Thursday, 26 February 2026

हरिलाल गांधी : संघर्ष, धर्मांतर आणि एका महापुरुषाच्या सावलीतील जीवन

 महात्मा गांधीजींचे ज्येष्ठ पुत्र Harilal Gandhi यांचे जीवन हे केवळ एका महापुरुषाच्या मुलाचे जीवन नव्हते, तर ते संघर्ष, असंतोष, आत्मशोध आणि वेदनांनी व्यापलेले एक मानवी नाटक होते. त्यांच्या आयुष्यातील १९३६ मधील धर्मांतराचा प्रसंग हा भारतीय समाजात आणि त्या काळच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरला.


हरिलाल गांधी यांचा जन्म १८८८ मध्ये झाला. ते Mahatma Gandhi आणि Kasturba Gandhi यांचे ज्येष्ठ पुत्र होते. वडिलांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड प्रभावशाली आणि आदर्शवादी होते. संपूर्ण देशासाठी ते “बापू” होते; परंतु हरिलालसाठी ते एक कठोर शिस्तीचे वडील होते.

हरिलाल यांची इच्छा इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होण्याची होती जसे गांधीजी झाले होते. मात्र गांधीजींनी त्यांना ती संधी दिली नाही. त्यांनी आपल्या मुलांनाही साधेपणाचे, त्यागाचे आणि स्वावलंबनाचे जीवन जगण्याचा आग्रह धरला. या निर्णयामुळे हरिलाल यांच्या मनात खोलवर नाराजी निर्माण झाली.

१९३६ मधील धर्मांतर

१९३६ साली, वयाच्या ४८ व्या वर्षी, हरिलाल गांधी यांनी सार्वजनिकरित्या इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव “अब्दुल्ला गांधी” असे जाहीर केले. हा प्रसंग देशभर चर्चेचा विषय ठरला. त्या काळात हिंदू-मुस्लिम संबंध ताणलेले होते, आणि गांधीजी राष्ट्रीय एकतेसाठी प्रयत्नशील होते. अशा वेळी त्यांच्या स्वतःच्या मुलाने धर्मांतर केल्याची बातमी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची ठरली.

काही अहवालांनुसार, हरिलाल यांचे धर्मांतर हे केवळ धार्मिक श्रद्धेमुळे नव्हते; तर ते त्यांच्या वैयक्तिक असंतोष, आर्थिक अडचणी आणि वडिलांविरुद्धच्या भावनिक बंडाचे प्रतीक होते. त्यांच्या आयुष्यात व्यसनाधीनता, आर्थिक अस्थिरता आणि कुटुंबातील ताणतणाव होते

पुनः हिंदू धर्मात वापसी

धर्मांतरानंतर काही काळातच हरिलाल गांधी यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. हा निर्णयही तितकाच चर्चेत राहिला. त्यांच्या आयुष्यातील या घडामोडी त्यांच्या अस्थिर मानसिक अवस्थेचे आणि जीवनातील दिशाहीनतेचे प्रतीक मानल्या जातात.

गांधीजींनी या संपूर्ण प्रसंगावर सार्वजनिक प्रतिक्रिया देताना संयम दाखवला. त्यांनी मुलाच्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला, पण द्वेष किंवा कटुता दाखवली नाही. त्यांच्या दृष्टीने धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय होता; परंतु त्यांनी हरिलाल यांच्या जीवनातील अधःपतनाबद्दल दुःख व्यक्त केले होते.

हरिलाल गांधी यांचे पुढील आयुष्य अधिकच दुःखद ठरले. ते व्यसनांच्या आहारी गेले, आर्थिकदृष्ट्या कोलमडले आणि कुटुंबापासून दुरावले. १९४८ मध्ये, गांधीजींच्या हत्येनंतर काही महिन्यांनीच, त्यांचे निधन झाले. शेवटच्या काळात ते अत्यंत दीन अवस्थेत होते, अशी नोंद आढळते.

हरिलाल गांधी यांची कथा ही केवळ धर्मांतराची नाही; ती एका व्यक्तीच्या ओळखीच्या शोधाची, अपूर्ण अपेक्षांची आणि पित्याच्या महानतेच्या सावलीत हरवलेल्या मुलाची कथा आहे.

एका बाजूला राष्ट्रपिता म्हणून पूजले जाणारे महात्मा गांधी, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचे स्थान शोधत भटकणारा त्यांचा ज्येष्ठ पुत्र हा विरोधाभास इतिहासात कायम लक्षात राहील.

हरिलाल गांधींचे जीवन आपल्याला सांगते की महान व्यक्तिमत्त्वांच्या कुटुंबियांनाही मानवी कमजोरी, भावना आणि संघर्ष यांपासून सुटका नसते. त्यांच्या आयुष्याकडे केवळ टीकेच्या नजरेने नव्हे, तर सहानुभूतीने पाहण्याची गरज आहे.


जे आहे ते आहे

Thursday, 19 February 2026

१९ फेब्रुवारी – शिवजन्मोत्सवाचा जल्लोष आणि बलिदानाची वेदना.

 १९ फेब्रुवारी – शिवजन्मोत्सवाचा जल्लोष आणि बलिदानाची वेदना.

१९ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रत्येक हिंदूच्या, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमानाने कोरलेला दिवस. हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन स्वराज्याचे शिल्पकार, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे युगपुरुष! गावागावात ढोल-ताशे, भगवे झेंडे, मिरवणुका, व्याख्याने, रक्तदान शिबिरे… सर्वत्र एकच जयघोष “जय भवानी, जय शिवाजी!”




पण या जल्लोषाच्या सावलीत एक वेदना देखील आहे. फेब्रुवारी महिन्यातच आपण स्मरण करतो ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या अमर बलिदानाचे. हा महिना केवळ उत्सवाचा नाही, तर त्याग, साहस आणि धर्मरक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या एका महान राजाच्या स्मरणाचा आहे.

स्वराज्याचा जन्म आणि त्याची किंमत

शिवजन्मोत्सव साजरा करताना आपण केवळ इतिहासातील एक घटना साजरी करत नाही, तर एका विचाराचा जन्म साजरा करतो अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा विचार, स्वाभिमानाचा विचार, धर्म आणि संस्कृती रक्षणाचा विचार.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची पायाभरणी केली, त्यासाठी असंख्य मावळ्यांनी रक्त सांडले. त्यांनी शिकवले की राज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे; राज्य म्हणजे प्रजेचे कल्याण, स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे रक्षण आणि न्यायनिष्ठ कारभार.

बलिदानाचा महिना – संभाजी राजांचा अमर इतिहास

ज्यांनी स्वराज्य उभं केलं, त्यांचे वारसदार म्हणून संभाजी महाराजांनी त्याची जबाबदारी सांभाळली. औरंगजेबाच्या अमानुष छळाला सामोरे जातानाही त्यांनी धर्मांतर नाकारलं. त्यांच्या डोळ्यांसमोर क्रूर अत्याचार झाले, पण त्यांनी हिंदू धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्य यासाठी प्राण दिले.

संभाजी महाराजांचे बलिदान हे केवळ एका राजाचा मृत्यू नव्हे, तर अन्यायाविरुद्ध झुकणार नाही, हा हिंदू स्वाभिमानाचा जाज्वल्य संदेश आहे. म्हणूनच फेब्रुवारी महिना हा आनंद आणि वेदना यांचा संगम ठरतो.

आज आपण शिवजयंतीला मोठ्या थाटामाटात साजरे करतो. स्टेज, डीजे, देखावे, सोशल मीडियावरील पोस्ट… पण आपण खरंच महाराजांचा एक तरी गुण आत्मसात करतो का?


अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का?

स्त्रियांचा सन्मान करतो का?

भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम उभे राहतो का?

समाजात एकोपा आणि धर्मनिष्ठा जपतो का?


जर हे नसेल, तर आपला उत्सव केवळ दिखावा ठरतो

१९ फेब्रुवारीला आपण आनंदाने शिवजन्मोत्सव साजरा करतो. त्याच महिन्यात आपण संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवतो. एकीकडे जन्माचा उत्सव, तर दुसरीकडे बलिदानाची वेदना.

ही दोन भावना आपल्याला एकच संदेश देतात .स्वराज्य केवळ मिळवायचं नसतं, ते टिकवायचं असतं. आणि ते टिकतं त्यागाने, निष्ठेने आणि स्वाभिमानाने.

शिवजयंती आणि बलिदान मास हे दोन वेगळे प्रसंग नाहीत, तर एका अखंड परंपरेचे दोन टप्पे आहेत. शिवरायांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला, संभाजी राजांनी तो आपल्या रक्ताने तेजस्वी ठेवला.

सचिन कृष्णा तळे ✍️

आहे ते आहे

Wednesday, 18 February 2026

छत्रपती शिवाजी महाराज : जयंती फक्त उत्सव नाही, आत्मपरिवर्तनाची शपथ

 छत्रपती शिवाजी महाराज : जयंती फक्त उत्सव नाही, आत्मपरिवर्तनाची शपथ

दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे, मिरवणुका, फटाके, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव वातावरण भारावून जातं. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? आपण खरोखर शिवरायांचा एक तरी गुण आपल्या आयुष्यात उतरवतो आहोत का? 




शिवजयंती म्हणजे केवळ देखावा नाही; ती आत्मपरीक्षणाची संधी आहे. स्वराज्य उभारणाऱ्या त्या महान राजाने केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर लोकांच्या मनात विश्वास जिंकला. त्यांचे जीवन म्हणजे धैर्य, न्याय, शिस्त, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यांचा जिवंत धडा आहे.

शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना दिली “हिंदवी स्वराज्य”. त्याचा अर्थ फक्त राजकीय सत्ता नव्हता, तर लोकांचा सन्मान आणि अधिकार. आज आपण स्वतःचा, आपल्या मातृभाषेचा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो का? की केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकून समाधान मानतो? जर आपण शिवरायांचा एक गुण आत्मसात करायचा ठरवला, तर तो स्वाभिमान असावा  चुकीसमोर न झुकणारा आणि योग्य गोष्टीसाठी उभा राहणारा.

इतिहास साक्ष देतो की युद्धात शत्रूच्या स्त्रियाही सन्मानाने परत पाठवणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. आजच्या समाजात स्त्रियांच्या सुरक्षिततेचे प्रश्न अजूनही गंभीर आहेत. मग आपण शिवजयंती साजरी करताना स्त्री सन्मानाची प्रतिज्ञा करतो का?

खरा उत्सव तेव्हाच, जेव्हा आपल्या वागण्यातून प्रत्येक स्त्रीला सुरक्षिततेची जाणीव होईल.

शिवरायांचे सैन्य शिस्तप्रिय होते. प्रत्येक सैनिकाला जबाबदारीची जाणीव होती. आज आपण आपल्या कामात, व्यवसायात, समाजकार्यात प्रामाणिक आहोत का? जर प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले, तर तेच स्वराज्याची खरी अंमलबजावणी ठरेल.

शिवाजी महाराजांनी कधीही धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. त्यांच्या दरबारात सर्व जाती-धर्मांचे लोक सन्मानाने होते.

आज आपण मतभेद वाढवतो की ऐक्य निर्माण करतो?

शिवजयंती म्हणजे समाजात एकता निर्माण करण्याचा दिवस असायला हवा.

फटाके वाजवणे, मोठे पोस्टर लावणे, स्टेटस ठेवणे याने इतिहास बदलत नाही. शिवरायांचा एक तरी गुण आपल्या बोलण्यात, वागण्यात, आचार-विचारात उतरवणे हाच खरा उत्सव आहे.

आपलं बोलणं संयमी आणि सत्य असावं.

आपलं वागणं न्याय्य आणि सन्मानपूर्ण असावं.

आपले विचार स्वराज्याला शोभतील असे उन्नत असावेत.

जर प्रत्येक शिवभक्ताने हा संकल्प केला, तर प्रत्येक घरात स्वराज्याची ज्योत पेटेल. आणि त्या दिवशी शिवजयंती हा केवळ एक सण राहणार नाही, तर तो समाजपरिवर्तनाचा प्रारंभ ठरेल.

चला, यंदाची शिवजयंती आपण केवळ साजरी करू नये तर ती जगूया! 

आहे ते आहे

सचिन कृष्णा तळे ✍️

Wednesday, 11 February 2026

वहीतलं स्वप्न

शीर्षक : वहीतलं स्वप्न


शाळेच्या नव्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असलेली इयत्ता चौथी ची वर्गखोली नेहमीच गजबजलेली असायची. सकाळच्या प्रार्थनेनंतर, पायऱ्या चढत मुलींचा गोंधळ, हशा, पायांची धावपळ आणि दप्तरांचा आवाज सगळीकडे पसरलेला असायचा. त्या वर्गात स्वरा नावाची एक शांत मुलगी पहिल्या बाकावर नेहमी बसायची. ती बोलकी होती, पण तिच्या डोळ्यांत काहीतरी वेगळंच दिसायचं जणू शब्दांपेक्षा जास्त ती मनात चित्रं पाहत असायची .

स्वराच्या दप्तरात पुस्तकं होती, वही होती, पण त्या वह्यांमधील पानं नेहमी सारखी नव्हती. गणिताच्या वहीत आकड्यांच्या रांगा होत्या, पण त्या आकड्यांच्या शेजारी डोंगर, झाडं, घरं, सूर्य, ढग आणि कधी कधी छोट्या पक्ष्यांची चित्रं उमटलेली असायची. वर्गात शिक्षक शिकवत असताना स्वरा लक्ष देत असायची, पण मध्येच पेन्सिल आपोआप कागदावर रेषा ओढायला लागायची. त्या रेषांमधून हळूहळू एक जग तयार व्हायचं. 

एके दिवशी गणिताच्या तासाला शिक्षिकांनी अचानक वही तपासायचं ठरवलं. घाईघाईने वही उघडल्या. कुणाच्या वहीत उत्तरं चुकीची होती, कुणाची वही अस्ताव्यस्त होती, तर कुणाची पूर्णच रिकामी होती. स्वराची पाळी आली तेव्हा शिक्षिकांनी वही उघडली आणि काही क्षण त्या शांत झाल्या. आकड्यांबरोबर रंगीत चित्रं पाहून त्यांनी आश्चर्याने स्वराकडे पाहिलं.

“स्वरा, ही गणिताची वही आहे की चित्रांची?”

त्यांच्या प्रश्नावर वर्गात हसू पसरलं. काही मुलींनी खिदळत स्वराकडे पाहिलं. स्वरांचं डोकं खाली झुकलं. तिला लाज वाटली, भीती वाटली आणि कुठेतरी आपलं काहीतरी चुकीचं झालंय असंही वाटलं. त्या दिवशी उरलेल्या तासांत ती अजूनच गप्प झाली.

शाळा सुटल्यावर स्वरा नेहमीसारखी घरी आली. दप्तर कोपऱ्यात ठेवून ती शांतपणे बसून राहिली. आईने तिच्याकडे पाहिलं आणि तिला लगेच जाणवलं आज काहीतरी घडलंय. तिने हळूच विचारलं, “काय झालं गं ?”

स्वरा काही बोलली नाही. थोड्या वेळाने तिने गणिताची वही आईसमोर ठेवली. आईने ती वही उघडली. पानोपानी चित्रं पाहून ती काही क्षण शांत राहिली. मग तिने वही बंद केली, स्वराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून म्हणाली, “खूप छान चित्रं आहेत. पण शाळेत हे करताना थोडं भान ठेवायला हवं, बरोबर?”

आईचा आवाज प्रेमळ होता. त्यात राग नव्हता, भीती नव्हती. त्या रात्री जेवणानंतर स्वराने पहिल्यांदाच मन मोकळं केलं. “आई, मला चित्र काढायला खूप आवडतं. मोठी होऊन मी चित्रकार होईल .”

आईने काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी तिने हे सगळं बाबांना सांगितलं. बाबांनीही काही प्रतिक्रिया दिली नाही, पण रविवार आला तेव्हा त्यांनी स्वराला  एका चित्रकला प्रदर्शनात नेलं. तिथे मोठमोठी चित्रं, वेगवेगळ्या शैली, कलाकारांची नावं आणि त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी होत्या. “हे कलाकारही कधी शाळेतच होते,” बाबा म्हणाले, “त्यांनी अभ्यासही केला आणि आपली आवडही जपली.”

त्या दिवसापासून स्वरा बदलली. ती अभ्यास टाळत नव्हती, पण स्वप्न लपवतही नव्हती. तिने स्वतंत्र वही घेतली चित्रांसाठी. शाळेच्या वह्यांत अभ्यास, आणि घरी चित्रांसाठी मोकळा वेळ. हळूहळू शिक्षकांनाही तिची आवड कळली. कला स्पर्धेत तीच नाव दिलं गेलं.

वर्षाअखेरीस शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात स्वरांचं चित्र लावण्यात आलं. त्याच्या चित्राखाली नाव होतं. 

“चित्रकार : स्वराज्ञा तळे  (इयत्ता चौथी )”

शिक्षिका थांबून ते चित्र पाहत होत्या. त्या दिवशी स्वराला पहिल्यांदा वाटलं. आपली वही फक्त अभ्यासाची नाही, ती स्वप्नांचीही असू शकते.

प्रत्येक मुलाच्या वहीत अभ्यास असतो, पण कधी कधी त्या वहीच्या कडेला एक स्वप्न जन्म घेत असतं. पालकांनी आणि शिक्षकांनी ते ओळखलं, जपलं, तर ती छोटीशी रेषा उद्याच्या आयुष्याचं मोठं चित्र रंगवू शकते.

सचिन कृष्णा तळे ,पुणे 

७७०९०९९६४६

Tuesday, 3 February 2026

“लोकल चुकली की फक्त ट्रेन नाही, तर आयुष्यही लटकतं…”

 “लोकल चुकली की फक्त ट्रेन नाही, तर आयुष्यही लटकतं…”

“एक लोकल गेली तर दुसरी येईल” हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं. पण हे वाक्य ज्यांच्यासाठी वापरलं जातं, त्यांचं आयुष्य इतकं सोपं नसतं. बहुतेक मराठी तरुण प्रायव्हेट नोकरीत आहेत. वर्कप्लेस टॉक्सिक असतो, वेळेची लवचिकता फक्त कागदावर असते. दहा-पंधरा मिनिटं उशीर झाला, तर अर्ध्या दिवसाचा पगार कापला जातो. वरून चार शब्द ऐकावे लागतात, मान खाली घालून.

पण गंमत इथे आहे. “अर्जंट काम आहे” म्हणून दोन-दोन तास जास्त थांबवलं, सुट्टीच्या दिवशी घरून काम करून घेतलं,

तेव्हा मात्र एक्स्ट्रा पगार, ओव्हरटाईम, कुठलंच गणित नसतं.

उशीर झाला की नियम आठवतात, जास्त काम झालं की जबाबदारी सांगितली जाते. म्हणूनच मराठी माणूस दररोज लोकलला लटकत प्रवास करतो नाईलाजाने, पर्याय नसल्याने.




विविध भागांतून दर सकाळी मुंबईकडे वाहणारी ही गर्दी पाहिली, तर एक गोष्ट ठळकपणे दिसते. आपल्या शहरात रोजगार नाहीत, असं आपण म्हणतो. पण खरंच नाहीत का?

किराणा दुकाने – परप्रांतीयांच्या हाती

डेअरी, हार्डवेअर, मोबाईल – परप्रांतीय

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रिपेअरिंग – यूपी-बिहारी

फ्रँकी, सँडविच, साऊथ इंडियन, पाणीपुरी, बिर्याणी – परप्रांतीय

वडापाव-मिसळ सोडली, तर उरलेला बाजार कुणाचा आहे?

आणखी वेदनादायक वास्तव म्हणजे. मराठी मालकांच्या दुकानांतसुद्धा मराठी तरुणांऐवजी परप्रांतीय किंवा नेपाळी कामावर असतात. हे असं नाही की मराठी माणसाला संधी मिळत नाही. संधी आहे… पण तो स्वतःच तिकडे वळत नाही.

कारण लहानपणापासून डोक्यात भरवलं जातं “नोकरी म्हणजे प्रतिष्ठा, स्वतःचा धंदा म्हणजे कमीपणा.” हा विचारच मराठी समाजाला आज मागे खेचतोय.

बहुतेक तरुण ५०–६० हजारांच्या पगारावर नाहीत. आजचा प्रायव्हेट पगार आणि वाढलेला खर्च याची तुलना करायला वेगळं उदाहरण द्यायची गरजच नाही. तरीही आपण म्हणतो “आमचं शहर डेव्हलप झालं, पण रोजगार नाहीत.

पण प्रश्न असा आहे, लाखोंची लोकसंख्या असलेल्या शहरात

दररोज प्रत्येक घरातून पैसा खर्च होतोय, तो पैसा जातोय तरी कुणाकडे?

रोजगार आहेत. पैसा फिरतोय. फक्त आपली रोजगाराची व्याख्या वेगळी आहे. हा लेख नोकरी विरुद्ध स्वयंरोजगार असा वाद घालण्यासाठी नाही. हा आरसा दाखवण्यासाठी आहे.

कदाचित आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आपण रोजगार शोधतोय की फक्त नोकरी ? 

Sachin Jayshree Krishna Tale

आहे ते आहे


बीडची ‘बारामती’ घडवण्याची जबाबदारी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर

 स्वप्न अपूर्ण राहणार नाही! बीडची ‘बारामती’ घडवण्याची जबाबदारी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर

बीड जिल्हा… अनेक दशकांपासून मागासलेपणाचा शिक्का घेऊन उभा असलेला, पण विकासाची तीव्र आस मनात जपणारा जिल्हा. हाच जिल्हा ‘बीडची बारामती’ व्हावा, हे स्वप्न स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केवळ पाहिलं नव्हतं, तर आपल्या कार्यकाळात त्या स्वप्नाला दिशा देण्याचा ठाम प्रयत्नही केला होता.



पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या पाच स्तंभांवर बीडचा नवा चेहरा उभा राहावा, अशी दादांची स्पष्ट भूमिका होती. मात्र त्यांच्या अचानक झालेल्या विमान अपघाती निधनानंतर हे स्वप्न अधुरंच राहणार की काय, अशी भीती जिल्ह्याच्या जनतेच्या मनात घर करून बसली होती.

“आता बीडचं काय?”

“दादांचं व्हिजन पुढे कोण नेणार?”

“पालकमंत्री कोण होणार?”

“धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री होणार का?”

असे असंख्य प्रश्न बीड जिल्ह्यातील चहाच्या टपऱ्यांपासून राजकीय वर्तुळापर्यंत चर्चेत होते. मात्र आज पालकमंत्रीपदाचा निर्णय झाल्यानंतर आणि राजकीय चित्र स्पष्ट होत. चालल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे समोर येत आहे

अजितदादा पवार यांचं स्वप्न आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांच्या खांद्यावर सुरक्षित आहे.


राजकारणातील अनुभव, संघटनात्मक ताकद आणि दादांच्या विचारांची जवळून ओळख असलेल्या सुनेत्रा पवार या केवळ नावापुरत्या वारसदार नसून, त्या त्या स्वप्नाच्या खऱ्या वाहक ठरणार, असा विश्वास आता हळूहळू जनतेमध्ये बळावत आहे.

“बीडची बारामती” हे केवळ घोषवाक्य न राहता, प्रत्यक्षात जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल का?

विकासाचा गतीमान आराखडा पुन्हा मार्गावर येईल का?

हे येणारा काळ ठरवेल.

बीडच्या विकासस्वप्नाची ज्योत विझलेली नाही… ती आता नव्या हातात, नव्या आत्मविश्वासाने पेटलेली आहे.


जे आहे ते आहे

@ Sachin Krishna Tale

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale