडतो अमर सैनिक
तेव्हा त्याच्या डोळ्यातुन अश्रू देशभक्तीचा निघतो

नोकरी शिक्षण उदयॊग अन प्रगतीची दिशा
बेरोजगार महागाई , सवाल प्रश्नाचा निघतो

सगळ्या धर्माचा आदर, ज्या देशात आज आहे
त्या देशासाठी कुठे, साधा एक मोर्चा निघतो


सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६




Tuesday, 27 March 2018

हिरवळ क्रांती चोहीकडे


निसर्गाच्या कुशीतले ,जे वरदान मिळाले आम्हा
त्या झाडांची वेदना का, उशिरा कळाले आम्हा

जगण्यासाठी काय हवे, काय हवे वसुंधरेला
हिरवळ क्रांती चोहीकडे, पाना फुलांची काया

हवा, पाणी, प्रकाश कोण देई मूलभूत गरजा 
निर्मात्याने काय दिले, ते डोळे उघडून पहा

मातीमधुनी जन्म त्याचा, तोच आपुली छाया
गाव वस्ती शहर सगळे त्याचाच आहे पसारा

दुष्काळात का आठवतो ,कुठे विसावतो प्रेमात
त्याच्या नसण्याने, काय शोधतो आपण उन्हात

झाडावरचे एक एक घाव अन जखमा जाऊन पहा
मुक्याने सोसले किती, खरा देव कोणता शोधा

शेतात रानात वनात आणि डोंगर दऱ्या खोऱ्यात
निरोगी आयुष्याची ही संजीवनी आपल्या हातात

झाडे जगवा झाडे लावा, खरी श्रीमंती ही जपा
झाडांसोबत प्रगतीचे, चला इतिहास नवा रचवा

सचिन तळे
7709099646



Friday, 16 March 2018

देश मराठी भांडला होता


कविता : देश मराठी भांडला होता

गोंधळ अखंड महाराष्ट्राचा, जेव्हा शाहिरांनी गाईला होता...
घरदार सोडूनी तेव्हा,हा..देश मराठी भांडला होता...
देश मराठी भांडला होता...

आरे, तो काळ कोणता होता, हा काळ कोणता आहे...
फुट पाडण्या आमच्यातचं, सारा देश टपला होता...
देश मराठी भांडला होता...

त्या परकीयांची नाळ तोडूनी, सूर्य स्वराज्याचा पेटवला आम्ही...
अश्या ह्या सह्यागीरीच्या पोटी, तसा इतिहास जन्मला होता...
देश मराठी भांडला होता...

कैद झाली भारतभूमी अन रडली होती दारो दारी ...
स्वातंत्र्याची मशाल घेऊनी ,तेव्हा जो तो  उतरला होता
देश मराठी भांडला होता...

धर्म समाज सुधारकांचा, प्रबोधनाचा ठाकरी शैलीचा...
संताचा विचारवंतांचा शोर्याचा, इथेच बाळ रांगला होता...
देश मराठी भांडला होता...

मुंबई सह महाराष्ट्राची ,गुढी उभारली यशवंता नी...
हुतात्मे झाले आमचेच, खेळ कोणता हा मांडला होता ...
देश मराठी भांडला होता...

अमृता हूनी गोड अशी , ज्ञानियाची भाषा किती हो थोर...
त्याच भाषे वरुनी ,इथे राजकीय स्वार्थ पेटवला होता ...
देश मराठी भांडला होता...

सोडून मुंबईची लाट ,धरली गावाकडची त्यानं वाट ...
अस्तित्व टिकवण्यासाठीच, तो भगवा फडकवला होता...
देश मराठी भांडला होता...

बेळगाव कारवार बिदर निपाणी ,सीमेवर माझा श्वास मराठी ...
महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी ,एक वणवा भडकला होता  ...
देश मराठी भांडला होता...

आरे ह्या मातीला विकणाऱ्यांचीच, टोळी बसली हो सत्तेवरी ...
माय बाप जागे व्हा हो...तेव्हा महाराष्ट्र एकवटला होता ...
देश मराठी भांडला होता...

- सचिन कृष्णा तळे



Monday, 5 March 2018

भाषा आणि युक्ती -साहित्य उपेक्षितांचे - बाल साहित्य विशेषांक २०१८





षा आणि युक्ती …

आपण रोज बोलतो, आपले म्हणे पठवून देतो, हट्ट करतो आणि हट्ट पूर्ण हि करून घेतो. आपल्याला जर काही हवं असेल तर आपण आपल्या आई वडील किंवा आजी आजोबा आणि भावाकडे बहिणीकडे अन मित्राकडे त्या  विषयी सवांद साधतो. हा सवांद साधताना ज्या शब्दाची आपण मदत घेतो ते शब्द म्हणजेच आपली भाषा जी आपल्याला आपल्या आई वडिलांकडून आपल्या शिक्षकाकडून शिकायला मिळाली. लहान असताना आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात ते आपण काळजीपूर्वक ऐकत असतो. एकदा का ते शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ काळाला कि आपण त्या नुसार चालतो वागतो. भाषा हि आपल्या मनातील राग , आनंद , मनोगत , भावना , विचार , कृती इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे. जशी आपली भाषा आहे तशीच आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत त्यांची हि एक वेगळी भाषा आहे, ती फक्त त्यांनाच कळते. मांजर म्याव म्याव करते , कुत्रा भुंकतो , कोकीळ गाते , चिमणी चिव चिव  करते इत्यादी हे सगळं काही त्यांची भाषा आहे , जसे आपण बोलतो तसे ते हि बोलतात . जगात ६८०० हुन अधिक बोलीभाषा आहे . आपल्या भारतात तब्बल १२२२ भाषा रोज वापरात आहे त्यातली २२ भाषा ह्या मुख्य भाषा आहे .. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो. जर आपण आपल्या जवळची कुठली हि दहा रुपयाची नोट पहिली तर त्यावर प्रमुख १५ भाषांचा समावेश आहे. जे दहा लाख किंवा त्याहून अधिक लोक आपल्या रोजच्या व्यवहारात वापरतात . आपली मातृ भाषा मराठी हि सुद्धा ह्याच प्रमुख भाषेत आहे. ज्ञानेश्वरांनी लहानपणी ह्याच भाषेच्या मदतीने रेड्यातोंडी वेद वदवून घेतले होते. आता हि झाली भाषा बद्दलची थोडक्यात माहिती. भाषेवर बोलायला सांगायला गेलं तर खूप काही आहे. ह्याच भाषेवरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो . भाषा कशी तयार झाली , भाषा तयार करण्याची गरज का पडली, आणि भाषेचं महत्व आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी व आपल्यासाठी का महत्वाची आहे ती.

हि गोष्ट फार जुनी आहे मला ती माझ्या आजीने सांगितली होती. एक राजा होता आणि त्याच भल मोठ असं राज्य होत. त्या राज्यात सर्व प्रजा हि सुखी होती समाधानी होती. त्या राज्यातले लोक हि फार आनंदी आणि समृद्धता मध्ये नटलेले होते.कोणाची नजर न लागो असं ते राज्य होत. एके दिवस त्या राज्यावर एका क्रूर राजाची नजर पडली. त्याला तिथलं वैभव पाहावलं नाही. दोन्ही राजाची राज्य भाषा हि सारखी होती त्यामुळे त्या राज्यात काय चालय हे त्याला लगीच कळत असे. तो क्रूर राजा आपला गुप्तहेर त्या राज्यात पाठवून त्याच्या मदतीने तिथली माहित गोळा करायचा आणि त्या राज्यावर व चांगल्या राजावर सारखा आक्रमण करून तिथली संपत्ती लुटायचा. पण इथली माहिती तिथल्या क्रूर राजाला कशी काय कळतीय हे कळतच नव्हतं. कोणीतरी आहे जो माहिती गोळा करतो आणि त्यांना देतोय हे लक्ष्यात आल्यावर राजाने दरबार भरवलं. दरबारात सगळे जमा झाले , राजा , प्रधान , पंडित , कलावंत, कवी, लेखक , भाषिक , तज्ञ् आणि काही प्रजा . विषय निघाला त्यावर बरीच चर्चा झाली. पण प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं. शेवटी एक व्यक्ती समोर आला आणि म्हणाला " राजे माझ्या कडे एक युक्ती आहे जर तुमची इच्छा आणि आदेश असेल तर मी सांगतो " राजा म्हणाला " हो सांगा ... त्यासाठीच इथे तुम्हाला सगळ्यांना मी आज बोलावलं आहे " तो व्यक्ती आपले मत मांडू लागला. त्याचे विचार व युक्ती राजाला आवडली. लगेच राजाने फरमान सोडला आदेश सोडला एका तज्ञाला बोलावून त्यानुसार ते कार्य  चालू केलं, कवी लेखक कलावंत ह्यांच्या मदतीने राज्यात लोकांपर्यंत ते पोहोचवलं. प्रधान जातीने दिवसरात्र त्यावर नजर ठेवू लागला. एक दिवस संपूर्ण राज्य त्या युक्ती वर चालू लागली. आणि त्याचा परिणाम हि त्या राजा व प्रजेसमोर आला. त्या क्रूर राजा ला हार पत्करावी लागली कारण त्याला आता कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्याचा तो गुप्तहेर हि पकडला गेला.

तर त्या व्यक्तीने अशी कोणती युक्ती सांगितली होती जी राजाने त्याच्या साह्याने आपले राज्य वाचवले. ती युक्ती होती भाषा बदलण्याची.एक अशी भाषा निर्माण करायची जी कोणाला कळणार नाही. जी भाषा आहे त्या भाषेला अनुसरून एक अशी भाषा हवि कि जी फक्त आपल्या राज्यातल्या लोकांनाच कळेल. दोन्ही राज्यातली भाषा हि सारखी होती म्हणून इथली सर्व माहिती त्या क्रूर राजाला मिळायची. त्या प्रकारे राज्यातल्या तज्ञाकडून एक भाषा तयार करण्यात आली , ती कवी लेखक शिक्षक ह्यांच्या द्वारे राज्यात शिकवली गेली . त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीस एक ओळख पत्र देऊन त्यांची कार्यशाळा चालू केली. आणि एक दिवस सगळे जण तीच भाषा बोलू लागले. भाषा बदलली हे त्या क्रूर राजाला माहित नव्हतं. जेव्हा त्याने त्याचा गुप्तहेर त्या राज्यात पाठवला तेव्हा त्याला काहीच कळेनासं झालं , त्याची चोरी पकडली गेली . त्याला दरबारी उभ करून शिक्षा केली. काही दिवसाने जेव्हा त्या क्रूर राजानेआपल्या सैन्यासोबत आक्रमण केले तेव्हा तिथली रचना व त्या राजाने आखलेली रण योजना कळलीच नाही . शेवटी त्याला हार पदरी घेऊन परतावे लागले.


तर मित्रानो, एक भाषा बदलली म्हणून त्या चांगल्या राजाने आपले राज्य वाचवले .त्याच प्रकारे आपली मराठी , कोकणी , अहिराणी तर बाजूच्या राज्यात तामिळ , तेलगू , कन्नड , पंजाबी , उर्दू असे अनेक भाषा निर्माण झालेत. आज आपल्या देशावर आक्रमणे होतात , आपल्या देशात हिंसा पसरवली जाते . शेजारच्या देशांना आपली सगळी माहिती मिळते . कारण त्यांना आपली हिंदी हि भाषा येते, कळते .  त्यांना हिंदी ह्या भाषेच ज्ञान आहे. आपल्या भारतात प्राचीन भाषा म्हणून संस्कृत आणि पाली भाषा हि प्रचलित आहे. आणि त्याच्याच ह्या पोटजाती. संस्कृत ह्या भाषेला आपण देव भाषा म्हणतो आपल्या पूजा अर्चना मध्ये त्याचा वापर करतो . आपले ग्रंथ ह्याच भाषेत लिहिली गेली. देवांना हि भाषा आवडते. जर देव देश वाचवायचा असेल तर भाषा शिकली पाहिजे .आता साधं उदाहरण देतो , जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला तिथली भाषा आधी शिकावी लागते . नाहीतर तिथली भाषा कळणारच नाही. कवी कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मदिवशी २७ फेब. ला आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. संत ज्ञानेश्वर महाराज ह्याच आपल्या मराठी भाषेची थोरवी सांगताना लिहितात
जैसी दीपांमाझि दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम।।
तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी।
भाषांमध्ये तैशी। मऱ्हाटी शोभिवंत।।
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।
मग आपल्या राज्यासाठी मराठी, परदेशासाठी इंग्रजी आणि देशासाठी संस्कृत शिकूया .


सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale