सोलापूरची साबिरवाणी
दुनियेमध्ये तू आल्यावर , ऐसे स्वच्छ
जगावे !
इतिहासाने तुझ्यासाठी ... एक पान राखावे
!!
साबीर… एक पान राखावे !!!
साहित्य क्षेत्रात
स्वतःची ओळख निर्माण करणारे जेष्ठ कवी बदीउज्जमा बिराजदार हे उत्तम गझलकार गीतकार आहेत
सोबत नवोदित लेखकांचे आकर्षण आहेत. धर्म जात भाषा ह्यांच्या पलीकडे त्यांची विचारसरणी
असून माणसातला देव शोधणारे एक वजनदार व्यक्तिमत्व आहेत. काव्यातून त्यांच्या शब्दातून
आपल्याला प्रेम , आपला समाज , एक चळवळ , विरहाचं रूप , शिकवण , सुख दुःख , त्याग, सवांद,
भक्ती , प्रबोधन , वर्णन असे अनेक बाबी आढळून येतील. सहसा बऱ्याच कवींना गझल पचत नाही
झेपत नाही कारण गझलेचं गणित सोडवणे हे तितके सोपे हि नाही. परंतु साबीर ह्यांच्या प्रत्येक
शब्दात गझल पाहायला मिळेल. इतिहासाने आपल्यासाठी एक पान राखून ठेवावे अशी इच्छा मनात
बाळगून बदीउज्जमा बिराजदार हे मोजक्या शब्दात विश्वाची मांडणी करताना ह्या पुस्तकात
आढळतील. बदीउज्जमा बिराजदार हे " साबीर सोलापुरी " ह्या नावाने प्रसिद्ध
आहेत. ह्या संग्रहात अखंड एक एक कविता नसून दोन दोन ओळींच्या शृखंलेत साबिरवाणी ची
मांडणी वाचायला मिळेल. आजवर आपण कबिरवाणी वाचली असेल, अगदी त्याचं समांतर वृतांत आजच्या
काळात रसिकांसाठी वाचकांसाठी साबिरवाणी चा जन्म झाला असे म्हणावे लागेल. ज्यांनी कबिरवाणी
वाचली असेल त्यांना साबिरवाणी नक्कीच आवडेल. साबिरवाणी वाचायला सुरुवात केली कि शेवटच्या
पानावर आपण कधी पोहचू हे कळणार नाही. इतक्या साध्या सोप्या भाषेत वृत्तात काव्याची
नजाकत आहे. काही काही ओळी तर पुन्हा पुन्हा वाचावी असे आहेत. तर काही ओळींवर मन हरवून
जात. तर काही ओळी थोडं स्तब्ध होऊन विचार करायला लावतात , काही ओळी प्रेरणा देतात तर
काही ओळी प्रेमात पडण्यास भाग पाडतात तर काही ओळी
संसाराची जाणीव करून देतात, नात्याची गुंफण घालून देतात, तर काही ओळी परमेश्वराचं
रूप निसर्गाच्या मंदिरातून रसिकांच्या हृदयाला भिडतात.
ज्ञानेशाची अन तुक्याची दिव्य केवढी
वाणी !
ओव्या आणिक अभंग म्हणजे चैतन्याच्या
खाणी !!
साबीर ... चैतन्याच्या खाणी !!
मुस्लिम समाजात
जन्मलेले साबिर ह्याचे संस्कृत भाषेवर छान प्रभुत्व आहे. अर्थातच हे शब्दाचे बाळकडू
त्यांना त्यांचे वडील पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार ह्याच्या कडूनच मिळाले. ते संस्कृत
तसेच उर्दू भाषेचे अभ्यासक आहेत. वडिलांप्रमाणे महाराष्ट्रातच काय तर देशात भाषेवर
प्रेम करून साहित्याची पालखी वाहण्यात साबीर दादा यशस्वी ठरलेत. त्यांचे काव्यसंग्रह
" आयुष्य पेलताना " आणि एक गझलसंग्रह " माझा गुलदस्ता " प्रसिद्ध
आहे . साबिर सरांनि लिहिलेली " समर्थांची गीत पुष्पे " हा भक्तीगीत संग्रह
तसेच " महिमा स्वामी समर्थ कि " गीत माला मनाला स्वामी चरणी विलीन करतो.
अनेक वृत्तपत्रातून लेखन करणारे साबिर ह्यांना अगणित असे पुरस्कार आणि मानसन्मान मिळाला
आहे , अनेक साहित्य संमेलन त्यांनी गाजवले आहे आणि त्यांच्या पहाडी आवाजातून सादर हि
केल्या आहेत. त्यांच्या आवाजातला कणखरपणा हा गझलेतून ऐकताना मन आनंदी होत. म्हणून तर ज्ञानेशाच्या आणि तुकारामांच्या
वाणीतून चैतन्याच्या खाणी शोधणारा हा कवी सगळ्यांना आपलासा वाटतो, हवाहवासा वाटतो. ६८ पानांच्या ह्या साबिरवाणीत एकूण २७८ साबिरवाणी
आहेत . कवी जनार्दन केशव म्हात्रे ह्यांची प्रस्तावना असून गझलकार गोविंद नाईक ह्यांनी
मुखपृष्ठ आपल्या चित्रातल्या रंगाने रंगवले आहे.
शेवटच्या दोन पानावर थोडक्यात साबीर
सोलापुरी ह्यांची व्यक्तिछटा मांडली आहे.
कमी
शब्दात सांगायचं झालं तर साबिरवाणीत कवी वरदानाच्या रांगेमध्ये वैभव मागतोय, हजार दुःखे
हजार चिंता घेऊन संकटाना झेलतोय, आजच का रे देता महत्व महिलांच्या दिवसाला सांगत आदर्शाची
चौकट बांधतोय. संशयाचे घर काचेचे तिथे मिळते साखर कडवट आणि जिथे तिथे उंच हवेल्या जो
तो आहे चढवत. ह्या कवीच्या क्षितिजा भोवती आभासाची किरणे आहेत चन्द्राच्या कले कलेने
झुरणे आहे सुखदुःखाला समजणे आहे हृदयातल्या ईश्वराचे कौतुक आहे अस्तित्वाच्या खुणा
शोधत देशभक्तीच्या शब्दातून माणुसकीचा शोध आहे
साबीर माणुसकीचा शोध आहे ..!!
स्वातंत्र्याचे
धिंडवडे तर , झाले विलक्षण !
फडके झेंडा
आकाशी अन , हाय धरेवर कुंपण !!
साबिर
... हाय धरेवर कुंपण !!!
पुस्तक -
साबिरवाणी
कवी - बदिऊज्जमा
बिराजदार
प्रकाशक
- गवळी प्रकाशन
मूल्य - ११०
सचिन कृष्णा
तळे



















