Monday, 6 May 2024

योगयोगेश्वर सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी सोहळा

 योगयोगेश्वर सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी सोहळा 




योगयोगेश्वर सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी सोहळा

पुण्यातील स्वारगेटकडून कात्रज कड़े जाताना रस्त्यावर, स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटर वर डाव्या हाताला एक मठ लागतो. धनकवडी गावातला हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा समाधी मठ! येत्या वैशाख शु. दुर्गाष्टमी शके १९४५ बुधवार दि. १५ मे रोजी महाराजांचा ७७ वा समाधी सोहळा पार पडत आहे. यावेळी ट्रस्ट तर्फे महाप्रसाद, संगीत महोत्सव, भजन, नृत्यसेवा, सतार वादन, तबला ,बहुरूपी भारूड, शास्त्रीय संगीत, प्रवचन, नारदीय कीर्तन . कार्यक्रम आयोजित केले असून हा सोहळा मे पासून ते १६ मे पर्यंत चालणार आहे. १५ मे या दिवशी महाराजांची पालखी पुण्यातील काही ठिकाणी भेट देत मठात येईल. मठातर्फ़े दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रोज मठात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अन गरजू संस्थांना अन लोकांना मोफत खिचडी वाटप केली जाते. दांडेकर पूल, गोकुळ नगर, वारजे पूल, सुखसागर नगर कात्रज या मजूर अड्ड्यावरील पंधरा हजारहून अधिक रुग्णांनी ट्रस्ट च्या फिरत्या दवाखान्यातून लाभ घेतला आहे. पुण्या बाहेरून येणाऱ्या भाविकांसासाठी लवकरच तळजाई येथे भक्तनिवास हि सुरु होणार आहे. आजही भक्तांच्या भेटीला हाकेला महाराज धावून येतात. महाराजांच्या मठात एक विलक्षण गोष्ट अशी कि महाराजांवर प्रेम करणारा मोठा वर्ग हा तरुण आहे. लाखोंच्या घरात तरुण मंडळी मालकांच्या सेवेत दिसतील. श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य-संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती, ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते. ते म्हणाले होते- ‘मला काही कमी नाही, कारण मला कमावण्यासारखे काही नाही. आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही.’

मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।

दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।

यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।

पाया भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।

आम्ही कैलासाहून आलो!’ नावहीशंकर’! हे शब्द आहेत शंकर महाराजांचे. नाथ सिद्धांच्या परंपरेतील एक परिपूर्ण गुरु, आधुनिक युगातील महाराष्ट्रातील महान योगी संतांपैकी एक. महाराजांना भक्तगण "मालक" या शब्दांनी हाक मारत अन शंकर महाराज अक्कलकोट निवासी श्री स्वामींना "मालक" म्हणत. महाराज दिसायला शारीरिकदृष्ट्या अष्टवक्र (म्हणजे आठ ठिकाणी वाकलेले) आणि पुराणकाळातील महान ज्ञानी पुरुष असेच दिसायचे. ते 'अजानुबाहू' होते. गुडघ्यापर्यंत लांब हात असलेले. त्याचे डोळे - मोठे आणि तेजस्वी - आणि चेहऱ्यावर लहान मुलासारखे भाव हे सर्वात लक्षणीय होते. शंकर महाराजांचेनाम-रूप-स्थानसांगणे कठीण पण नोंदीनुसार त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी तसेच भारता बाहेर देखील त्यांची भटकंती. महाराजांनी त्यांच्या भक्तांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. त्यामुळे त्यांची नावे हि अलग अलग. काशीमध्ये त्यांना खिचडी बाबा, ग्वाल्हेर प्रदेशात ते गौरीशंकर म्हणून ओळखले गेले, खानदेशातील रावेर येथे होते जेथे ते कुंवरस्वामी म्हणून, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, मध्य भारतात लहरीबाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी महाराजांची कीर्ती पाहायला मिळते.

 

असे म्हणतात की नाशिकजवळील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावातील एक चिमणाजी निपुत्रिक होते आणि त्यांनी बाळासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली. एके दिवशी, त्यांना स्वप्न पडले की त्याला त्याच्या गावाबाहेरच्या जंगलात झुडपात एक बाळ सापडेल. दिव्यदृष्टी असल्याचे स्वप्न घेऊन त्याने दुसऱ्या दिवशी स्थानिक जंगलात शोध घेतला आणि त्यांना दोन वर्षांचा मुलगा सापडला. चिमणाजींनी मुलाला घरी आणले आणि त्याचे नाव शंकर ठेवले. लहानपणीही शंकर ध्यानासाठी जवळच्या जंगलात जायचे आणि रात्री सुखरूप परतायचे. एके दिवशी, त्याने आपल्या पालकांना सूचित केले की त्यांना लवकरच त्यांचे स्वतःचे मूल होईल. हे अगदी अचूक ठरले आणि त्यानंतर काही वेळातच, शंकर अध्यात्मिक शोधात हिमालयात जाण्यासाठी घर सोडले.

शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दार उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तार घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. "आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात". ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर पद्मावती या ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले.

महाराजांनी नुसतं समाधिस्थानच सुचवलं नव्हतं, तर तिकडे जाणाऱ्या यात्रेचा मार्गही आखून दिला होता. त्यांच्या इछ्येप्रमाणे मामांच्या घरापासून यात्रा निघाली ती काका हलवायांचं दत्तमंदिर, ग्लोब सिनेमा, समर्थ अक्कलकोट स्वामी मठ, मंडईतला लोकमान्य टिळकांचा पुतळा, शनिपार, भिकारदास मारुती, पर्वतीवरून अरण्येश्वर या वाटेनं समाधिस्थानाकडे. पाचच्या सुमाराला, उन्हे थोडी कलती झाल्यावर महाराजांचा देह समाधिगुंफेत ठेवताना आता पुन्हा हे सगुण दर्शन होणं नाही या जाणिवेने सर्वांचं हृदय भरून आलं. डोळे पाझरू लागले. पण आपल्या प्राणप्रिय सदगुरुंच्या विरहदु:खानं विदीर्ण झालेल्या अंत:करणाचे उसासे महाराजांना समजू नयेत, ऐकू येऊ नयेत म्हणूनच की काय सर्वांनी मोठ्यानं जयघोष केला

"अनंतकोटी ब्रम्हांडनायक सदगुरू शंकरमहाराज की जय!"

स्वामी समर्थ महाराज की जय!!

ज्ञानेश्वरमाऊली - तुकाराम !!!"


- सचिन कृष्णा तळे 7709099646

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale