Friday, 7 February 2020

घोरपडे घाट इतिहासाचे साक्षीदार

घोरपडे घाट इतिहासाचे साक्षीदार

आपले गाव हे स्मार्ट सिटी व्हावं, आपल्या गावात सर्व सुख सोयी मिळाव्या हे प्रत्येक नागरिकांचं स्वप्न असत. माझं घर, माझं गाव, माझं शहर अन माझा ऐतिहासिक ठेवा. ऐतिहासिक ठेवा म्हणजे आपल्या पूर्वजांची ओळख.

आपण आपल्या मुलांना इतिहास शिकवतो त्यांना इतिहासाची माहिती देतो त्यासाठी त्यांना ऐतिहासिक स्थळावर घेऊन जातो त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य आणि त्यातून देव देश समाज कसा घडला ह्याची ओळख करून देतो. आपण जरा विचार करूया! जर हे स्थळ नष्ट झाले तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवू ... घाणीच्या साम्राज्यात कुजत पडलेले हे शौर्याचे अन वीरतेचे प्रतीक की एके काळी अमुक गोष्ट इथे घडली होती आणि अमुक असा इथे वाडा होता, हे सांगणार आहोत? पुण्यातील सगळ्यात जवळच उदाहरण देण्याचं झालं तर. एके काळी सात मजली असलेला शनिवार वाडा आपल्या अद्याप उभारता आलेला नाही. त्याच्या आजूबाजूस असणारे अतिक्रमण आपल्याला हटवता आले नाही. शनिवार वाड्यात भेटी देणारे लोकांची संख्या दिवसंदिवस वाढतीय त्याप्रकारे दर ही आकारले जातात. पण जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा काही अवशेष अस्थव्यस्थ तर काही माहिती फलक ते ही तुटक्या फुटक्या अवस्थेत आढळतात. आपण त्या विशाल सिंधू सागराच्या छाताडावर मुंबई किनारी छत्रपतींच भव्य स्मारक उभे करू शकतो. कामगारांच्या त्या जागेवर भव्य दिव्य स्मारकाचे योजना आखू शकतो त्यासाठी पैसा व राजकारण करू शकतो .त्याची स्वप्ने जनतेला दाखवू शकतो. परंतु आपण ज्या ठिकाणी इतिहास घडला.. ज्या जागेवर त्या वीर महा पुरुषांनी बलिदान दिल .. जिथे स्वराज्याची ध्वजा मानाने फडकावली गेली त्या जागेवर त्याकाळी जे वैभव होत, किमान त्याचे पन्नास टक्के तरी वैभव पुढच्या पिढीसाठी पुन्हा उभारू शकत नाही? किंवा त्या साठी आपल्याकडे अनुदान ही नाही? किंवा वेळ च नाही असं म्हणावं लागेल.

पुण्यातली वाढती लोकसंख्या, समस्या आणि कमी पडत चाललेले रस्ते ह्यातून पालिकेला, सरकारला कदाचित लक्ष्य देता येत नसावे. पण हा वारसा जपण्यासाठीच वारसा विभाग तयार केले गेले. फक्त ऐतिहासिक वारसाची नोंद ठेवण्यासाठी . पुण्याच्या मध्यवर्गीय भागातून वाहणारी मुळा मुठा तिच्या पात्रात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यातला एक घोरपडे घाट . हा घोरपडे घाट किती पुणेकरांना माहित असावा हे माहित नाही. 

गेल्या काही वर्षांपासून सतत माझ लक्ष वेधून घेतय ते म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या थेट समोर असलेल सुंदर असा घोरपडे घाट . त्याची तटबंदी  कोरीव दगडी चिरा, सुंदर पायऱ्या .. अन तिथे विसावलेले सुंदर असं शिव पिंड आणि नंदी . हे पाहताना उत्सुकता वाढते अन मन तितकंच अस्वस्थ होत. त्याच्या भोवती असणारे घाणीचं साम्राज्य अन त्यात देवाचा होणारा अपमान ... मान खाली टाकण्या शिवाय दुसरा पर्याय तरी काय? त्या संबधी पालिकेला विचारणा केली तर उत्तरे ही असमाधानकारक . वारसा विभागाला घोरपडे घाट आणि त्यासंबंधी साध फलक सुद्धा लावता आला नाही.

१० फेब्रुवारी १८३१ रोजी श्रीमंत यशवंतराव घोरपडे दत्तवाडकर यांचे पुत्र श्रीमंत दौलतराव घोरपडे यांनी ‘घोरपडे घाटाची निर्मिती केली होती.पूर्वी या परिसरात दौलतराव  घोरपडे दत्तवाडकर यांच्या मातुःश्री बयाबाई घोरपडे यांची समाधी होती. यालाच ‘कळकीचा बाग’ संबोधले जात होते. आठ एकर एकविस गुंठ्यांमध्ये असणारा हा परिसर ब्रिटिश सरकार कडून दौलतराव घोरपडे दत्तवाडकर यांना इनाम म्हणून देण्यात आला होता. या ठिकाणी शंभू महादेवाचे भव्य मंदिर होते. मात्र १९६१ मध्ये आलेल्या महापुरात ते वाहून गेले. सध्या घोरपडे घाटाची फारच दुरवस्था झाली आहे.असा ऐतिहासिक ठेवा आसणारा हा घोरपडे घाट  छत्रपती शिवाजी महाराज पुलाच्या बाजूला आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि कचऱ्याच्या ढिगामध्ये मोडकळीस आलेल्या घाटाच्या दगडी चिऱ्यांचे बुरूज व पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. शहरविकासाच्या प्रवाहात हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होऊ नये याची काळजी सर्वानी घेऊन ह्या वास्तू पुनरुज्जीवित कराव्यात. यासाठी स्वतः घोरपडे ह्यांचे वंशज पुढे सरसावले आहेत. दिनांक 02/02/2020 रोजी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान च्या वतीने ह्या घोरपडे घाटावर स्वच्छता आभियान राबवण्यात आले यावेळी संजय घोरपडे, दिपक घोरपडे, अनूराधा घोरपडे तसेच काही नागरिक उपस्तिथ होते. तरी हा घाट पुनःनिर्मण करणे हे प्रत्येक पुणेकरांचे कार्य आहे .

सचिन कृष्णा तळे ( सामाजिक कार्यकर्ते )
७७०९०९९६४६

       

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale