Wednesday, 22 June 2022

मुस्लिम मराठी साहित्य परिषद

 

मुस्लिम मराठी साहित्य परिषद

 


मुस्लिम मराठी साहित्य हा नवा प्रवाह संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. मुस्लीम मराठी साहित्य म्हणजे मराठीतून लेखन करणाऱ्या मुस्लीम लेखकांचं साहित्य होय. नवीन पिढीला सक्षम, समंजस आणि सुदृढ घडवण्यासाठी दर्जेदार आणि स्थानिक भाषांमधून साहित्य वाचावयास आणि अभ्यासावयास मिळालं तरच वैचारिक क्रांती होऊ शकते. महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम परिवार हे मराठीत न बोलता उर्दू अन हिंदी ह्या भाषेला जास्त महत्व देताना दिसत आहेत. अश्यावेळी स्थानिक मराठी भाषेच्या दिशेने मुस्लिम युवकांना ओढ निर्माण कारण्याहेतू मुस्लिम मराठी साहित्य जास्तीत जास्त प्रकाशित झाले पाहिजे. महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, इकबाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.

 

२०१०मध्ये डॉ. इकबाल मिन्ने यांच्या पुढाकाराने मुस्लिम मराठी परिषदेच्या काही सदस्यांनी मिळून औरंगाबादमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलने मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ नावाचे मंडळ स्थापन केले. प्रा. जेमिनी कडू ह्यांच्या मते “मराठी लिहिणाऱ्या, विचार करणाऱ्या आणि जाणीव असणाऱ्या मुस्लिमांनी साहित्यासारखे प्रभावी साहित्य निर्माण करणे म्हणजे ‘मुस्लिम मराठी साहित्य” होय”. १९३६ सालापासून सांगलीचे सय्यद अमीन यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य हा शब्द प्रयोग केला. तेराव्या आणि चौदाव्या शतकापासूनच मुस्लिम-मराठी संतांनी मराठीतून साहित्य निर्मिती केल्याचे अनेक पुरावे आढळतात. कोकण विभागातील मुस्लिम लेखकांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके लिहिली आहेत. महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ग्रामीण भागांतून मराठीतून भक्तिगीते, ओव्या आणि अभंग लिहिणारे ४९ मुस्लिम मराठी कवी होऊन गेले होते. कोकणात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कोकणी मुसलमान मराठीतून लिहीत होते. कॅप्टन फकीर महंमद जुळवे, हुसेनमियॉं माहिमकर, अबू काझी, परवेज नाईकवडे, बशीर सावकारपासून ते कवी खावर, अजीज हसन, मुक्री इत्यादींचे लिखाण मराठीत प्रकाशित आहेत.

 

मुस्लिम साहित्य परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘मुस्लिम मराठी साहित्याच्या शोध लागला. नवनवे मुस्लिम तरुण लिहू लागले. संमेलनामधून समाजाच्या वेवेगळ्या समस्यावर विचारमंथन होऊ लागले. मुस्लिम मराठी साहित्याची व्याख्या मांडताना प्रा. फकरूद्दीन बेन्नूर लिहितात "मुस्लिम म्हणून मराठी प्रदेशात जगत असताना आणि त्याचप्रमाणे धर्माने निर्माण केलेले मुस्लिमपण आणि इथल्या सामाजिक वास्तवातून परंपरेने चालत आलेले भारतीय समाजातील गुणविषेश या दोन्हीमुळे इथल्या संवेदनक्षम लेखकांच्या मनात ज्या जाणीवा निर्माण होतात जो संघर्ष उभा राहतो, त्याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे ‘मुस्लिम मराठी साहित्य’ होय

 

सचिन तळे 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale