Tuesday, 19 November 2019

एखाद्या शब्दासाठी.


कवितेमध्ये शब्दांची योजना करताना अभिद्या शक्तीने दिलेल्या अर्थाची जाणीवपूर्वक सुयोग्य , उचित आणि सुंदर योजना करणे म्हणजे कवीचे सोंदर्य. कवीच आपल्या शब्दातून आपल्या विचारातून आणि कल्पकतेतून अश्या काही रचना मांडत असतो कि ते रसिक वाचक वर्गाला वाचताना आपलस वाटत. कधी कधी त्याच कवितेच्या शब्दावर वाचक वर्गाला वाचताना हळूच मन एका वेगळ्या लय वर डोलायला लावत मग नकळत त्याचे गाणे  तयार होते आणि आपल्या मनाला भुरळ घालून जाते. अगदी तसेच नाशिकचे कवी गीतकार संतोष वाटपाडे ह्यांच्या कविता आहेत. ज्यांना कवितेचे येड लावून घेयच आहे आणि शिकायची आहेत त्यांनी  खास करून संतोष ह्यांच्या कविता नक्कीच वाचावे.  " हि बाग कोणाची " ह्या लोकप्रसिद्ध काव्य संग्रहानंतर संतोष ह्यांचा " एखाद्या शब्दासाठी " हा दुसरा काव्यसंग्रह लोकार्पण झाला. बघता बघता वर्ष झालं तरीही ह्या काव्यसंग्रहाची जादू कायम आहे. पहिल्या काव्य संग्रहासोबत हा काव्य संग्रह हि अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला. हे दोन्ही काव्य संग्रह म्हणजे नवोदित कवींसाठी एक गाईड आहे असेच म्हणावे लागेल.

जिथे शब्दांचा खेळ रंगतो तिथे काव्याची अन कवीच्या कल्पनेची जादू हे चालणारच. मोजक्या शब्दात विश्वाची रचना विश्व दाखवण्या ची ताकद फक्त कवितेत आहे. साहित्याच्या मंदिराला कवितारुपी सोनेरी कळस आणि त्याच्या गाभाऱ्यात रसिक श्रोता हा देव म्हणून विराजमान आहे. अभंग , संत वाणी , गाणी , पोवाडा , शाहिरांची बोली , सावरकरांची ती बंदिस्त खोली , महाभारताची कहाणी , स्वतंत्रतेचे उभारणी , सुख दुःखाची काळजी , आई ची अंगाई , बालपणाची आठवणी , नात्याची शहनाई , दुष्काळाची आरोळी कुठं कुठं नाहीय कविता . गझलांमधुन वृत्तांमधून छंदामधून ते सात सुरांच्या भेटीमधून , प्रेमातून विरहातून नात्यातून ते निसर्गाच्या मिठीतुन फुलापानांच्या श्रावणी सोहळ्यातून , अश्रूं पासून पावसाच्या थेंबातुन , एकांतात , नाटकात ,  चित्रपटात , चार चौघात  फक्त कविता आणि कविताच तर आहे. आणि ह्या सगळ्या कवितांमधून संतोषजी ह्यांच्या कविता नव्याने वाचकांना आपलंस करून घेतायत.

आजवर आपण बरेच कवींच्या कवितासंग्रह वाचले असतील. त्यात मुक्तछंद किंवा  प्रामुख्याने गझल वाचायाला मिळतील. प्रत्येक काव्यसंग्रहात कवीचे मनोगत , कवीची कविता आणि प्रस्तावना असते. पण ह्या पुस्तकाचा विषयच वेगळा आहे. इथे कविता आहेतच पण त्याचबरोबर कविता वृत्तात कसे लिहावे ह्याची माहिती अभ्यासपूर्वक सविस्तर रित्या दिली गेली आहे. कमी शब्दात नवोदिताना समजेल त्या भाषेत "वृत्तबद्ध कविता: एक शास्त्र"  आठ पानात ह्याची मांडणी केली आहे. ज्ञानेश्वरांच्या देवद्वार छंदाचा अक्षरक्रम आणि बहिणाबाई चौधरी ह्यांच्या पादाकुलक छंद तसेच ती लिहिताना मात्रा कश्या मोजाव्या त्याच मात्रांमध्ये कविता कशी सादर करावी ह्याबद्दल सांगितले आहे. त्यानंतर अक्षरगणवृत्तांची लगावली कशी असते , कालगंगा , मंदाकिनी , मृगाक्षी , आनंदकंद ,भुजंग इ अक्षरगणवृताची ओळख ह्या पुस्तकातून होते. एकूण २५ वृत्तांची माहिती देत संतोषजी म्हणतात " वृत्तबद्ध कवितेच्या शोधात प्रवास करत असताना जे जे हाती लागले ते रसिकांच्या स्वाधीन करण्याचा प्रयन्त केलाय , यापुढे वृत्तबद्ध कवितेचा शोध सुरुच राहणार" आपल्याला जे गवसलंय ते मोकळ्या हाताने नवोदितांना देत समाजात एक चांगले कवी घडवण्यासाठी संतोषजी सतत प्रयत्नशील आहेत. प्रत्येक वृत्ताची नजाकत आणि स्वभाव पटवून देण्याचे कार्य संतोषजी ह्या  काव्य संग्रहात करत आहेत.

एकूण ८९ कविता असून ह्या  काव्य संग्रहात कवीने वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलाय. रात्रीच्या अंधारातून चंद्र कोरीतून होणारी तेजोमय पहाट, कुठे संसाराचा विडा कुंकवाचा मळवट, कुठे म्हातारीची तगमग, कुठे रात्रीचा सुगधं, कुठे सांजवेळीची पश्चिमा ,कुठे लागट गाठ.  इथे सटवाईचे कासोटे, इथे मन हिरवा श्रवणमास, जिथे देव्हारा, तिथे फुटलेली एक समाधी ,तिथे गोदावरीचा काठ. कधी प्रियेचे भास, कधी निरोप सावळी, कधी बाभळीची लेक ,कधी वसंताची  हाक, कधी तलवार, कधी अनुराग, कुठे क्षितिजावर दिसतो हसरा बुद्ध. इथे नशिबाचा शाप इथे विठ्ठलाचा एकांत, इथे मदनमंजरी इथे आयुष्याचा मेणा इथे हळवी हाक इथे एक दमलेला दिवा फक्त एखाद्या शब्दासाठी… फक्त एखाद्या शब्दासाठी.


आज हि जुन्या कविता आपल्याला जितक्या आवडतात त्याच ताकदीचे नव्याने कविता लिहिणारे कवी आणि त्यांची लेखणी आहे. नव्या कवींची कविता म्हणजे सारस्वताच्या झाडावर फुटलेली पालवी आहे आणि ती जपणे आजच्या पिढीचे कर्तव्य. कविता जन्माला घालताना त्याची मांडणी करताना त्याला जगासमोर सादर करताना प्रत्येक कवी हा श्रोत्यांकडून प्रेक्षकांकडून रसिकांकडून एक आशा बाळगून असतो फक्त एखाद्या शब्दासाठी.

खांद्यावर ओघळलेल्या
रंगीत फुलांच्या वेण्या
ती आली होती केवळ
स्पर्शाना अत्तर देण्या
तळहाती ठेवुन माझ्या
व्याकुळल्या खांद्यावरती
पेरली सुगंधी कविता
बोटाने पाठीवरती 

पुस्तक - एखाद्या शब्दासाठी
कवी - संतोष वाटपाडे
प्रकाशक - स्वयं प्रकाशन
मूल्य - २२५
पाने – १०६
सचिन कृष्णा तळे






No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale