जागतिक हृदय दिनाच्यानिमित्ताने चला घेऊ हृदयाची काळजी
"भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनाने विविध व्याधींनी ग्रासल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. अश्यावेळी निरोगी हृदय ठेवण्यासाठी, हृदय संधर्भात जनजागृती होण्यासाठी जागतिक स्तरावर दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. देशात लहान वयात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी वयाच्या १२ व्या वर्षीही मुलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात."
हृदयविकार किंवा हृदयाची स्थिती ही विविध समस्या आहेत जी तुमच्या हृदयावर परिणाम करू शकतात आणि त्यांना अनेकदा असे म्हटले जाते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग. यामध्ये हृदयातील जन्मजात विकृती, अनियमित हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांचे विकार यांचा समावेश असू शकतो. हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमनी रोगामुळे होऊ शकतो, हा हृदयविकाराचा सर्वात प्रचलित प्रकार आहे. हृदय निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि नियमित जीवनशैली आवश्यक आहे. पण त्यासोबत जड, गरम, मसालेदार, आंबट-तिखट पदार्थांचे अतिसेवन; जास्त शारीरिक श्रम, भीती, ताणतणाव, जास्त किंवा कमी खाणे, नैराश्य, राग इत्यादींमुळेही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदय हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. दिवसातून सुमारे दहा लाख वेळा आणि एका मिनिटात ६०-९० वेळा धडकते. तज्ज्ञांनी हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या अनेक घटकांकडे लक्ष वेधले आहे. सोडियमचे अधिक प्रमाण असलेला आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अति मद्यपान, खूप सक्रिय नसणे आदी कारणांनी हृदयविकाराला आमंत्रण मिळते. उच्च हिमोग्लोबिन पातळी देखील तुमच्या हृदयाचा धोका वाढवू शकते. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा (कॅल्शियम कमी असल्याने) झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि तो जीवघेणा ठरू शकतो.
हृदयविकाराचा धोका हा वयोमानापरत्व वाढता असला तरीही त्याची लागण ही अनेक अनुवंशिक आणि पर्यावरणातील घटकांवरही अवलंबून असते. मात्र अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचे निष्पन्न झाले आहे. वयाच्या विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीकधी एसिडिटी किंवा गॅसेसच्या त्रासामुळे देखील आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. हाच त्रास असेल असा गैरसमज होऊन लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने लोकांना जीव गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. तरुणांनानी जर आहार आणि जीवनशैलीतील बदल आजपासूनच केले तर हृदयरोगाच्या संभाव्य शक्यतेला दहा ते पंधरा वर्षं पुढं ढकललं जाऊ शकतं. काही लोकांच्या बाबतीत तो पूर्णतः टाळलाही जाऊ शकतो हे लक्ष्यात घेतले गेले पाहिजे. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्त प्रवाह मिळत नाही तेव्हा इस्केमिक हृदयरोग होतो, ज्यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका येतो.
हार्ट अटॅक आल्यानंतरच्या पहिला तासाला डॉक्टर 'गोल्डन अवर' म्हणतात. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी हा एक तास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. लक्षणं दिसताच रुग्णाला पहिल्या तासात वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. या एक तासात हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा पहिल्या तासातच मोकळा करण्यात आला. तर, हार्ट अटॅक रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त असते. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हृदयाचे स्नायू ८०-९० मिनिटांनी हळूहळू मृत पावण्यास सुरूवात होते. उपचारासाठी उशीर झाला तर हृदयाचे ठोसे अनियमित होतात. लक्ष्यात असू द्या छातीत दुखू लागल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ घालवू नये. तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचून ECG काढावा. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो. मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना CPR दिल्यामुळे रक्तप्रवाह सुरू रहातो. हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन CPR असं म्हटलं जातं.
हृदय कमकुवत का होते ?
- तणावपूर्ण आयुष्य
- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा
- धूम्रपान, तंबाखू, दारूचं व्यसन
-उशिरापर्यंत काँप्युटरवर काम
- धूम्रपान, तंबाखू, दारूचं व्यसन
हार्ट अटॅकची लक्षणं?
- छातीत दुखतं, अस्वस्थ वाटणे
- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात कळा
- मन अस्वस्थ होणे
- चक्कर येणे
- प्रचंड घाम येणे
- श्वास घेण्यात अडचण
- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घेणे
सचिन कृष्णा तळे


