Thursday, 19 September 2024

चुकले आमचे काही तर क्षमा असावी... SORRY BAPPA

 चुकले आमचे काही तर क्षमा असावी... SORRY BAPPA 





"आपण आपल्या लाडक्या बाप्पा ला निरोप दिला, निरोप देताना "चुकले आमचे काही तर क्षमा असावी" म्हणून विनवणी केली. पण ज्या लाडक्या बाप्पा ला आपण आनंदात घरात विराजमान केलं, ज्या मूर्तीत आपण आपल्या बाप्पा ची आराधना केली , ज्याच्या पायावर आपण दहा दिवस पूजा केली ती बाप्पा ची मूर्ती आज कोणत्या अवस्थेत असेल याचा कोणीच विचार का करत नाही ? आपले देव हे आपल्या मनोरंजन चा भाग नसून श्रद्धेचा अन आपल्या आत्म्याशी एकरूप झालेल्या त्या परमेश्वराचा अंश आहे आणि आपण हे विसरूलोय ! निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गतःच ती विलीन करायची असते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेसुद्धा करायचे असते. नकळत आपणच आपल्या देवाची विटंबना करतोय , हे थांबलं पाहिजे"  


‘गणपत्ती बाप्पा मोरया’ चा जयघोष करीत घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणेशोत्सवामुळे शहरात गावात अन घरोघरी उत्साहाचे वातावरण होते. बघता बघता १० दिवस कसे गेले कोणालाच कळले नाही. गणेश चतुर्थीच्या सर्वात उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे जात, पंथ आणि सामाजिक स्थितीचे अडथळे तोडून लोकांना एकत्र आणण्याची शक्ती. संपूर्ण भारतातील व्यस्त शहरे आणि लहान गावांमध्ये हा सण समान उत्साहाने साजरा केला जातो. सुंदर देखावे उभारण्यासाठी लहान मोठे थोर सगळे समुदाय एकत्र येतात, जेथे लोक जमू शकतात, प्रार्थना करू शकतात आणि आशीर्वाद घेऊ शकतात असा एकमेव सार्वजनिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे. गणेश उत्सव विविधतेत एकता दर्शवते कारण सर्व लोक उत्सवात सामील होतात. एकजुटीची ही भावना प्रत्येकामध्ये मैत्री, समज आणि सुसंवाद वाढवते. खूप मोठ्या प्रमाणत या दहा दिवसांत आर्थिक उलाढाल होते तर अश्या सणाला काही ठिकाणी काही समाजकंठकांकडून गालभोट लावण्याचा प्रयत्न देखील होतो आणि त्याचे रूपांतर नकळत दंगलीत दिसून येते.  


गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक करणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणपती विसर्जनाच्या बाबतीतही असेच आहे.  गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात. विसर्जनावेळी भव्य देखावे रथ अन न ऐकू वाटणारे डीजे अन बेसूरेली गाणी तर कुठे ढोल ताशांचा गजर तर कुठे लेजीम अन टाळ गर्जना. प्रत्येकजण आपआपल्या परीने देवाला निरोप देण्याचा प्रयत्न करतो. त्यात मंडळाची चढाओढ भयानक रूप धारण करून रस्त्यावर उतरतात. गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं. पण देवाला निरोप देण्याचा मार्ग चुकतोय! ज्या प्रकारे आपण निरोप देतोय ती आपली संस्कृती नाही तसे आपले धार्मिक शिकवण नाही. 


ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाची भूमिका बजावत होते. महाभारत लिहिण्याचे काम हे दहा दिवस अविरतपणे चालू होते. त्यामुळे गणपती बाप्पांनी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते. हा गणपती बाप्पांचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी वंदता आहे. कदाचित या दहा दिवसात बाप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवैद्यासाठी गोडधोड, मोदक वगैरे करण्याची परंपरा आहे.अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यात डुबकी मारल्याविना गत्यंतर नव्हती असेही अख्यायिका आहे. त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. अशी पौराणिक कथा आहे म्हणून आपण आपल्या लाडक्या बाप्पाला दहा दिवसाने निरोप देत त्याचे पाण्यात विसर्जन करतो. 


पण विसर्जनानंतर ज्या ठिकाणी आपण आपल्या बाप्पा ला निरोप देतो त्या ठिकाणी तोच आपला बाप्पा काय अवस्थेत असेल याची आपल्याला काहीही पडलेले नसत. नकळत आपण च आपल्या देवाची विटंबना तरी करत नाही ना ? अशी शंका सुद्धा आपल्या मनाला शिवत नाही हे नवलच.  शाडू माती किंवा माती पासून गणेशाची मूर्ती तयार करून ती माती पाण्यात पूर्ण विरघळी जाईल याच भावनेने या सणाची सुरवात झाली असेल पण बघता बघता मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिस ने जागा घेतली आणि नदी काठी , समुंद्रा च्या काठावर असंख्य गणेश मुर्त्या ज्या अवस्थेत दिसू लागली ते पाहून मन अस्वस्थ होत. त्या सुंदर मुर्त्या पाहून त्याची विटंबना पाहून असं वाटत आता नको हा उत्सव. प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटन होत नाही. विसर्जनानंतर समुद्र वा अन्य जलाशयात हे पीओपी तसेच पडून राहते. त्यामुळे पीओपीची उंच मूर्ती एकदा आणली की तिचे विसर्जन करू नये. शक्यतो केवळ लहान पूजनाच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. 


आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा म्हटलं, तर सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीचा विचार केला तर. या मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्याची प्रथा आहे. वाहते पाणी म्हटले की, सर्वांत आधी नदी डोळ्यांसमोर येते. परंतु, शहरांमधील नदी वाहती वाटली, तरी ती मानवनिर्मित प्रदूषणामुळे मृतवत झालेली आहे. जे पाणी आपण दूषित केलं, जे पाणी आपण प्राशन करू शकत नाही त्याच पाण्यात देवाची मूर्ती विसर्जित करणे योग्य आहे का? 


असो, गणपती ही वैश्विक आणि वैदिक देवता असून हिंदू धर्मात कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याच्या आधी सर्वांत प्रथम विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले जाते. अश्या गणेशाची प्रतिमात्मक छोटी मूर्ती ची पूजा करून त्याची विसर्जन करण्याचं ठरवू आणि देवाचं देवपण टिकवून ठेवू. 


सचिन कृष्णा तळे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale