Monday, 30 September 2024

जागतिक हृदय दिनाच्यानिमित्ताने चला घेऊ हृदयाची काळजी

 जागतिक हृदय दिनाच्यानिमित्ताने चला घेऊ हृदयाची काळजी 



"भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनाने विविध व्याधींनी ग्रासल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. अश्यावेळी निरोगी हृदय ठेवण्यासाठी, हृदय संधर्भात जनजागृती होण्यासाठी जागतिक स्तरावर दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. देशात लहान वयात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी वयाच्या १२ व्या वर्षीही मुलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात."


हृदयविकार किंवा हृदयाची स्थिती ही विविध समस्या आहेत जी तुमच्या हृदयावर परिणाम करू शकतात आणि त्यांना अनेकदा असे म्हटले जाते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग. यामध्ये हृदयातील जन्मजात विकृती, अनियमित हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांचे विकार यांचा समावेश असू शकतो. हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमनी रोगामुळे होऊ शकतो, हा हृदयविकाराचा सर्वात प्रचलित प्रकार आहे. हृदय निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि नियमित जीवनशैली आवश्यक आहे. पण त्यासोबत जड, गरम, मसालेदार, आंबट-तिखट पदार्थांचे अतिसेवन; जास्त शारीरिक श्रम, भीती, ताणतणाव, जास्त किंवा कमी खाणे, नैराश्य, राग इत्यादींमुळेही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदय हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. दिवसातून सुमारे दहा लाख वेळा आणि एका मिनिटात ६०-९० वेळा धडकते.  तज्ज्ञांनी हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या अनेक घटकांकडे लक्ष वेधले आहे. सोडियमचे अधिक प्रमाण असलेला आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अति मद्यपान, खूप सक्रिय नसणे आदी कारणांनी हृदयविकाराला आमंत्रण मिळते. उच्च हिमोग्लोबिन पातळी देखील तुमच्या हृदयाचा धोका वाढवू शकते. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा (कॅल्शियम कमी असल्याने) झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि तो जीवघेणा ठरू शकतो.


हृदयविकाराचा धोका हा वयोमानापरत्व वाढता असला तरीही त्याची लागण ही अनेक अनुवंशिक आणि पर्यावरणातील घटकांवरही अवलंबून असते. मात्र अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचे निष्पन्न झाले आहे. वयाच्या विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीकधी एसिडिटी किंवा गॅसेसच्या त्रासामुळे देखील आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. हाच त्रास असेल असा गैरसमज होऊन लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने लोकांना जीव गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. तरुणांनानी जर आहार आणि जीवनशैलीतील बदल आजपासूनच केले तर हृदयरोगाच्या संभाव्य शक्यतेला दहा ते पंधरा वर्षं पुढं ढकललं जाऊ शकतं. काही लोकांच्या बाबतीत तो पूर्णतः टाळलाही जाऊ शकतो हे लक्ष्यात घेतले गेले पाहिजे. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्त प्रवाह मिळत नाही तेव्हा इस्केमिक हृदयरोग होतो, ज्यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका येतो.


हार्ट अटॅक आल्यानंतरच्या पहिला तासाला डॉक्टर 'गोल्डन अवर' म्हणतात. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी हा एक तास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. लक्षणं दिसताच रुग्णाला पहिल्या तासात वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. या एक तासात हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा पहिल्या तासातच मोकळा करण्यात आला. तर, हार्ट अटॅक रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त असते. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हृदयाचे स्नायू ८०-९० मिनिटांनी हळूहळू मृत पावण्यास सुरूवात होते. उपचारासाठी उशीर झाला तर हृदयाचे ठोसे अनियमित होतात. लक्ष्यात असू द्या छातीत दुखू लागल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ घालवू नये. तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचून ECG काढावा. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो. मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना CPR दिल्यामुळे रक्तप्रवाह सुरू रहातो. हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन CPR असं म्हटलं जातं. 



हृदय कमकुवत का होते ?


- तणावपूर्ण आयुष्य

- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा

- धूम्रपान, तंबाखू, दारूचं व्यसन

-उशिरापर्यंत काँप्युटरवर काम

- धूम्रपान, तंबाखू, दारूचं व्यसन


हार्ट अटॅकची लक्षणं?


- छातीत दुखतं, अस्वस्थ वाटणे

- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात कळा

- मन अस्वस्थ होणे

- चक्कर येणे

- प्रचंड घाम येणे

- श्वास घेण्यात अडचण

- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घेणे


सचिन कृष्णा तळे

Thursday, 19 September 2024

चुकले आमचे काही तर क्षमा असावी... SORRY BAPPA

 चुकले आमचे काही तर क्षमा असावी... SORRY BAPPA 





"आपण आपल्या लाडक्या बाप्पा ला निरोप दिला, निरोप देताना "चुकले आमचे काही तर क्षमा असावी" म्हणून विनवणी केली. पण ज्या लाडक्या बाप्पा ला आपण आनंदात घरात विराजमान केलं, ज्या मूर्तीत आपण आपल्या बाप्पा ची आराधना केली , ज्याच्या पायावर आपण दहा दिवस पूजा केली ती बाप्पा ची मूर्ती आज कोणत्या अवस्थेत असेल याचा कोणीच विचार का करत नाही ? आपले देव हे आपल्या मनोरंजन चा भाग नसून श्रद्धेचा अन आपल्या आत्म्याशी एकरूप झालेल्या त्या परमेश्वराचा अंश आहे आणि आपण हे विसरूलोय ! निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गतःच ती विलीन करायची असते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेसुद्धा करायचे असते. नकळत आपणच आपल्या देवाची विटंबना करतोय , हे थांबलं पाहिजे"  


‘गणपत्ती बाप्पा मोरया’ चा जयघोष करीत घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणेशोत्सवामुळे शहरात गावात अन घरोघरी उत्साहाचे वातावरण होते. बघता बघता १० दिवस कसे गेले कोणालाच कळले नाही. गणेश चतुर्थीच्या सर्वात उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे जात, पंथ आणि सामाजिक स्थितीचे अडथळे तोडून लोकांना एकत्र आणण्याची शक्ती. संपूर्ण भारतातील व्यस्त शहरे आणि लहान गावांमध्ये हा सण समान उत्साहाने साजरा केला जातो. सुंदर देखावे उभारण्यासाठी लहान मोठे थोर सगळे समुदाय एकत्र येतात, जेथे लोक जमू शकतात, प्रार्थना करू शकतात आणि आशीर्वाद घेऊ शकतात असा एकमेव सार्वजनिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे. गणेश उत्सव विविधतेत एकता दर्शवते कारण सर्व लोक उत्सवात सामील होतात. एकजुटीची ही भावना प्रत्येकामध्ये मैत्री, समज आणि सुसंवाद वाढवते. खूप मोठ्या प्रमाणत या दहा दिवसांत आर्थिक उलाढाल होते तर अश्या सणाला काही ठिकाणी काही समाजकंठकांकडून गालभोट लावण्याचा प्रयत्न देखील होतो आणि त्याचे रूपांतर नकळत दंगलीत दिसून येते.  


गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक करणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणपती विसर्जनाच्या बाबतीतही असेच आहे.  गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात. विसर्जनावेळी भव्य देखावे रथ अन न ऐकू वाटणारे डीजे अन बेसूरेली गाणी तर कुठे ढोल ताशांचा गजर तर कुठे लेजीम अन टाळ गर्जना. प्रत्येकजण आपआपल्या परीने देवाला निरोप देण्याचा प्रयत्न करतो. त्यात मंडळाची चढाओढ भयानक रूप धारण करून रस्त्यावर उतरतात. गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं. पण देवाला निरोप देण्याचा मार्ग चुकतोय! ज्या प्रकारे आपण निरोप देतोय ती आपली संस्कृती नाही तसे आपले धार्मिक शिकवण नाही. 


ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाची भूमिका बजावत होते. महाभारत लिहिण्याचे काम हे दहा दिवस अविरतपणे चालू होते. त्यामुळे गणपती बाप्पांनी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते. हा गणपती बाप्पांचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी वंदता आहे. कदाचित या दहा दिवसात बाप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवैद्यासाठी गोडधोड, मोदक वगैरे करण्याची परंपरा आहे.अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यात डुबकी मारल्याविना गत्यंतर नव्हती असेही अख्यायिका आहे. त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. अशी पौराणिक कथा आहे म्हणून आपण आपल्या लाडक्या बाप्पाला दहा दिवसाने निरोप देत त्याचे पाण्यात विसर्जन करतो. 


पण विसर्जनानंतर ज्या ठिकाणी आपण आपल्या बाप्पा ला निरोप देतो त्या ठिकाणी तोच आपला बाप्पा काय अवस्थेत असेल याची आपल्याला काहीही पडलेले नसत. नकळत आपण च आपल्या देवाची विटंबना तरी करत नाही ना ? अशी शंका सुद्धा आपल्या मनाला शिवत नाही हे नवलच.  शाडू माती किंवा माती पासून गणेशाची मूर्ती तयार करून ती माती पाण्यात पूर्ण विरघळी जाईल याच भावनेने या सणाची सुरवात झाली असेल पण बघता बघता मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिस ने जागा घेतली आणि नदी काठी , समुंद्रा च्या काठावर असंख्य गणेश मुर्त्या ज्या अवस्थेत दिसू लागली ते पाहून मन अस्वस्थ होत. त्या सुंदर मुर्त्या पाहून त्याची विटंबना पाहून असं वाटत आता नको हा उत्सव. प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटन होत नाही. विसर्जनानंतर समुद्र वा अन्य जलाशयात हे पीओपी तसेच पडून राहते. त्यामुळे पीओपीची उंच मूर्ती एकदा आणली की तिचे विसर्जन करू नये. शक्यतो केवळ लहान पूजनाच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. 


आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा म्हटलं, तर सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीचा विचार केला तर. या मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्याची प्रथा आहे. वाहते पाणी म्हटले की, सर्वांत आधी नदी डोळ्यांसमोर येते. परंतु, शहरांमधील नदी वाहती वाटली, तरी ती मानवनिर्मित प्रदूषणामुळे मृतवत झालेली आहे. जे पाणी आपण दूषित केलं, जे पाणी आपण प्राशन करू शकत नाही त्याच पाण्यात देवाची मूर्ती विसर्जित करणे योग्य आहे का? 


असो, गणपती ही वैश्विक आणि वैदिक देवता असून हिंदू धर्मात कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याच्या आधी सर्वांत प्रथम विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले जाते. अश्या गणेशाची प्रतिमात्मक छोटी मूर्ती ची पूजा करून त्याची विसर्जन करण्याचं ठरवू आणि देवाचं देवपण टिकवून ठेवू. 


सचिन कृष्णा तळे 

Saturday, 7 September 2024

"गणेशोस्तव"- जगभरातील भक्तिमय चळवळ

"गणेशोस्तव"- जगभरातील भक्तिमय चळवळ 


"खरं तर तो कुठेच जात नाही, इथेच असतो. अनादी,अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्या या आपल्या लाडक्या देवाला आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार. प्राणप्रतिष्ठापना आणि विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ आहेत. गणेश म्हणजे या श्रुष्टीचं तत्व. विसर्जन हे माणसांचं होत, देवाचं नाही. बाप्पा वेगवेगळ्या दिवसांसाठी घरात विराजमान होतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस तर काही जणांकडे एकवीस दिवस देखील गणपतीची स्थापना केली जाते. आता गणेशोत्सव हा महाराष्ट्र किंवा भारत इतकाच मर्यादित राहिला नाही तर जगभरात बाप्पा विराजमान होतात आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. लोकांना एकत्र आण्यासाठी चालू झालेली हि भक्तिमय चळवळ जगभरात अश्या प्रकारे रुजली कि इथला प्रत्येक व्यक्ती हा भगवंताची वर्षभर वाट पाहतो. आणि जेव्हा तो दिवस उजाडतो तेंव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो." 





पहिला सार्वजनिक गणेशोत्सव हा भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सुरू केल्याचा सांगण्यात येत तर ब्रिटीश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढू लागले आणि कलम १४४ नुसार, इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना गटांमध्ये एकत्र येण्यापासून रोखले, तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग म्हणून १८९४ मध्ये पुण्यातील शनिवाड्यात गणपती उत्सव सुरू केला. असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा, गणपती बाप्पा नायनाट करत आहे, अशी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून भाऊसाहेब रंगारी यांनी राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणारी लाकूड व भुशाचा वापर करून गणेशाची मूर्ती बनवली आणि त्याची स्थापना केली. भाऊ साहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाला सर्वप्रथम सार्वजनिक रूप दिलं असलं तरी, देशभर त्याला व्यापक स्वरूप व दिशा देण्याचे काम टिळकांनी केलं. पण महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे. नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्यात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पेशव्यांचे सरदार देखील त्यांचं अनुकरण करू लागले होते. पुरंदरसारख्या किल्ल्यांवर देखील गणेशोत्सव साजरा केला जात असे. 


महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यातही मानाच्या पाच गणतींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक येतात. गणेशोत्सवाला सुरुवात होत असून यानिमित्ताने आपण मानाच्या पाच गणपतींची माहिती घेऊ. पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखले जातात. त्यांना गणेशोत्सवात विशेष महत्व असते. 


मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला १४०० वर्षांचा इतिहास आहे. विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात आहे. तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही. या गणपतीच्या डोळ्यांत हिरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते. १६३६ मध्ये जेव्हा शहाजीराजांनी लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. १८९३ साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो.


मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी गणपती

हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जात असे; पण २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो.  तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. आप्पा बळवंत चौकात तुम्हाला या गणेशाचं दर्शन करता येईल. 


मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीच म्हणजे १८८७ सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या उत्सवाचा पाया रचला तो भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. सुरुवातीला हा गणपती तालीममध्ये बसवला जायचा; पण आता ही तालीम अस्तित्वात नाही. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने तुळशीबागेच्या दिशेने चालत गेल्यावर लगेच गुरुजी तालीम गणपतीचे दर्शन घेता येत. 


मानाचा चौथा गणपती -तुळशीबाग गणपती

पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तिकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे. पुणे शहरातील आकाराने आणि उंचीने मोठी असलेली गणेशाची मूर्ती असल्याने हा गणपती भाविकांचे आकर्षण आहे.


मानाचा पाचवा गणपती – केसरी वाडा गणपती

पुण्यातला शेवटचा व पाचवा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो, तो म्हणजे केसरी वाडा गणपती. १८९४ पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला. त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने या ठिकाणी होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूकदेखील पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते. मात्र, केसरी वाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते.


सचिन कृष्णा तळे 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale