Friday, 27 August 2021

गणराया तू

 गणराया तू 


गणराया तू गणाधीश सर्वज्ञ तू 

गौरीपुत्र विनायका तुझ्या चरणी आता 

नतमस्तक होऊ दे माझा माथा 


हे गजनंदन गजमुख भगवंत 

हे अनंता चरणी तुझिया वंदन 

पाहून श्री मुख ... होई आनंद 

आनंदाचा तू रे वर्षामृत

संजीवनी तू प्रथमेशा हे विघ्नेशा गणराया तू 


सचिन तळे 

Tuesday, 24 August 2021

देवा घरची फुलं

 देवा घरची फुलं 


लहान मुलांचा निरागस भाव पाहिला तर पुन्हा लहान व्हावं वाटतं. वाढत्या वयात लहानपण कधी निसटून जात हे कळत नाही त्यामुळे लहानपणाच्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात असा काही दरवळत असतो कि एखाद लहान मुलं दिसलं कि त्याच्या सोबत आपण हि लहान होऊन जातो. पण काहींचं लहानपण हे इतकं वाईट असत कि ते कधीच आठवणीत ठेवू नये आणि कोणाच्या वाटेला हे असं बालपण येऊ नये. 


पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेर घर. अर्थात पुण्यात जो येतो तो शिक्षण घेण्यासाठी स्वतःला घडवण्यासाठी. टोलेजंग इमारती, मॉल, आयटी कंपन्या, अनेक शैक्षणिक संस्था तसेच औदयोगिक कारखाने आणि वाढती लोकसंख्या हि नव्या स्मार्ट पुण्याची ओळख. पण ह्यात अजून एक उल्लेख राहिला ती म्हणजे पुण्यात वाढती बेरोजगारी आणि रस्त्याच्या कडेवर भीक मागणारी लहान मुलं. होय कारण पुण्यात असे बरेच चौक आहे, बाजार पेठ आहेत , स्टेशन परिसर आहे कि जिथे लहान मुलं भीक मागताना दिसतील किंवा हातात कापड घेऊन तुमच्या गाडीला पुसत पाच दहा रुपयाची मागणी करताना दिसतील.  काहीवेळेला तुम्हाला ती फुल किंवा  खेळणी सारख्या वस्तू विकताना दिसतील. जर बारकाईने पाहिलं तर हे प्रमाण गेल्या काही वर्षात जास्त वाढले आहे त्यामागचं कारण स्थलांतर असू शकत. पर-राज्यातून आपल्याच जिल्ह्यातील दुष्काळ भागातून अनेक जण शहराकडे वळतात. घर दार सोडून लहान मुलाना घेऊन ती शहरात येतात आणि रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहतात. त्यांना रोजगार मिळेल तेव्हा मिळेल पण पोटाची भूक मिटवण्यासाठी ह्या निरागस बालकांना त्यांच्याच पालकांकडून भीक मागण्यास प्रवृत्त केले जाते हे सत्य आहे. ह्यात आईच्या झोळीत तीन चार महिन्याचं मुलं देखील दिसेल. 


आपण काय करतोय हे ह्या मुलांना काहीच माहित नसते. फक्त हातात पैसे किंवा काही खायला मिळालं कि ते त्यांच्या आई वडिलांकडे देयचे आणि खेळाला जायचं. ज्या हातात पाठी आणि पुस्तक हवं त्या हातात ह्यांना पैसा येतो. ज्या वयात लाड असतात त्या वयात उन्हाचे चटके ह्यांना खावं लागत. कधी कधी मनात हा विचार येतो कि हि सुंदर गोंडस मुलं नक्की त्यांचीच आहेत का? मुलं पळवून नेणे हा प्रकार राज्यात देशात नवीन नाही. एक मोठी साखळी सुद्धा ह्यांच्या भोवती असते हे अनेक चित्रपटातून दाखवलं गेलं. अनेकांनी हि मुलं त्यांची नाहीत हे सिद्ध पण केलय. अनेक सामाजिक संघटनेनं ह्या मुलांसाठी रस्त्यावर शाळा देखील भरवल्या. मुळात विषय आहे भीक मागणाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यात लहान मुलांचा असणारा सहभाग जो देशाच्या राज्याच्या प्रगतीच्या दुर्ष्टीने चांगला नाही. भिक्षा प्रतिबंध कायद्यानुसार चौकात, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणे हा देखील एक प्रकारे गुन्हाच आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्याधींचे जखंमाचे, अपंगत्वाचे किंवा असहायतेचे प्रदर्शन करून पैसे अन्य वस्तूंची मागणी करणे म्हणजेच भीक पण त्यात लहान मुलांना घेऊन भीक मागणे हा खूप मोठा गुन्हा आहे कारण आपण देशाची भावी पिढी बर्बाद करतोय. 


सर्वांना मूलभूत सुविधा, निवारा व वैद्यकीय सुविधा देणे हे सरकार चे कार्य आहे आणि त्यासाठी शासन अनेकवेळा कार्य करताना दिसतात. पुण्यात अश्याच मुलांसाठी रात्र निवारा प्रकल्प पालिकेतर्फे राबवला जातो. सेनादत्त सांस्कृतिक हॉल (सेनादत्त पेठ) , दुध भट्टी समाजमंदीर (बोपोडी ), मदर तेरेसा समाजमंदिर (येरवडा) हि ती ठिकाण जिथे बेघर, बेसहारा लोकांसाठी रात्र निवारागृहांची संकल्पना राबवली जाती. केंद्रातून राज्यातून पालिकेकडे ह्यासाठी काही रक्कम सुद्धा सुपूर्द केली जाते. रात्र निवारा चालवणाऱ्या संस्थेला मानधन सुद्धा देण्यात येते. ‘चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन’ तीन गटात मोडली जाते रस्त्यावर राहणारी मूल, रस्त्यावर काम करणारी मुलं , रस्त्यावरील कुटुंब त्यात असणारी मुलं त्यानुसार पुणे महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर एक सर्वे सादर केला आहे. ह्या सर्वे नुसार पुण्यात सध्या १०४२७ मुलं हि ह्या गटात मोडतात. ह्या  मुलांमध्ये ५२०७ मुले ६ ते १४ वयोगटातील आहेत. करोनाच्या महामारीत वाढलेल्या बेरोजगारीची आता हि आकडेवारी किती असेल ह्याचा अंदाज कदाचित पुणे महानगरपालिकेला नसेल. 


जर रात्र निवारा अंतर्गत विचार केला तर दाखवलेल्या आकडेवारी नुसार ह्या १० हजार मुलांसाठी हि तीन केंद्र पुरेशी आहेत का ? जर हि सामाजिक केंद्र शासन तर्फे राबवली जात आहेत तर रस्त्यावर मुलं का दिसत आहेत ? कारवाई होत असेल तर पुन्हा ती मुलं रस्त्यावर कशी ? अश्या अनेक प्रश्नाच्या विचार केला तर एका बाजूला करोडोचा घोळ खंडणी प्रकरण राज्यात आहे तर दुसरीकडे देशाची पिढी रस्त्यावर आहे म्हणजे आपली प्रणाली खरंच कुठे तरी कमी पडतीय का ?.  मुलं हि देवाघरची फुल आहेत असं म्हणतात मग देव भव्य स्थळात असताना त्याच्या ओंजळीतील हि निष्पाप गोंडस फुल रस्त्यावर का?


सचिन कृष्णा तळे .





Wednesday, 18 August 2021

जय शंकर

 शिव शरण येता हरेल सर्व चिंता 

महादेव माझा देवांचा राजा 


जो कैलासाचा निवासी 

जो करे नंदीची स्वारी 

ज्याच्या जटा मध्ये गंगा 

भस्म शोभे त्याच्या कपाळी 

ऐसा भोळा शंभुनाथ माझा  

शिव शरण येता हरेल सर्व चिंता 


हे आदिगुरू आदिनाथ 

हे आदियोगी आशितोष 

तू महाकाल मृतुन्जयी 

तू महेश्वर महायोगी 

ऐसा स्वामी कल्याण स्वरूपा 

शिव शरण येता हरेल सर्व चिंता 


विष प्राशन करोनि 

तारिले सृष्टी हि सारी 

निळकंठ नागेश्वर 

त्रिनेत्र रुद्राक्ष धारी 

तुजविण नाही कोणी हे अनंता 

शिव शरण येता हरेल सर्व चिंता


-सचिन तळे 




Monday, 16 August 2021

सावधान हिंदुस्थान

 


भारताच्या उत्तरेकडील सीमा ह्या आताच्या काळात खूप महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी आपले सैन्य हे २४ तास सतर्क अन वेळप्रसंगी स्वतः निर्णय घेणारी हवी. भारतीय राजकीय सत्ताधारी वर्गाने राजकारण विसरून ह्या विषयावर एकमत होऊन देश घट्ट एकजूट करून घेणे गरजेचे आहे. कारण भारताच्या सीमे लगत असणारी मुस्लिम राष्ट्रे आणि तिथे घडणाऱ्या घटना ह्या गाफील राहण्यासारख्या नाहीत. जर गाफील राहिलो तर चीन , बांगलादेश अन पाकिस्तान हे राष्ट्रे भारताला डोकेदुखी ठरेल. अमेरिका सैन्याने अफगाणिस्थान मधून मागे हटल्या नंतर तालिबान ह्या आतंकी संघटना सक्रिय झाल्या अन आज अफगाणिस्थान हे तालिबानी आतंकी संघटनेच्या हाती दुसऱ्यांदा गेले आहे हे प्रत्येक भारतीयांनी लक्ष्यात घेणे गरजेचे आहे. पुढील वीस एक वर्षात ह्या धार्मिक संघटना अधिक प्रभावशाली होऊ शकतात. १९९६ ते २००१ ह्या काळात देखील तालिबानी लोकांची सत्ता अफगाणिस्तान वर होती त्यावेळी त्यांच्या कडून अनेकवेळा अतिरेकी हल्ले झाले आणि त्याचे पडसाद आपल्या शेजारी राष्ट्र पाकिस्तानात देखील दिसून आल्या. त्यामुळे भारतासमोर कट्टरपंथीयांचे आव्हान अधिक गडद होत जाण्याचे चिन्ह आहे. सध्या भारताची भूमिका हि खूप महत्वाची असल्याने सावधान हिंदुस्थान इतकंच सांगावस वाटत. 


काही वर्षांपूर्वी जर इतिहासात डोकावलं तर अफगाणिस्तानचा महाभारतात देखील उल्लेख आढळतो. कौरवांचा मामा व गांधारीचा भाऊ शकुनी ह्याच देशातला होता. सम्राट अशोकाचे साम्राज्य देखील अफगाणिस्तान पर्यंत विस्तारलेला होता. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे सरनौबत नेताजी पालकर यांना औरंगजेब ने जबरदस्ती मुसलमान करून अफगाणिस्तानात ठेवले होते. असा हा अफगाण वाळवंटी प्रदेश तेव्हापासून अखंड भारताच्या इतिहासात आहे. हे उदाहरण देण्यामागच कारण कि भूतकाळात भारतावर तेव्हापासून असल्या कट्टरपंक्ती लोकांकडून आक्रमणे होत आली आहे. भारतावर जितकी परकीय आक्रमणे झाली मग अलेक्झांडर असो किंवा मुघल सगळे उत्तरेच्या मार्गाने आलीत अन ती वारंवार भारताच्या उत्तरसीमेवर कोसळलीत. बहुतांश आक्रमणे हि धार्मिक विजय मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी झाली. ह्या धार्मिक लाटेत अनेक लोकांचे इस्लामीकीकरण धर्मांतर झाले. इतके कि एक राष्ट्र निर्माण झाले आणि धर्माच्या नावावर देशाचे विभाजन झाले. धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर म्हणून सावधान हिंदुस्थान इतकाच सांगावस वाटत. 


भारतापासून साधरणतः १८०० किलोमीटर वर असणारा हा देश जरी मित्र राष्ट्र असला तरी तो तालिबानी लोकांच्या नजरेत पहिल्यापासून आहे आणि तालिबानी संघटनेला मदत हा पाकिस्तान करत असल्याचा आरोप वारंवार केला जातोय.तालिबानी अतिरेकी संघटनेबददल त्यांच्या अमानवी कृत्याबद्दल अनेक बातम्या व्हिडीओ सहज उपलबध आहेत. अफगाणिस्तान वर विजय मिळवल्यानंतर तालिबानी संघटनेवर आंतराष्ट्रीय स्थळावरून जर दबाव लवकरात लवकर आणला नाही तर त्यांची महत्वकांक्षा हि वाढेल आणि ती पाकिस्तान काबीज करण्या इतपत जाईल. कारण तालिबानचा मूळ जन्म हा उत्तर पाकिस्तानात झाला आहे. आणि पाकिस्तान ह्या मुस्लिम राष्ट्राची भारताबद्दलची मते हि चांगली नाहीत. पाकिस्तानात सत्ता परिवर्तन चे सूर आधीपासून घोंघावत आहेत. इम्रान खान ह्यांच्या विरोधात त्यांच्याच देशात कट्टरपंक्ती लोकांकडून प्रचार सुद्धा चालू आहे. इतकंच नाही तर तालिबान ला समर्थन देणारे देखील पाकिस्तान आहेत. पश्तू भाषेत मदरसेत शिकणाऱ्या विद्यार्थी ला तालिबान म्हंटले जाते. ह्याचा अर्थ विद्यार्थी दशेतच मुलांवर अमानवी कट्टर धार्मिक संस्कार घडवून आतंकी सैन्य उभे करायचे आणि युद्धाच्या साह्याने धार्मिक विजय मिळवायचा. सध्याचा तालिबान युक्त अफगाणिस्तान भारतापासून हजारो किलोमीटर जरी दूर असला तरी पाकिस्तान सारख्या धूर्त देशावर विश्वास ठेवणे भारताला महागात पडेल. भविष्यात जर अफगाण , पाक अन चीन हे राष्ट्र एक झाली अन भारताविरुद्ध युद्ध पुकारले तर त्यासाठी भारत पुन्हा एकदा सर्व शस्त्रसाठ्यासह सज्ज असावा म्हणून सावधान हिंदुस्थान इतकंच  सांगावस वाटत. 


भारतातले काही हिंदुत्वादी नेते संघटना अखंड भारताच्या नकाशात जाहीरपणे अफगाणिस्तान चा उल्लेख करतात. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत म्हणून साजरा करतात. त्यांची महत्वकांक्षा हि अफगाण च्या सीमेपर्यंत जरी असल्या तरी त्या प्रत्येक्षात उतरवणे शक्य नाही कारण भारताची बहुतांशी जनता हे धार्मिक बाबीत एक नाही.देशांतर्गत आपल्या आपल्यातच आपण खूप धार्मिक वैर निर्माण केले आहे. सोशल मीडियावर धार्मिक दंगली आणि त्याचे तरुणाच्या मनावर पडणारे पडसाद हे भविष्यात देशाला देशाच्या प्रगतीला पोषक नाहीत. आपण कोणत्या धर्माचे आहोत ह्या पेक्ष्या आपण भारतीय आहोत आणि भारतीय हाच माझा धर्म म्हणून आपण एक नाही झालो आणि धर्मांतराच्या खोट्या प्रवाहात असाच वाहत गेलो तर आपले शेजारील शत्रू राष्ट्र त्याचा गैरफायदा घेऊन आपल्यावर अधिकार गाजवू शकतात किंवा धर्माच्या नावावर देशाचे पुन्हा एकदा विभाजन करू शकतात.  हे लक्षात ठेवले पाहिजे कि सैन्य हे भारतीय सीमेचे रक्षण करू शकतात तिथे लढा देऊ शकतात पण देशांतर्गत प्रत्येक ठिकाणी पोहचणे सैन्याला शक्य नाही म्हणून सावधान हिंदुस्थान इतकंच सांगावस वाटत. 




सचिन कृष्णा तळे 








Tuesday, 10 August 2021

स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण

 वंदे मातरम 

( नाव ) 

इथे उपस्तिथ असलेल्या सर्व भारतीयांना माझ्या कडून स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा... 


आजचा हा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला कारण भारताला १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री नवा जन्म मिळाला. अनेक स्वातंत्र सैनिकांच्या परिश्रमाने बलिदानाने भारताची पारतंत्र्यातून सुटका झाली. अनेकांचे रक्त सांडले अनेकांचे घर उद्धस्त झाले. कोणी लेखणीतून , कोणी चळवळीतून , कोणी संघर्षांतून जमेल तस देशासाठी लढले म्हणून आपण आज जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव साजरा करू शकतोय आणि ह्याचा आपल्या सर्वाना अभिमान हवा. आपल्या देशात विविधतेमधे एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय आम्ही एक आहोत आणि आमचा झेंडा हा सुद्धा एक आहे तो म्हणजे आपला तिरंगा . हा तिरंगा असाच फडकत विश्व विजयी होवो आणि आमच्या साठी भारत हा सदैव भाग्य विधाता राहो. मी माझं शिक्षण आणि माझ्या अंतर्गत असणारी कला ज्ञान देशाच्या प्रगतीसाठी कशी उपयोगी ठरेल ह्या साठी सदैव प्रयत्न करेल. 


आपल्या पूर्वजांच्या बलीदानास आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांना नमन करून आपणां सर्वांना स्वातंत्र्यतेच्या खुप खुप शुभकामना. आशा करतो की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपल एक आदर्श स्थापीत करेल . . . जय हिंद  ! जयभारत !


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale