Thursday, 11 April 2019

राजकीय कत्तलखाने


राजकीय कत्तलखाने

भारतात लोकशाही स्थापन झाल्यापासून अन राजेशाही काळ भूतकाळाच्या कागदावर इतिहासात जमा झाल्यापासून. राजकीय थाट हा जनतेच्या एका मतावर देशावर सत्तेचं राजकारण करू लागलं. राजकरणातून समाजकारण आणि देशाची प्रगती होऊ लागली. ह्या दरम्यान देशात अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष जन्मास आले आणि नष्ट सुद्धा झाले . काहींची घराणेशाही आजवर टिकली जगली पोसली ते राजकारण वर . अनेक राजकीय पक्षाने अभूतपूर्ण उत्तम कामगिरी देशात राबवून जनतेच्या मनात हृदयात स्थान मिळवलं. त्याच कामाचे दाखले देत पुढील वाटचालीचे धोरणे रणनीती आखत सगळेच राजकीय पक्ष आता सत्तेसाठी , खास करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचाराची धूळ उडवत आहेत. ह्याच धुळीत नेता आणि त्या नेत्याचे कार्यकर्ते आणि जनता पूर्णतः माखणार.  निवडणूक होई पर्यंत.

झेंडे हजार रंगवून झाले
नेते पालखीत बसवून झाले

लोकशाहीचे स्वप्ने पाहताना
दिस गुलामीचे आठवून झाले

नेता आणि कार्यकर्ता . लोकांसाठी लढणारा नेता आणि त्या नेत्यासाठी लढणारा कार्यकर्ता. एक अतूट नातं . नेता म्हणजे विश्वास आदर्श दैवत्वच कार्यकर्त्यांसाठी आणि कार्यकर्ते म्हणजे खरी दौलत ताकद नेत्यांची. नेता सांगेल त्या दिशेने कार्यकर्ते कार्य करत आणि कार्यकर्त्यांना काय हवे ते अचूक जाणून ठाम विचार नेता मांडत असे. त्याच्या एका विचारावर शब्दावर लाखो लोकांचे आणि समाजाचे प्रश्न मार्गी लागत.  त्यामुळे तेव्हाचे कार्यकर्ते हे निष्ठावंत होते आपल्या नेत्याशी एकमत होते.  ज्यांना त्या नेत्याचे निर्णय पटले नाहीत किंवा त्यांना काम करून हि योग्य तो अधिकार मिळाला नाही ते सोडचिट्टी देऊन चालते झाले. काहीं स्वतःचे पक्ष स्थापन करून स्वतःच नशीब अजमावत आहेत तर काहींनी दुसऱ्या पक्षाची पायरी धरली. काही उदाहरणार्थ सांगायचं तर शरद पवार काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस , नारायण राणे स्वाभिमान पक्ष , सेनेतून राज  ठाकरे ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेन पक्ष , छगन भुजबळ राष्ट्रवादी मध्ये इ .  राजकारणी भाषेत सांगायच झालं तर फितूर झाले , बंडखोरी केली , बेईमान झाले , खाल्या ताटात वैगैरे वैगैरे . पण नेत्यांनी हि विचार करणे खूप गरजेचे आहे जो कार्यकर्ता आपल्यासाठी आपल्या सुखदुःखात रात्रंदिवस झटला प्रचारासाठी हिंडला आणि स्वतःला सिद्ध करत पक्ष मदतीने नेतृत्व करू लागला तो अचानक नाराजी प्रकट करून पक्षातून बाहेर का पडतो . एक मजबूत कार्यकर्ता जेव्हा पक्षातून फुटतो त्यासोबत हजार कार्यकर्ते फुटतात त्या हजारांना मानणारा वर्ग हि नकळत पक्षापासून दूर होतो . फोडाफोडी हि खूप मोठी हानी सर्व राजकीय पक्षांना लागू पडते. ती हानी भरून काढण्यासाठी  पुन्हा खंबीर कार्यकर्ते उभे करण्यासाठी पक्षप्रमुखाना जीवाचं रान करावं लागत. खरंतर त्याच्यातल्या कार्यकर्त्याची कत्तल नक्की कुठे होतीय हे आजच्या राजकीय पुढार्यांनी संमजून घेयला हवं
.
राजकीय पक्ष म्हंटल तर स्वार्थ हा आलाच, वैचारिक चिखलफेक आलीच, चांगलं वाईट राजकारण हि आलच दिखावे पण आले. आताचे राजकारण पाहता कित्येक नेत्यांच्या निर्णयाने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण म्हणजेच राजकीय दृष्ट्या वैचारिक कत्तल झाली आहे आणि होतीय. हे चित्र फक्त एका पक्षापुरता नसून सगळ्या राजकीय पक्षात आहे.  पक्षांतर्गत नाराजी चे प्रमाण खूप वाढले आहेत. त्याचे कारण फक्त एक निर्णय. भर सभेत एकमेकांवर तोंडसुख घेणारे नेते  कार्यक्रमात जेव्हा एक होतात, दिलेल्या शब्दावर जागता शब्दांची हेराफेरी करत कार्यकर्त्यांना तोंडावर पाडतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांची काय मानसिक स्थिती होत असेल हे विचार करणे खूप गरजेचे आहे. आजचे नागरिक हे शिक्षित आहेत जाणते आहेत चांगल्या वाईट गोष्टीवर प्रखर मत मांडणारे आहेत. त्यात सोशल मीडिया म्हणजे स्वतःला प्रकट करण्याचे स्वतःचे मत मांडण्याचे एक अदृश्य असे व्यासपीठ प्रत्येकाला मिळालंय. देशात आणि राज्यात जर नजर फिरवली तर कार्यकर्त्यांची नाराजी हि सहज दिसून येईल. शिवसेना भाजपची युती तर महाआघाडीत मनसेची एन्ट्री तर मायावती अखिलेष ची झप्पी . चित्र डोळ्यासमोर आहे . नेते एक झाले पण जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधी लढले ते एक होतील का ? त्यांची वैचारिक लढाई एक होईल का ? 
सत्तेसाठी जगता जगता
सत्याला पार ठेचून झाले

अनेक जाती अन धर्मातुनी
असंख्य धागे विणून झाले

कालपर्यन्त भाजप आणि शिवसेना युती करणार नाही आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकून दाखवूची वार्ता करत करत अचानक आज युतीच्या बंधनात अडकून निवडणुकीचं रणशिंग फुंकले. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत मैदानात उतरण्याची तयारी करते आणि त्याला काँग्रेस कडून नकार मिळतो . काँग्रेसला विरोध करणारे कार्यकर्ते आघाडीत तसेच युती ला विरोध करणारे कार्यकर्ते महायुतीत खुश असतील का ? राजकीय दृष्ट्या नेत्यांनी निर्णय घेतले पण भावनिक दृष्ट्या कार्यकर्त्यांनी काय करावे. तेरी चूप मेरी चूप म्हणत फक्त कार्य करायचं कि सन्यास घेऊन दारा आत राहून फक्त बातम्या बघायचं. ज्या नेत्यासवे काम केलं ज्या पक्षाच काम केलं त्याची चुकीची भूमिका पाहून मत प्रकट करणे हि आजच्या कार्यकर्त्यांना सोपं नाहीय. जर तो पदाधिकारी असला तर प्रोटोकॉल पाळत त्याच पक्षात चूप बसायचं नाहीतर बाहेरचा रस्ता आहेच. जो प्रकट होतो तो बाटगा आणि जो गप्प बसतो तो निष्ठावंत. शेवटी हे सगळे वैचारिक भांडण असावं तरच चांगलं नाहीतर देशात राजकीय दंगे जास्त माजतील. प्रत्येक राजकीय पक्षाची एक वेगळी भूमिका आणि ओळख आहे त्यामुळे तेच पक्ष एकत्र दिसतील ज्यांचे विचारधारा हि एक आहे एका मुद्द्यावर आहे. काही राजकीयांची अशी हि ओळख आहे.  " तोडा फोड राज्य करा " " तुम्ही खा आम्हाला पण खाऊ द्या " " सत्तेसाठी काही हि "

महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्या प्रचारातून शिवसेनेची खिल्ली उडवत मोठ्या भावाला कवटाळले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सभेतून वाघाची डरकाळी फोडत स्वबळावर लढण्याचे स्वप्न दाखवत सत्तेला लाथ मारता मारत पुन्हा भाजप च्या मदतीने भगवे झेंडे मिरवत निवडणुकीला सज्ज झाले.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या व्यंग चित्रातून आपल्या शाब्दिक तोफखान्यातून अजित पवार, काँग्रेस ह्यांच्यावर टीका करून इंजिन आघाडीच्या सोबत ठेवून भाजप सेनेच्या विरोधी रुळावर सुसाट सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार साहेब केंद्रातून निशाणा लावत, रामदास आठवले आपल्या कवितेतून भाजप चे गुणगान गात फक्त एका जागेसाठी विद्रोही कवितांचा पाऊस मीडियासमोर पाडू लागले.

राज्यात घडणाऱ्या ह्या घटना पाहता कार्यकर्त्यांचे दिशाभूल हे त्यांचेच नेते करतांना दिसतायत. सत्ता असो नसो मिळो या मिळो स्वतःच्या ठाम भूमिकेवर एकही नेता आज नाही. जर असं असत तर देशात राम मंदिर असत , बेळगाव मधला मराठी बांधव महाराष्ट्रात असता , ओरंगाबाद आज संभाजी नगर म्हणून असत ,  काश्मीर मधील ३७० कलम कधीच उठवली असती, देशाशी गद्दारी करणारे देशाबाहेर नसते वैगैरे वैगैरे . 
शेवटी कार्यकर्त्यांच्या अफाट शक्तीचे भर सभेत खच्चीकरण करत वैचारिक खून केला जातो. त्याच्या कार्यावर त्याने पक्षसाठी दिलेल्या वेळेवर पाणी सोडल जात म्हणजेच आजचे राजकारण हे राजकीय कत्तलखाने आहेत जिथे कार्यकर्त्याचे वैचारिक कत्तल करत बळी दिली जाते.

मोर्चे बंद आणिक भाषणे
शंभर वेळा ऐकून झाले

दाराआड त्या बंगल्यामध्ये
कार्यकर्त्याना फसवून झाले

-सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale