Saturday, 7 September 2024

"गणेशोस्तव"- जगभरातील भक्तिमय चळवळ

"गणेशोस्तव"- जगभरातील भक्तिमय चळवळ 


"खरं तर तो कुठेच जात नाही, इथेच असतो. अनादी,अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्या या आपल्या लाडक्या देवाला आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार. प्राणप्रतिष्ठापना आणि विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ आहेत. गणेश म्हणजे या श्रुष्टीचं तत्व. विसर्जन हे माणसांचं होत, देवाचं नाही. बाप्पा वेगवेगळ्या दिवसांसाठी घरात विराजमान होतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस तर काही जणांकडे एकवीस दिवस देखील गणपतीची स्थापना केली जाते. आता गणेशोत्सव हा महाराष्ट्र किंवा भारत इतकाच मर्यादित राहिला नाही तर जगभरात बाप्पा विराजमान होतात आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. लोकांना एकत्र आण्यासाठी चालू झालेली हि भक्तिमय चळवळ जगभरात अश्या प्रकारे रुजली कि इथला प्रत्येक व्यक्ती हा भगवंताची वर्षभर वाट पाहतो. आणि जेव्हा तो दिवस उजाडतो तेंव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो." 





पहिला सार्वजनिक गणेशोत्सव हा भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सुरू केल्याचा सांगण्यात येत तर ब्रिटीश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढू लागले आणि कलम १४४ नुसार, इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना गटांमध्ये एकत्र येण्यापासून रोखले, तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग म्हणून १८९४ मध्ये पुण्यातील शनिवाड्यात गणपती उत्सव सुरू केला. असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा, गणपती बाप्पा नायनाट करत आहे, अशी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून भाऊसाहेब रंगारी यांनी राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणारी लाकूड व भुशाचा वापर करून गणेशाची मूर्ती बनवली आणि त्याची स्थापना केली. भाऊ साहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाला सर्वप्रथम सार्वजनिक रूप दिलं असलं तरी, देशभर त्याला व्यापक स्वरूप व दिशा देण्याचे काम टिळकांनी केलं. पण महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे. नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्यात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पेशव्यांचे सरदार देखील त्यांचं अनुकरण करू लागले होते. पुरंदरसारख्या किल्ल्यांवर देखील गणेशोत्सव साजरा केला जात असे. 


महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यातही मानाच्या पाच गणतींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक येतात. गणेशोत्सवाला सुरुवात होत असून यानिमित्ताने आपण मानाच्या पाच गणपतींची माहिती घेऊ. पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखले जातात. त्यांना गणेशोत्सवात विशेष महत्व असते. 


मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला १४०० वर्षांचा इतिहास आहे. विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात आहे. तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही. या गणपतीच्या डोळ्यांत हिरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते. १६३६ मध्ये जेव्हा शहाजीराजांनी लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. १८९३ साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो.


मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी गणपती

हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जात असे; पण २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो.  तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. आप्पा बळवंत चौकात तुम्हाला या गणेशाचं दर्शन करता येईल. 


मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीच म्हणजे १८८७ सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या उत्सवाचा पाया रचला तो भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. सुरुवातीला हा गणपती तालीममध्ये बसवला जायचा; पण आता ही तालीम अस्तित्वात नाही. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने तुळशीबागेच्या दिशेने चालत गेल्यावर लगेच गुरुजी तालीम गणपतीचे दर्शन घेता येत. 


मानाचा चौथा गणपती -तुळशीबाग गणपती

पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तिकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे. पुणे शहरातील आकाराने आणि उंचीने मोठी असलेली गणेशाची मूर्ती असल्याने हा गणपती भाविकांचे आकर्षण आहे.


मानाचा पाचवा गणपती – केसरी वाडा गणपती

पुण्यातला शेवटचा व पाचवा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो, तो म्हणजे केसरी वाडा गणपती. १८९४ पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला. त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने या ठिकाणी होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूकदेखील पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते. मात्र, केसरी वाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते.


सचिन कृष्णा तळे 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale